मराठी साहित्य – विविधा  ☆ शून्य ते पूज्य ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? विविधा ?

☆ शून्य ते पूज्य ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

भारतीय विचारधारा खूप प्राचीन आहे. निव्वळ प्राचीन नसून ती तितकीच महान देखील आहे. शून्य ही संख्या भारताने विश्वाला दिलेली सर्वात महान देणगी आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.

शून्य म्हणजे शून्य. पण हे शून्य जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे लागते तेव्हा ते त्या संख्येचे मूल्य वाढवित असते. आपल्याकडे शून्याला पूज्य म्हणण्याची पद्धत आहे. मूल्य वाढविणारे शून्याला पूज्य म्हटले जाते असे आपल्या लक्षात येईल. थोडा अधिक विचार करता, किंवा थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की ज्याला आपले मूल्य वाढवायचे आहे त्याने आधी शून्य व्हावं आणि आपल्या आधी सद्गुरू, आराध्य देवता अथवा भगवंताला ठेवावे, म्हणजे तो मनुष्य खात्रीने पूज्य होऊ शकतो. आपल्याकडील अनेक संतांची चरित्रे पाहिली तर आपल्याला याची साक्ष पटू शकेल.

संत तुकाराम महाराज हे प्रापंचिक लोकांसाठी महान असे आदर्श म्हणता येईल. आधी सावकारी आणि नंतर कफल्लक झालेले तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, ते त्यांनी स्वतःला शून्य केले म्हणूनच, नाही का?

मनुष्याचा जीवन प्रवास सुद्धा शून्यापासून सुरुवात होऊन शून्यापर्यंत येऊन थांबतो असे आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्माला येताना ते शून्य असते आणि त्या बालकाचा जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो, तेव्हा तो एकप्रकारे शून्यच होत असतो…! सर्व संत असे सांगतात की शून्यापासून सुरू होणारा प्रवास शून्यापर्यंत येऊन न थांबता, तो पूज्या पर्यंत येऊन ठेपला तर त्या मनुष्याचे, जिवांचे सार्थक झालं असे नक्कीच म्हणता येईल.

शून्य ते शून्य नव्हे शून्य ते पूज्य हा प्रवास वाचायला अगदी सहज, पण आचरण करायला, क्रमण करायला तितकाच खडतर…

सर्व संतांनी हा मार्ग स्वतः आचरून दाखवला आहे. अपवाद सोडले तर अनेक संतांनी अनेक प्रकाराची सुखदुःखे सहन केली, अनंत यातना सोसल्या, उपेक्षा, मानहानी, किती सांगावे…?

पण या संतांनी कायम प्रतिसाद दिला…!

प्रत्येक मनुष्याला संत होणे जमेलच असे नाही, पण त्याला पूज्य (शून्य) होणे नक्कीच जमू शकेल…! यासाठी काही विशेष करायला लागेल असे नाही…

काही गोष्टी मनाशी दृढ करून करण्याचा प्रयत्न केला तर शून्य ते पूज्य हा प्रवास शक होईल.

बाळ जन्मते तेव्हा ते कोणाचेच नसते, त्यामुळे सर्वांचे असते. त्या बालकाची काळजी अगदी परके वाटणारे लोकं सुद्धा स्वयंस्फूर्तीने घेत असतात असे आपल्या लक्षात येईल. बाळ. जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा अहंकार मोठा होऊ लागतो. तो कोणी होत जातो, त्याच्या असण्याला, होण्याला समाज कमीअधिक प्रमाणात खतपाणी घालत असतो.

पन्नाशी पर्यंतचे आपण पाच टप्पे ठरवता येतील.

  • दहाव्या वर्षी त्याला सगळे आपले आहेत असे कळायला लागते…?
  • विसाव्या वर्षी त्याला आपल्याला काय हवे हे कळायला लागते…?
  • तिसाव्या वर्षी त्याला आपले नक्की कोण आहे कळायला लागते…?
  • चाळीसाव्या वर्षी त्याला आपले आणि परके यातील सूक्ष्म रेषा कळू लागते…
  • पन्नाशीला त्याला जग काय आहे कळते असे म्हणता येईल… (कदाचित जग काय आहे हे त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी…)

“एका वाक्यात सांगायचे झाल्यास मनुष्याचा अहंकार पन्नास वर्षाचा होतो…!! “

“पूर्व सुकृत उदयास आले आणि त्याला संताची संगत लाभली तर त्याचा विवेक जागृत होतो, पण सत्संगती लाभली नाही तर त्याचा विवेक जागृत होत नाही आणि मनुष्य अहंकाराचे टोक गाठतो…! “

काही कारणाने सत्संग लाभलेला नाही, पण शून्य होण्याची मनाची तयारी आहे, त्याने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संताचे ग्रंथ (संतांनी लिहिलेलं…) वाचावेत, त्यांचा अभ्यास करावा, आणि त्याच्या जोडीला नामस्मरण करावे…

मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे मानले तर पन्नास हा मध्यबिंदू म्हणता येईल…! चढत्या भाजणीने वाढत गेलेला अहंकार उतरत्या भाजणीने पन्नास ते शंभर पर्यंत शून्यावर आला तर मनुष्य पूज्य होणे सहज सोपे…!

पन्नाशी पर्यंत वाढवलेला प्रपंचाचा पसारा पुढील पन्नास वर्षात आवरता आला तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल…!! शून्य ते पूज्य या प्रवासाला सुरूवात करू इच्छिणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!

मनुष्य सुरुवात तरी नक्की करू शकतो… , प्रयत्न करू शकतो…! यश देणे न देणे रामाची इच्छा!!

पहा पटतंय का?

 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड☆ श्री जगदीश काबरे ☆

छोट्याशा गावात अन्नपूर्णाबाईंची पुरणपोळीची गाडी होती. ही गाडी केवळ चवदार पूरणपोळ्यांसाठीच नाही, तर “मेंदूला खाऊ” देण्यासाठीही प्रसिद्ध होती, असे गावातील लोक हसत म्हणत. कारण अन्नपूर्णाबाई फक्त पुरणपोळ्या विकत नव्हत्या, तर प्रत्येक खरेदीमागे लपलेला विचारही लोकांच्या लक्षात आणून देत असत. ती गाडी म्हणजे जणू चालती-बोलती प्रयोगशाळाच होती. सकाळी शाळेत जाणारी मुलं, दुपारी शेतातून परतणारे शेतकरी, संध्याकाळी कामावरून थकून येणारे नोकरदार, सगळ्यांच्याच तोंडात एकच वाक्य असायचं, “बाईंची पुरणपोळी म्हणजे मऊसूत, जिभेवर विरघळणारी! ” 

गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्या वर्षी विज्ञान मेळावा भरवायचं ठरलं. नेहमीसारखी पोस्टर्स, चार्ट्स, मॉडेल्स, फुगे हे सगळं असणारच होतं. पण विज्ञान शिक्षकांनी यावेळी वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. “विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतली काचभांडी नाही, ” ते म्हणाले, “… तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ” म्हणून त्यांनी अन्नपूर्णाबाईंना खास निमंत्रण दिलं.

मेळाव्याच्या दिवशी शाळेच्या मैदानात रंगीबेरंगी स्टॉल लागले. एका बाजूला सौरऊर्जेचे मॉडेल, दुसरीकडे पाण्याचा दाब दाखवणारी नळी, एका कोपऱ्यातून मात्र घमघमाट सुटलेला होता. कारण तिथे अन्नपूर्णाबाईंचा पुरणपोळीचा स्टॉल लागलेला होता.

मुलांना वाटले, वा! विज्ञान मेळाव्यात पुरणपोळी! पण अन्नपूर्णाबाई हसून म्हणाल्या, “ही फक्त पुरणपोळी नाही, हा एक विज्ञानाचा प्रयोग आहे. ” बाईंनी फळ्यावर तीन पर्याय लिहिले. ४० सेमी व्यासाची मोठी जंबो पुरणपोळी, ३० सेमी व्यासाची मध्यम पुरणपोळी, आणि २० सेमी व्यासाची छोटी पुरणपोळी.

४० सेमी व्यासाची एक पुरणपोळी चाळीस रुपयाना, ३० सेमी व्यासाची एक पुरणपोळी तीस रुपयाना आणि २० सेमी व्यासाची एक पुरणपोळी वीस रुपयाना आहे. पण ऑफर अशी आहे की, ४० रुपयात एक ४० सेमी व्यासाची पुरणपोळी मिळेल किंवा ४० रुपयात ३० सेमी आणि २० सेमी व्यासाची अशा दोन पुरणपोळ्या मिळतील किंवा ४० रुपयात २० सेमी व्यासाच्या तीन पुरणपोळ्या मिळतील.

आता सांगा मुलांनो, “तुम्ही कोणती ऑफर स्विकाराल की ज्यामुळे तुम्हाला जास्त पुरणपोळी खायला मिळेल? ” असा अन्नपूर्णा बाईंनी प्रश्न विचारला.

राघव म्हणाला, “आजी, सगळ्या पुरणपोळ्यांची किंमत वेगवेगळी का? ” अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, “कारण विज्ञानात फक्त वस्तू महत्त्वाची नसते, तिचं प्रमाण, क्षेत्रफळ आणि उपयोग महत्त्वाचा असतो. तेव्हा आज खाण्याआधी विचार करा! ”

मुलं हसली. “आजी, खाण्याआधी विचार कसा करायचा? ” एक मुलगा विचारला.

बाई हसून म्हणाल्या, “आज पोट भरायचंयच, पण त्याआधी डोकं भरायचं आहे. ”

बाईंनी तीन प्रकारच्या पुरणपोळ्या समोर मांडल्या होत्या. एक मोठी—जंबो, एक मध्यम आणि एक छोटी. त्या म्हणाल्या, “ या पुरणपोळ्या लहान मोठ्या आकाराच्या असल्या तरी प्रत्येकीची चव तीच आहे, बरं का. ” 

मग बाईंनी गोल पुरणपोळी शेजारच्या फळ्यावर काढून दाखवली. “ही पोळी गोल आहे. आता मला सांगा, गोलाचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ” 

सायली पटकन म्हणाली, “πr² या सूत्रानुसार… ” 

बाईंनी टाळी वाजवली. “मग बघा, ४० सें. मी. व्यासाची जंबो पोळी म्हणजे मोठं क्षेत्रफळ. पण तीन छोट्या पोळ्यांचं एकत्रित क्षेत्रफळ किती होईल, याचा विचार केलात का? ”

मुलांनी कागद-पेन्सिली काढल्या. कोणीतरी गणित केलं, कोणीतरी अंदाज बांधला. मग लक्षात आलं की तीन छोट्या पोळ्या एकत्र केल्यावर मिळणारा ‘खाण्याचा आनंद’ जंबो पोळीपेक्षा वेगळा आहे. कुणाला जास्त तुकडे हवेत, कुणाला एक मोठी पोळी हवी, तर कुणाला मध्यम आणि छोटी अशी जोड हवी.

तेवढ्यात बाईंनी एक गुपित सांगितलं. “ही सगळी ऑफर म्हणजे मानसशास्त्र आहे, ” त्या म्हणाल्या. “लोकांना ‘एकावर एक’ किंवा ‘जास्त मिळतंय’ असं वाटलं की ते खूश होतात. पण खरा वैज्ञानिक विचार असा असतो की, आपल्याला काय हवंय, किती हवंय आणि त्याची खरी किंमत काय आहे? ”

मुलांना अचानक जाणवलं की हा फक्त खाण्याचा प्रश्न नाही, तर विचार करण्याचा आहे. राघव म्हणाला, “मला तीन छोट्या पोळ्या हव्यात, कारण मला मित्रांबरोबर वाटून खायचं आहे. ” सायली म्हणाली, “मला मध्यम आणि छोटी, कारण दोन्ही चवीचा अनुभव मिळेल. ” एक शांत मुलगी मीरा म्हणाली, “मला जंबो पोळी हवी, कारण मला मोठी पोळी तोडत बसायला आवडतं. ” अन्नपूर्णाबाई हसल्या. “बस्स! हेच विज्ञान. एकाच माहितीवर वेगवेगळे निर्णय. योग्य-चूक असं काही नाही, फक्त समजून निवडणं महत्त्वाचं. ”

मुलांना वाटलं, यात काय विज्ञान? पैसे दिले, पोळी घेतली, खाल्ली—सोपंय. पण बाईंची ऑफर ऐकून त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. कुणी म्हणालं, “तीन छोट्या जास्त! ” कुणी म्हणालं, “एक मोठीच बरी. ” तर काही जण म्हणाले, “ऑफरमध्येच फायदाच असतो. ”

तेव्हाच बाईंनी पहिला वैज्ञानिक प्रश्न टाकला. “पोळी म्हणजे काय? ”

“खाण्याची गोष्ट! ” कुणीतरी ओरडलं.

“आकार कोणता? ”

“गोल म्हणजे वर्तुळाकार! ”

“मग वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ”

सायली नावाच्या हुशार मुलीने हात वर केला आणि पटकन म्हणाली, “πr² या सूत्राने! ”

“शाब्बास, ” बाई म्हणाल्या, “आता आपण उकल करू. ”

बाईंनी फळ्यावर खडूने तीन मोठे गोल काढले. एकावर २० सें. मी. , एकावर ३० सें. मी. , आणि एकावर ४० सें. मी. , अशी संख्या लिहिली. “हे ह्या पुरणपोळ्यांचे व्यास आहेत, ” त्या म्हणाल्या. “आता प्रत्येक पुरणपोळीचे त्रिज्या किती होईल सांगा बरं. ” मुलांनी झटपट गणित केलं. छोटी पोळी—त्रिज्या १० सें. मी. , मध्यम—१५ सें. मी. , जंबो—२० सें. मी.

मग मोजमाप सुरू झालं.

छोटी पोळी— वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² 

म्हणजेच छोट्या पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १०² = ३१४ चौ. से. मी.

मध्यम पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १५² = ७०६ चौ. से. मी.

जंबो पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × २०² = १२५६ चौ. से. मी.

हे आकडे बघून मुलांच्या भुवया उंचावल्या. कारण फरक प्रचंड होता.

“आता खरी गंमत बघा, ” बाईंनी सांगितलं. “रु. ४० मध्ये एक जंबो पोळी घेतली, तर तुम्हाला १२५६ चौ. से. मी. क्षेत्रफळ मिळतं. पण त्याच रु. ४० मध्ये तीन छोट्या पोळ्या घेतल्या, तर ३१४ × ३ = ९४२ चौ. से. मी. ”

“म्हणजे जंबो जास्त! ” एक मुलगा आश्चर्याने ओरडला.

पण बाईंनी लगेच हात वर केला. “थांबा. अजून संपलं नाही. ”

त्यांनी मध्यम + छोटीचा पर्याय घेतला. “७०६ चौ. से. मी. + ३१४ चौ. से. मी. = १०२० चौ. से. मी. ”

“म्हणजे हा पर्याय तीन छोट्यांपेक्षा चांगला, पण जंबोपेक्षा कमी, ” मुलांनी निष्कर्ष काढला.

आता मुलांना मजा यायला लागली. कारण आता फक्त पोळी खाणं नव्हतं तर तो एक गणिती खेळ झाला होता… आकड्यांचा, विचारांचा, निवडींचा.

मुलं विचार करत आहेत तेवढ्यात बाईंनी आणखी एक वेगळाच प्रश्न विचारला. “रु. ३० मध्ये काय घ्याल? ”

“दोन छोट्या! ” बहुतेकांनी उत्तर दिलं.

“की एक मध्यम? ” बाईंनी शंका उपस्थित केली.

मुलं गप्प झाली.

बाईंनी पुन्हा गणित मांडलं. दोन छोट्या पुरणपोळ्यांचं क्षेत्रफळ = ३१४ × २ = ६२८ चौ. से. मी. आणि एक मध्यम पुरणपोळीचं क्षेत्रफळ = ७०६ चौ. से. मी.

“म्हणजे? ”

“मध्यम जास्त! ” सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं.

आता मुलांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला होता. ऑफर म्हणजे नेहमी फायदा नसतो. जास्त नग म्हणजे जास्त मूल्य नसतं. दिसतं तसं नसतं. मुलं मंत्रमुग्ध झाली. विज्ञान अचानक रोमांचक झालं.

शेवटी बाईंनी निष्कर्ष सांगितला. “जर तुम्हाला जास्त खाण्याचं मूल्य हवं असेल, तर रु. ४० मध्ये जंबो पोळी सगळ्यात फायदेशीर. रु. ३० मध्ये मध्यम पोळी सर्वात शहाणी निवड. म्हणजे फक्त ‘जास्त नग’ दिसत आहेत म्हणून तीन छोट्या पोळ्या नेहमीच जास्त फायद्याच्या असतात असं नाही. आणि ‘एकावर एक’ हा शब्द ऐकून भुलायचं नाही. प्रश्न विचारायचा—खरंच किती मिळतंय? ”

त्या दिवशी मुलांना एक मोठा धडा शिकायला मिळाला. जाहिरातीच्या ऑफर –‘एकावर एक’ या सगळ्या गोष्टी डोळ्यांना भुलवतात; पण विज्ञान डोळ्यांपलीकडचं पाहायला शिकवतं. अन्नपूर्णाबाईंच्या पुरणपोळ्यांच्या ऑफरमुळे मुलांच्या मनात एक नवीन वैज्ञानिक दृष्टी तयार झाली, ती म्हणजे काहीही निवडण्याआधी “खरंच किती मिळतंय? ” हा प्रश्न विचारण्याची. आणि हाच तर विज्ञानाचा खरा गोडवा आहे. त्या दिवशी मुलांनी पुरणपोळी खाल्लीच, पण त्याहून जास्त ते शिकले की गणित फक्त पुस्तकातच नसतं, विज्ञान प्रयोगशाळेतच नसतं, आणि शहाणपण म्हणजे फक्त स्वस्त नाही तर योग्य निवड करणं असतं. अन्नपूर्णाबाईंच्या गाडीवरची पुरणपोळी संपली, पण मुलांच्या डोक्यातलं विचारांच गोड पुरण मात्र बराच काळ रेंगाळत होतं. मेळावा संपला. मुलं घरी गेली. त्या रात्री अनेकांच्या घरी चर्चा सुरू होती. बाबा म्हणत होते, “आपण तर जाहिराती पाहूनच वस्तू घेतो. ” आई म्हणत होती, “आता भाजी घेतानाही विचार करायला हवा. ”

अन्नपूर्णाबाईंची गाडी दुसऱ्या दिवशीही उभी होती. पण आज मुलं पोळी घेताना विचार करून घेत होती. कोणीतरी जंबो घेतली, कोणीतरी मध्यम. पण सगळ्यांच्या डोळ्यांत एकच चमक होती—समजून उमजून निवड केल्याची.

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकी तारीख आठवत नाही, पण तीन वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, दिवस मात्र पावसाळ्याचेच…!

सकाळपासून आकाश निरभ्र होते, सोबत मी रेनकोट नेला नव्हता.

भिक्षेकर्‍यांचे सर्व काम आटपायला त्या दिवशी चार वाजले, पोटात अन्नाचा कण नव्हता.

आकाश अजूनही निरभ्र होते, आता पटकन घरी जायचे आणि काहीतरी खायचे असा विचार करून मोटारसायकलवर बसलो.

… दोन लोक छान छान काहीतरी बोलत असताना, मध्येच काहीतरी व्हावं आणि अचानक हमरी तुम्ही वर यावं, एकमेकांवर जोरजोरात ओरडायला सुरुवात करावी, तसंच काहीसं वर झालं असावं.

निरभ्र असलेलं आकाश आता काळं कुट्ट झालं, दोन विजांमध्ये भयानक भांडणे सुरू झाली, त्याचा आवाज खालीपर्यंत येत होता. याचा परिणाम म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले, पावसाच्या रूपात…!

आणि जोरदार पाऊस सुरू झाला.

सोबत मी रेनकोट आणला नव्हता. कमरेला एक पिशवी लावलेली असते, त्यात थोडेफार पैसे आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे असतात. पावसात हि बॅग भिजू नये म्हणून मी गाडीला अडकवलेल्या कुठल्याशा बॅगेत ही बॅग घुसवली.

दोन विजांच्या भांडणात आपण पडायला नको, हा शहाणा विचार करून, आता भिजत निघणार तेवढ्यात एका भिक्षेकर्‍याने त्याच्या जवळचे रेनकोटचे जॅकेट मला दिले, नको नको म्हणत असतानाही त्याने ते घालायला लावले.

हे मीच त्याला कधीतरी दिले होते, पण आता ते डाव्या काखे पासून पूर्णपणे खाली पर्यंत उसवले होते फाटले होते. दोन ठिकाणी भोकं पडली होती…

त्याचं मन मोडायचं नाही म्हणून आणि जाऊदे बुडत्याला काडीचा आधार म्हणत मी निघालो, पावसाचा जोर प्रचंड होता. मोटर सायकलच्या विरुद्ध दिशेने येणारा आडवा पाऊस वेगाने तोंडावर आपटत होता.

दोन्ही गाल झापडून निघत होते.

एखादा निष्णात ढोलकी पटू रंगात आल्यानंतर त्या ढोलकीच्या दोन्ही बाजूला ज्या वेगाने थपडा मारेल, तसा पाऊस मला ढोलकी समजून दोन्ही गालावर थपडा मारत होता.

आजूबाजूची झाडं त्याच्या या कलाविष्काराला झुकून दाद देत होती, तर काही इकडून तिकडे जोरजोराने माना हलवत होती, बेभान होऊन…!

काही महाभागांनी तर रस्त्यावरच लोटांगण घातलं, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं, पण त्या “ढोलकीपटूला” याचे काही सोयर सुतक नव्हते.

रसिकांची दाद मिळाल्यावर कोणत्याच कलाकाराची थांबायची इच्छा नसते, तसंच या पावसाचं झालं.

इकडे प्रचंड पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी…

आणि तिकडे माझ्या पोटात भुकेचा वणवा पेटलेला…

काय विरोधाभास…!

पाठीवर जवळपास 100 किलोच्या बॅगचे ओझे, बाईकच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या आकाराच्या बॅगा खचाखच भरलेल्या, या बॅगेच्या आजूबाजूने जागा मिळेल तिथे काठ्या कुबड्या अडकवलेल्या…

हे सर्व सांभाळत रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत असताना, पावसाने अजूनही ढोलकी वाजवणे थांबवले नव्हते. जणू त्याची माझ्याशी जुगलबंदी चालू होती…

मुळात काळा सावळा असलेला मी, आज या पावसाने मला गोरा मोरा केला…!

शेवटी या जुगलबंदीत मी जाहीर हार पत्करली आणि गाडी साईडला लावून थांबलो.

संपूर्ण भिजलो होतो, रेनकोटच्या जॅकेटचा काहीही उपयोग नव्हता, आता अंगात ओल्या कपड्यांमुळे अंगात थंडी भरली. मी कुडकुडायला लागलो.

शेजारीच चार तकलादु बांबू रोवून त्यावर फ्लेक्स अंथरलेली एक मोडकी तोडकी वडापावची टपरी होती, एक आजी तिथे वडे तळत होती आणि त्याचा खमंग सुवास सुटला होता.

शाळेत न जायचा हट्ट करणाऱ्या मुलाला, त्याच्या आईने हाताला धरून फरपटत ओढत न्यावं, तसं भुकेने मला या वडापावच्या गाडीपर्यंत नेलं.

आजी वडे तळण्यात गुंग होती, वय असेल सत्तरीचं, चेहऱ्यावर सुरकुत्या, प्रत्येक सुरकुती दुष्काळी भागातल्या जमिनीसारखी भेगाळलेली, तरीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात ममता…!

‘वडापाव खायचा आहे का रे बेटा…? ‘

आजीच्या वाक्याने माझी तंद्री भंगली.

‘हो आजी’…

आजी मला बेटा म्हणाली, मला कौतुक वाटलं.

कढईतला गरम गरम एक वडा तिने पावात खोचून दिला, पावातून निम्मा बाहेर आलेला तो गरमागरम वडा जणू माझ्याचकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होता.

“गरम गरम” वडा पोटातली “आग” विझवणार होता… इथेही पुन्हा विरोधाभासच..!

‘वडा गरम आहे बेटा, सावकाश खा तोंड भाजेल… ‘

आजीचं मायेचं वाक्य ऐकून या थंडीतही मला ऊब जाणवली.

‘अजून एक खा बेटा धर’, म्हणत तिने दुसरा गरम गरम वडापाव माझ्या हाती न मागता दिला.

आजीला कसं कळलं मला भूक लागली असावी…?

मी विचार करत राहिलो.

आजी आजीच असते, नातवांसाठी ती घोडा घोडा होते, झुक झुक आगीनगाडी होते… जेवू घालताना तिच्या हातावर मोर सुद्धा येतो, आणि तो नाचतो… हो मी पाहिलंय मोराला नाचताना…!

ती कधी उंट होते, कधी मांजराचे आवाज काढते, डावा हात उजव्या कानाला धरून, उजवा हात त्यामधून घालून सोंड दाखवत ती हत्ती सुद्धा होते… आजीला सगळंच कसं येतं बुवा…?

आजीच्या मांडीवर तिच्या मऊसूत पदराखाली झोपताना कशाचीही भीती वाटत नाही. गालावरून फिरणारा तीचा खरबरीत हात मात्र तिच्या भूतकाळाची जाणीव करून देत असतो, पण ती कधीच सांगत नाही…

आई बाबा कधी ओरडून एखादा फटका मारायला आले तर आजी नातवंडाना पाठीमागे उभी करून, स्वतः पुढे येते आणि त्यावेळी ती ढाल होते… खरंच आजीला सगळंच कसं येतं…?

आजीला हिशोब मात्र येत नाही…

एक चपाती हाताने खायला घालून म्हणते, आत्ताशी कुठं अर्धी खाल्ली, जेवताना एक चपाती मागितली तर ती दोन देते आणि म्हणते खा एकच आहे…

कधी साडी घेऊ का म्हटलं तर म्हणते, नको रे बाबा ट्रंकेत तर पाच पन्नास पडून आहेत… ट्रंकेत बघितलं तर, आजोबांनी घेतलेल्या तीन-चार विरलेल्या साड्या असतात फक्त..

आजीला सगळं येतं, मात्र हिशोब काही येत नाही…!!!

माझी आजी अशीच होती, हि सुद्धा का कोण जाणे पण मला तशीच भासली…

बरोबरच आहे, “आजी” हे एक मायेचं आभाळ आहे, आणि जगातून कुठूनही पाहिलं तरी आभाळ सारखंच दिसतं ना…?

‘अजून एक खाणार का बेटा… ‘ 

आजीने पुन्हा माझी तंद्री तोडली.

नम्रपणे मी नको म्हणत, आजीला किती पैसे झाले विचारले.

म्हणाली, ‘दोन वडापाव ना? तीस रुपये झाले बेटा’

पैसे देण्यासाठी पॅन्ट मधल्या एका खिशात मी हात घातला तिथे पैसे मिळाले नाहीत, मी दुसऱ्या खिशात हात घातला, मागच्या खिशात हात घातला, गडबडीने रेनकोट काढून शर्टाच्या खिशात हात घातला, पैसे कुठेही सापडले नाहीत. मी बावचळलो… गोंधळलो…!

हां, आठवलं, आपण पैशाची बॅग मोटरसायकलवर अडकवलेल्या बॅगांमध्ये ठेवली आहे… मग मी मोटरसायकलवर ठेवलेल्या बॅगांची उचकापाचक करायला लागलो. ती सुद्धा बॅग काही केल्या सापडेना…

गडबडीत पडली की काय…? या विचाराने माझा थरकाप झाला… त्यात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असतात.

तावातावाने मी बॅग शोधत होतो आणि बॅग मिळत नव्हती.

बॅगेच्या विचाराने मी अक्षरशः रडकुंडीला आलो…

आजीचं लक्ष होतं, म्हणाली, 30 रुपयांसाठी एवढं रडकुंडीला येऊ नको बाळा, नंतर दिले तरी चालतील.

 ‘तसं नाही आजी पण… ‘

 माझं वाक्य तोडत आजी मृदू आवाजात, मायेनं म्हणाली, ‘ अरे बाळा कळतंय मला, कधी पैसे असतात तर कधी नसतात. तू एखाद्या खेड्यातल्या गरीबा घरचा दिसतोस. ‘

‘ गावाकडचं घर सोडून, नशीब काढायला इथं कुठल्यातरी कंपनीत कमी पगारावर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असशील ना…?

अशी खूप मुलं आजी आजी म्हणत येतात माझ्याकडं, ती पदराला हात पुसत म्हणाली… ‘

डिलिव्हरी बॉय…?? आजी मला डिलिव्हरी बॉय का समजली असेल…?

ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

हाताने बॅग शोधणे सुरूच होते.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

मीनल केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ड्रायव्हरलेस टॅक्सी आली म्हणे… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – मीनल केळकर ☆

आता किचनलेस बायको कधी येणार?

काल मोबाईलवर ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाडीचा व्हिडिओ पाहिला आणि नेमकी कामवाली बाई सुट्टीवर गेल्यामुळे सिंकभर भांडी, न तापवलेलं दूध आणि कुकरच्या टेन्शनमध्ये स्वयंपाकघरात पोळपाट-लाटणं घेऊन उभ्या असलेल्या माझ्या मनात दिवसाढवळ्या स्वप्न रंगू लागली! गाडीत ना ड्रायव्हर, ना हॉर्न वाजवणारा काका… सगळं ते नवीन मशीन म्हणजे AI स्वतः करत होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केलीये तर देवा, हे तंत्रज्ञान आमच्या किचनमध्ये आधी पाठव! आणि जो माणूस हे किचनचं मशीन शोधेल, त्याच्या पायाचं तीर्थ मी रोज सकाळी घेईन; कारण रस्त्यापेक्षा याची खरी गरज आमच्या भारतीय किचनमध्येच आहे.

सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून मी त्या मशीनपेक्षा जास्त अपडेटेड असते. डोळे उघडायच्या आधीच प्रोसेसर सुरू होतो– मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंचा चहा, गॅसवर दूध आणि फ्रिजमधल्या उरलेल्या भाज्या कशा संपवायच्या या विचारात मी गाढ झोपेतून उठते. मी स्वतः अजून पूर्ण जागी नसते, तोच हॉलमधून नवरोबांचा पहिला प्रश्न येतो, “चहा झाला का? ” अहो, मी काय रोबोट आहे? पण त्यांना चहा मात्र वेळेवर हवा असतो!

जरा कल्पना करा, उद्या जर हे मशीन किचनमध्ये आलं तर काय होईल? सकाळी नवरा म्हणाला, “चहा दे, ” तर मशीन उत्तर देईल, “तुम्ही काल चहाचा कप सिंकमध्ये ठेवला नव्हता, आज तुमची सेवा तात्पुरती बंद आहे! ” तिथेच मुलगा तोंड वेडंवाकडं करून म्हणाला, “आई, तू रोजच काय पोहे करतेस? ” तर मशीन म्हणेल, “बाळा, मागच्या आठवड्यात दोनदा सँडविच आणि तीनदा पास्ता खाल्लाय, विसरलास का? गपचूप पोहे खा, नाहीतर आजचा डबा कॅन्सल! ” इतक्यात त्याने मोजे विचारले तर मशीन सांगेल, “जिथे काल फेकून दिले होते, तिथेच आहेत, स्वतः जाऊन उचल! ” दुपारच्या जेवताना सासूबाई म्हणाल्या, “आज भाजीत मीठ जास्त झालंय, ” तर मशीन लगेच रेकॉर्ड दाखवेल, “हो सासूबाई, मागच्या १७ वर्षांत तुमच्याकडून हीच कमेंट तब्बल ३, ४२८ वेळा आली आहे! ” एवढ्यावरच त्या थांबणार नाहीत, ऐनवेळी म्हणतील, “पोळ्या कमी कर, आज भात जास्त खाणार! ” तेव्हा मशीन डोक्याला हात लावून म्हणेल, “सकाळी तीन पोळ्या सांगितल्या होत्या, त्यानुसार पीठ मळलंय. आता सिस्टीम बदलणार नाही, भातातच ॲडजस्ट करा! “

खरी मजा संध्याकाळी येईल. मी सोफ्यावर निवांत चहा पित बसेन आणि नवरा पाऊस बघून म्हणतील, “गरम गरम भजे कर ना गं! ” मी म्हणेन, “मला काय विचारता? जा मशीनला विचारा, आज मी फक्त युझर आहे! ” नवरा किचनमध्ये जाताच मशीन ओरडेल, “तुमचे वजन दोन किलो वाढले आहे आणि घरात बेसनही संपले आहे. भज्यांचा विचार सोडा आणि गुपचूप शेपूची भाजी खा! “

इतक्यात दाराची बेल वाजते आणि कोणतेही ‘नोटीफिकेशन’ न देता दोन पाहुणे हसत-हसत अवतरतात– “म्हटलं चहा-पाणी करून जावं. ” नवरा सांगतो, “पटकन चहा आणि काजूचा शिरा बनव! ” तेव्हा ते मशीन फ्रिज उघडून डबे तपासेल आणि वायर हायव्होल्टेज होऊन ओरडेल, “अलर्ट! घरात चहाची पत्ती एकच चमचा आहे आणि शिऱ्यासाठी दूधच नाहीये! पाहुण्यांनो, येताना व्हॉट्सॲप का नाही केलं? माझी सिस्टीम क्रॅश होत आहे! ” शेवटी पाहुण्यांचा पाहुणचार करून रात्री सिंकमधला डोंगराएवढा भांड्यांचा पसारा पाहून बिचारं मशीन हँग होईल आणि स्क्रीनवर मेसेज येईल, “सिस्टम एरर! भारतीय कुटुंबाचा पसारा, नखरे आणि बिनबोलावलेले पाहुणे सांभाळण्याची माझी क्षमता नाही! “

अमेरिकेच्या रस्त्यावर गाडी चालवणं सोपं आहे हो, पण भारतीय घरात चार लोकांच्या वेगवेगळ्या आवडी आणि ऐनवेळचे नखरे सांभाळणं कठीण आहे! एकाला तिखट नको, दुसऱ्याला भेंडी नको, नवऱ्याला रोज नवीन हवं, सासूबाईंना ऐनवेळी भात हवा आणि फ्रिजमध्ये फक्त दोन सुकलेल्या सिमला मिरची नि टोपलीत दोन बटाटे! अशा वेळी त्या दोन बटाट्यांमध्ये पाहुण्यांसह अख्ख्या घराला खुश ठेवणं, हे कोणत्याही मशीनच्या बापालाही जमणार नाही! म्हणूनच, ज्या दिवशी ते मशीन स्वतः फ्रिज बघून काय बनवायचं याचं उत्तर शोधेल, त्या दिवशी जगातल्या सर्व बायका टाळ्या वाजवून म्हणतील, “आता खरंच विज्ञान प्रगत झालं! ” काय मग गृहिणींनो, पटतंय ना?

“बाईशिवाय चालणारं भारतीय किचन’ बनवणं विज्ञानाला कधीच जमणार नाही! कारण मशीनमध्ये फक्त डेटा आणि कोडिंग असतं… पण भारतीय किचनमध्ये लागणारा अचूक ‘अंदाज’, चवीची ‘जादू’ आणि कुटुंबासाठी असणारं ‘प्रेम’ कोणत्याही कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करता येत नाही. गृहिणीचा २४ तास चालणारा प्रोसेसर आणि तिची माया… या तोडीचं तंत्रज्ञान जगात कुठेच तयार होऊ शकत नाही! “

लेखिका : सौ. तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड

 (लेख आवडल्यास नावासोबत शेअर करा, ही विनंती.) 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५९ – – – 

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |

मनी कामना राम नाही जयाला |

अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||

अर्थ : हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील?

(कल्पिता – कल्पना करणे, कल्पकोटी – अनंत/ नाना प्रकारच्या)

विवेचन : आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.

समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.

कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.

परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.

भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.

पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?

२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?

३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?

४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?

– – – – – 

श्लोक क्र. ६० – – – 

मना राम कल्पतरू कामधेनू |

निधी सार चिंतामणी काय वानू|

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|

तया साम्यता कायसी कोण आता |६०|

अर्थ : हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी… सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल?

(चिंतामणी – इच्छिलेली वस्तू देणारा, वानू – वर्णन करू)

विवेचन : या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.

कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी.

प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, “जो जे वांछील, तो ते लाहो. ” म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो. अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.

वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे? तर त्याच्यासारखा तोच!

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील?

व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा, त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ” काय उणे आम्हा विठोबाचे पायी? ” अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही.

स्वसंवाद :: 

१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?

२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे? ” अशी तृप्ती आहे?

३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?

४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक श्लोक ५९ आणि ६०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

(आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती..! ) 

इथून पुढे – – 

पंचवीस वर्षांचा काल उलटला आणि इंडियन मिलिटरी अकादमीच्या क्र. ८८-नियमित अभ्यासक्रम-७१व्या तुकडीचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची कल्पना काही माजी अधिका-यांच्या मनात आली. कर्नल सजन मोईद्दीन आणि दिवंगत जोसेफ साहेबांच्या सोबत एन. डी. ए. मध्ये आणि पुढे इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकी-अधिका-यांनी त्यांच्या तुकडीचा रौप्य महोत्सव २४ जून, २०१६ रोजी साजरा करण्याचा कार्यक्रम आखला.

निवृत्त अधिकारी, जवान यांच्या घरी संपर्क साधण्यात आला. एक देखणा कार्यक्रम आयोजित केला… अगदी परदेशातूनही सैनिक-कुटुंबे आली होती. या तुकडीतील १९ अधिकारी देशसेवेत हौतात्म्य प्राप्त करते झाले होते… या १९ अधिका-यांची त्या यादी विक्रम गिल साहेबांनी तयार केली… त्यात जोसेफ साहेबांचे नाव अग्रस्थानी होते. सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले… उपस्थित सर्वांना स्मृतीचिन्हे देण्यात आली… पण या नातेवाईक लोकांत E. जोसेफ साहेबांचे कुणी नव्हते…! कारण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यांच्या पत्त्यावर पाठवलेली सर्व पत्रं माघारी आली होती. आणि संपर्क जरी झाला असता तरी केरळमधून नागालँड मध्ये पोहोचायचे तर खर्च, प्रवास व्यवस्था… कितीतरी समस्या आल्याच असत्या आणि एकतर एवढे दूरचे अंतर! पण कार्यक्रमात काही अधिका-यांच्या मनात एक शल्य निश्चित होतं… जोसेफ साहेब असते तर? किमान त्यांचे आई-वडील तरी आज इथं पाहिजे होते!

समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या कुटुंबियांना स्मृतीचिन्हे त्यांच्या घरी नेऊन देण्याची व्यवस्था करण्यात आली. दक्षिणेत कर्तव्यावर असलेल्या एका केरळी अधिका-यावर जोसेफ कुटुंबियांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी खूप नेटाने शोध घेत दोन महिन्यांनी केरळ मधल्या ग्रामीण भागात जाऊन जीवन कंठणा-या निवृत्त सुभेदार मेजर जोसेफ साहेब यांच्या घराचा शोध लावला… आपल्या लेकाच्या नावाचे स्मृतिचिन्ह पाहून जोसेफ साहेब आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले… आणि बोलण्याच्या ओघात सौ. जोसेफ म्हणाल्या… ”माझ्या लाडक्या लेकाचा चेहराही मला शेवटचा पाहता आला नाही! त्याच्या कबरीवर फुलं वाहून मला त्याला श्रद्धांजली वाहायची होती… आणि त्याचे आभार मानायचे होते! देवाने मला इतका शूर मुलगा दिला… त्याचा अभिमान आहे मला! … पण तो इतक्या दूर आहे त्याच्या कबरीत विसावलेला… माझ्या जीवनाची संध्याकाळ नजीक आली आहे… बहुदा त्याची आणि माझी भेट देवाच्या घरीच होणार आता… ” आणि पुढे अश्रूंचा महासागर लोटला… सायंरेषा अधिकाधिक गडद होत गेल्या!

स्मृतिचिन्ह घेऊन गेलेला अधिकारी एका निश्चयाने परतला. सर्व माजी अधिकारी एकत्र बसले… आणि त्यांनी निश्चय केला… आपल्या मित्राला त्याच्या आईकडे पाठवायचेच! आणि सुरु झाला एका शूर मुलाच्या देहाच्या अवशेषांचा त्याच्या आईपर्यंतचा प्रवास!

जोसेफ साहेबांच्या कबरीचा शोध घेणे हे मोठे जिकीरीचे काम होते. लष्करी परिसरात अंत्यविधी झाला होता… तरीही ही जागा तशी विस्मरणात गेली होती. पण कागदपत्रे आणि इतर बाबी तपासल्या असता कोहिमा मध्ये चाकाबामा येथे एकूण सहा कबरी सापडल्या… चार मुस्लीम अधिका-यांच्या तर दोन ख्रिस्ती अधिका-यांच्या. त्यातील जोसेफ साहेबांची कबर शोधण्यात आली… मित्रांना त्यांचा मित्र पुन्हा गवसला होता.!

हुतात्मा जोसेफ साहेब एन. डी. ए. खडकवासला च्या ७८व्या तुकडीचे विद्यार्थी. त्यांचे सहपाठी पुढे नौदल, वायुदल आणि पायदळात अधिकारी झाले होते… त्यातले बहुतांश आता सेवानिवृत्त झालेले होते. या सर्वांशी संपर्क साधला गेला. आणि काही वेळात मोठी रक्कम जमा झाली.

कर्नल अतुल सालुखे साहेबांनी वायूसेनेतून निवृत्त झालेल्या आणि त्यावेळी इंडिगो विमान कंपनीत वैमानिक असलेल्या कॅप्टन मनोज कुमार यांच्या कानांवर एक गोष्ट घातली… त्यांच्या पुढाकाराने इंडिगो विमान कंपनीने जोसेफ साहेबांच्या कुटुंबियांची आणि जोसेफ साहेबांच्या अवशेषांसाठी विनामूल्य प्रवास व्यवस्था करून दिली. वाटेतील प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था संबंधीत ठिकाणच्या लष्करी केंद्रामधील सैनिक, अधिका-यांनी मोठ्या विनयाने आणि बंधू भावनेने करून दिली.

या दरम्यान सर्व सैनिकी अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली होती… आणि न भूतो असा निर्णय घेण्यात आला… भारतीय सैन्यातील अत्यंत वरिष्ठ अधिका-यांनी एका अत्यंत भावनिक निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला… जोसेफ साहेबांना त्यांच्या घरी पाठवण्याचा… लष्करी इतमामात! सर्व कागदपत्रे, परवानग्या मिळवण्यात आल्या. ११ ऑक्टोबर, २०१६… जोसेफ कुटुंबीय कोहिमा येथे पोहोचले… जड पावलांनी त्या सर्वांनी दफनभूमीत प्रवेश केला… आईच्या अश्रूंनी कबरीवरची माती ओलीचिंब झाली… तिथल्या गवतावर उगवलेली नाजूक फुलं कावरीबावरी झाली!

कबर विधीवत उकरण्यात आली… प्रार्थना सुरु होत्या… साहेबांचे अवशेष मोठ्या सन्मानाने गोळा करण्यात आले… एका स्वतंत्र शवपेटीत बंदिस्त करण्यात आले… त्यावर राष्ट्रध्वज पांघरला गेला… सलामी झाली… बिगुल वाजला… एक सैनिक अधिकारी आपल्या आईच्या घरी निघाला… १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी कोची विमानतळावर जोसेफ साहेबांचे पार्थिव पोहोचले… स्थानिक पोलिस, लष्करी अधिका-यांनी पुष्पचक्रे वाहिली… मिरवणूक निघाली… कंजारीमोत्तम इथल्या ख्रिस्ती दफनभूमीत खास व्यवस्था केली गेली होती… कबर तयार होती… १४ ऑक्टोबर रोजी विशेष प्रार्थना सभा आयोजित करून होली क्रॉस चर्च येथे भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा सेकंड लेफ्टनंट ई. टी. जोसेफ साहेब यांना कायमचा निरोप देण्यात आला! आठ हजार आठशे नव्वद दिवसांनी पोरगं आईकडे परतले होते… आता आई थ्रीसिएम्मा रोज तिच्या लाडक्या लेकाच्या कबरीवर फुलं वाहायला जाऊ शकणार होती… जोसेफ साहेबांच्या मित्रांनी अत्यंत निकराने प्रयत्न करून हेही ऑपरेशन यशस्वी करून दाखवले होते! प्रशिक्षण आणि सैन्यसेवेमध्ये जीवाला जीव देणा-या अधिका-यांनी आपल्या साथीदाराची साथ अखेरपर्यंत सोडली नाही… जय हिंद… जय हिंद की सेना!

(सैनिकांचा इतिहास जिवंत रहावा यासाठी कार्यरत असणा-या उमाताई कुळकर्णी यांच्या पोस्टवरून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

काळ्या ढगांवर देवा

क्लिक कर ना माउस

आमच्या पृथ्वीवर आता

पाड ना धो धो पाऊस

पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा

सिमेंटच्या जंगलांचा कहर

बदलून दे ना आता

हिरवागार स्क्रीन सेव्हर

 *

ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर

देवा करून घे अपडेट

नाहीतर उन्हाळ्यात गारा

अन पावसाळ्यात ऊन थेट

 *

जास्त पाणी साठवण्या

हार्ड डिस्कची वाढवून घे जागा

पावसासाठी आम्हाला का

करावा लागतो त्रागा

 *

समुद्री वादळांचा धोका

मान्सूनला नेतो पळवून

त्यांचा बंदोबस्त कर तू

ANTI वायरस चालवून

 *

पाऊस झटपट पाडण्या

देवा वाढवून घे RAM

नाहीतर म्हणावे लागेल

आम्हाला हे राम

 *

देवा इंजिनिअर बोलावून

सिस्टम अपग्रेड करण्यास सांग

नाहीतर पावसावाचून आमचे

जगणे व्हायचे HANG…

कवी : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता” – लेखिका : सुश्री रेणू दांडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता” – लेखिका : सुश्री रेणू दांडेकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता

लेखिका : रेणू दांडेकर

पृष्ठ: १०२

मूल्य: १५०₹ –

लेखिकेचे मनोगत :: 

‘भगवद्गीता’ हा महाभारतातील एक भाग आहे. संस्कृतमधील सातशे श्लोकांचे ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांत रूपांतर केले. प्रश्न असा पडला, आपण याचं संक्षिप्त रूप कसं करायचं? भगवद्गीतेत काय आहे, सोप्या भाषेत समजून घ्यावं, असं ठरवून मी ‘गीता’ वाचत राहिले. समजलं ते लिहायचं ठरवलं आणि लिहायला घेतलं. लिहीत राहिलं तर वाटत होतं अजून अपूर्ण आहे. तहानच भागेना. या निमित्तानं समजून घेतलेलं लिहीत गेले. मुलांसाठी ती एक युद्धकथा आहे आणि मुलांना युद्धकथा आवडतात, पण ही युद्धकथा इतर युद्धांपेक्षा वेगळी आहे. कारण या युद्धकलेत रणांगणावर सगळे असतात, पण युद्धच सुरू होत नाही. आपल्याला वाटेल की, मग कौरवांनी युद्धाला सुरुवात करायची ना! अठराव्या अध्यायापर्यंत कृष्ण, अर्जुनाला, त्याच्या गोंधळलेल्या, निराश झालेल्या मनाला, मारू की मारू नको, या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तयार करतो. अशी अवस्था मुलांची होते, पण कृष्ण ज्या पद्धतीने अर्जुनाला युद्धासाठी तयार करतो, ती पद्धत खूप महत्त्वाची वाटते. कृष्ण आज्ञा करत नाही, सक्ती करत नाही, तर कृती मागील कारणमीमांसा करताना दिसतो. अर्थात हे सारं तत्त्वज्ञान मुलांसाठी सोपं करताना अवघड होतं.

हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं महाभारत आजही तेवढंच आपल्या जीवनाला व्यापून आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी मुलं ‘गीते’तील काही अध्याय पाठ करताना दिसतात आणि अनेक मोठ्या माणसांची संपूर्ण ‘गीता’ पाठ असते, पण आजच्या विज्ञान युगात मुलांना अर्थ समजणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. असं वाटलं, की प्रत्येक अध्यायाचा अर्थ, त्यांतील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मुलांना सांगितलं, तर मुलांना भगवद्‌गीतेत रुची वाटू शकेल. काळ बदलला तरी आपली अवस्था आणि अर्जुनाची अवस्था एका पातळीवर सारखीच आहे. फक्त गरज आहे ती अवघड असलेली कृष्णाची भूमिका घेण्याची. म्हणून जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल, तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा हा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेबद्दल आदर असूनही, कुठेही शक्यतो संस्कृत शब्द वापरला नाही. अध्यायाचा मुलांना समजेल अशा भाषेत तो अध्याय आणि अध्यायाच्या शेवटी चौकटीत तत्त्वज्ञानाची जमेल तेवढ्या सोप्या भाषेत, वैचारिक मांडणी केली आहे.

– लेखिका रेणू दांडेकर 

 – – – बाहेरच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुसती पोटार्थी विद्या संपादन न करता खऱ्या अर्थाने ज्ञान संपादन करण्याची गरज आहे. त्यासाठी प्राचीन ज्ञान-वारशाशी नाळ जोडली पाहिजे. हा वारसा म्हणजे प्राचीन काळात लिहिले गेलेले ग्रंथ. वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगले पाहिजे, याचे ज्ञान देणारे भांडारच! आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी हताश न होता आपले कर्म म्हणजेच काम निष्ठेने करणे, मूल्यांना, तत्त्वांना धरून जगणे, निसर्गाचा, आपल्या आजूबाजूच्या सजीवांचा विचार करणे किती आवश्यक आहे, याचे ज्ञान या ग्रंथांतून मिळते. माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कारक्षम वयात या ज्ञानवारशाचा अभ्यास करावा, त्यातून त्यांच्यावर भावनिक आणि तात्त्विक संस्कार व्हावेत, या उद्देशाने या पुस्तक संचाची निर्मिती रेणू दांडेकर यांनी केली आहे. तत्त्वज्ञानाचा हा वारसा आपण जपावा आणि पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करावा, यासाठी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३२६ ☆ बालश्रम निषेध के संदर्भ में… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख बालश्रम निषेध के संदर्भ में। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

(डॉ मुक्ता जी द्वारा रचित एक भजन – मेरे मन चढ़ी नाम खुमारी / स्वर- विभा जी योगाश्रम प्रस्तुति, सौजन्य – तरूनम चैनल)

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३२६ ☆

☆ बालश्रम निषेध के संदर्भ में… ☆ डॉ. मुक्ता ☆

मज़दूरी इनकी मजबूरी

‘मज़दूरी इनकी मजबूरी’ एक विवादास्पद विषय है, जो अनेक प्रश्नों व समस्याओं को जन्म देता है। अनगिनत पात्र मनोमस्तिष्क में ग़ाहे-बेग़ाहे दस्तक देते हैं, क्योंकि लम्बे समय तक मुझे इनके अंग-संग रहने का अवसर प्राप्त हुआ है। यह पात्र कभी लुकाछिपी का खेल खेलते हैं; कभी करुणामय नेत्रों से निहारते हैं; कभी व्यंग्य करते भासते हैं– मानो विधाता के न्याय पर अंगुली उठा रहे हों।

—कैसा न्याय है यह? जब सृष्टि-नियंता ने सबको समान बनाया है— सब में एक-सा रक्त प्रवाहित हो रहा…तो हमसे दोयम दर्जे का व्यवहार क्यों? एक ओर बड़ी-बड़ी अट्टालिकायों में रहने वाले लब्ध- प्रतिष्ठित धनी लोग और दूसरी ओर झुग्गी-झोपड़ियों में रहने वाले, खुले आकाश के नीचे ज़िन्दगी बसर करने वाले लोगों में इतनी असमानता क्यों? हमारे देश में इंडिया और भारत में वैषम्य क्यों… ये प्रश्न अंतर्मन को निरंतर कचोटते हैं तथा अत्यंत चिंतनीय, व विचारणीय हैं। जब हम मासूम बच्चों को मज़दूरी करते देखते हैं; तो आत्मग्लानि होती है। ढाबे पर बर्तन धोते; चाय व खाना परोसते, रैड लाइट पर गाड़ियां साफ करते; फल-फूल, खिलौने आदि खरीदने का अनुरोध करते; सड़क किनारे अपने छोटे भाई-बहिन का ख्याल रखते; जूठन को देख अधिक पाने के निमित्त एक-दूसरे पर झपटते-झगड़ते, मरने -मारने पर उतारू नंग-धड़ंग बच्चों को देख हृदय में उथल-पुथल ही नहीं होती, एक आक्रोश फूट निकलता। इतना ही नहीं, रेलवे स्टेशन पर बूट- पालिश करते; ट्रेन में अपनी कमीज़ से कंपार्टमेंट की सफाई करते व कंधे पर अखबार व मैगज़ीन का भारी-भरकम बोझ लादे बच्चों को देख, उनकी ओर ध्यान स्वतः आकर्षित हो जाता और हृदय उनकी मजबूरी के बारे में जानने को आतुर-आकुल हो, प्रश्नों की बौछार लगा देता है। बालपन में इन दुश्वारियों से जूझते मासूम बच्चों की अंतहीन पीड़ा व अवसाद के बारे में जानकर हृदय द्रवित हो जाता…कलेजा मुंह को आता। परंतु हम उनके प्रति सहानुभूति प्रकट करने के अतिरिक्त कुछ कर पाने में, स्वयं को विवश, असमर्थ व असहाय पाते हैं।

मुझे स्मरण हो रही है– एक ऐसी ही घटना, जब मैं गुवाहाटी की ओर जाने वाली ट्रेन की प्रतीक्षा में दिल्ली रेलवे-स्टेशन पर बैठी थी। सहसा बच्चों के एक हुजूम को वेश-भूषा बदलते; स्वयं को मिट्टी से लथपथ करते; घाव दर्शाने हेतु रंगीन दवा व मरहम लगाते; एक जैसी टोपियां ओढ़ते देख… मैं अपनी भावनाओं पर नियंत्रण नहीं रख पायी और एक बच्चे से संवाद कर बैठी। परंतु वह मौन रहा और थोड़ी देर के पश्चात् एक व्यक्ति उन सब के लिए भोजन लेकर आया। भोजन करने के पश्चात् वे अपने-अपने गंतव्य की ओर बढ़ गए तथा उस बच्चे ने मेरी जिज्ञासा के बारे में अपने मालिक को जानकारी दी। वह मुझे देर तक घूरता रहा… मानो देख लेने की अर्थात् अंजाम भुगतने को तैयार रहने की चेतावनी अथवा धमकी दे रहा हो…और चंद मिनट बाद ही मुझे उसका ख़ामियाज़ा भुगतना पड़ा।

बच्चे ट्रेन के अलग-अलग डिब्बों में सवार हो गए। परंतु उस गैंग के बाशिंदों ने मुझे ट्रेन में नहीं चढ़ने से बहुत समय तक रोके रखा। चार-पांच लोग, जिनमें एक युवती भी थी… वे सब ए•सी• कंपार्टमेंट के दरवाज़े के बीच रास्ता रोक कर खड़े हो गए और बड़ी ज़द्दोज़हद के पश्चात् मैं उनके व्यूह को तोड़, भीतर प्रवेश पाने में सफल हो पायी। मुझे सीट पर पहुंचने में भी उतनी ही कठिनाई का सामना करना पड़ा। टी•टी• के आने के पश्चात् मैंने टिकट निकालने के लिए जैसे ही पर्स में हाथ डाला, मैं सन्न रह गयी। मेरा मोबाइल व पैसे पर्स से ग़ायब हो चुके थे। ट्रेन  चलने के कारण मैं कोई कार्यवाही भी नहीं कर सकती थी, क्योंकि जहां घटना घटित होती है; शिकायत भी वहीं दर्ज कराई जा सकती है। इस बीच  वे लोग अपने मिशन को अंजाम देकर उस डिब्बे से रफू-चक्कर हो चुके थे।

मैं हैरान-परेशान-सी पूरा रास्ता यही सोचती रही… कितने शातिर हैं वे लोग…जो इन बच्चों से भीख मांगने का धंधा करवाते हैं और यह बच्चे भी डर के मारे उनके इशारों पर नाचते रहते हैं। यह भी हो सकता है कि इनके माता-पिता इन कारिंदों से, रात को बच्चों की एवज़ में पैसा वसूलते हों। वैसे भी आजकल छोटे बच्चों को तो शातिर महिलाएं किराए पर ले जाती हैं …अपना धंधा चलाने के निमित्त और रात को उनके माता-पिता को लौटा जाती हैं… दिहाड़ी के साथ। जहां तक दिहाड़ी का संबंध है, बच्चों व महिलाओं को कम पैसे देने का प्रचलन तो आज भी बदस्तूर जारी हैं। वैसे भी बाल मज़दूरी तो दण्डनीय कानूनी अपराध है। परंतु इन बच्चों के सक्रिय योगदान के बिना तो बहुत से लोगों का धंधा चल ही नहीं सकता।

सुबह जब बच्चे, कंधे पर बैग लटकाए, स्कूल बस या कार में यूनीफ़ॉर्म पहनकर जाते हैं, तो इन मासूमों के हृदय का आक्रोश सहसा फूट निकलता है और वे अपने माता-पिता को प्रश्नों के कटघरे में खड़ा कर देते हैं। वे उन्हें स्कूल भेजने की अपेक्षा; उनके हाथ में कटोरा थमाकर भीख मांगने को क्यों भेज देते हैं? उनके साथ यह दोग़ला व्यवहार क्यों?

माता-पिता भाग्य व नियति का वास्ता देकर उन्हें समझाते हैं कि यह उनके पूर्व-जन्मों का फल है, सो! यह सब तो उन्हें सहर्ष भुगतना ही पड़ेगा। परंतु बच्चों को उनके उत्तर से संतोष नहीं होता। उनके कोमल मन में समानाधिकारों व व्यवस्था के प्रति आक्रोश उत्पन्न होता है और वे उन्हें आग़ाह करते हैं कि वे भविष्य में कूड़ा बीनने व भीख मांगने नहीं जायेंगे और न ही मेहनत-मज़दूरी करेंगे। वे भी शिक्षा प्राप्त करना चाहते हैं; उन जैसा जीवन जीना चाहते हैं। जब भगवान ने सबको समान बनाया है, तो हमसे यह भेदभाव क्यों? इस स्थिति में उनके माता-पिता मासूम बच्चों के प्रश्नों के सम्मुख निरुत्तर हो जाते हैं।

चलिए! रुख करते हैं–घरों में काम करने वाली बाईयों की ओर…जिन्हें उनके परिचित सब्ज़बाग दिखा कर दूसरे प्रदेशों से ले आते हैं और उन्हें बंधक बना कर रखा जाता है। चंद दिनों देह-व्यापार के धंधे में धकेल दिया जाता है; जहां उनका भरपूर शोषण होता है और वे नारकीय जीवन ढोने को विवश होती हैं। हां! कुछ नाबालिग़ लड़कियों को वे दूसरों के घरों में काम पर लगा देते हैं; जिसकी एवज़ में वे मोटी रकम वसूलते हैं। ग्यारह महीने तक वे उस घर में दिन-रात काम करती हैं। परन्तु जब वे घर छोड़ कर, चंद दिनों के लिए अपने गांव लौटती हैं, तो बहुत उदास होती हैं…भले ही काम करना इनकी मजबूरी होता है। परंतु धीरे-धीरे वे मालकिन की भांति व्यवहार करने लगती हैं, जिसका ख़ामियाज़ा घर के बुज़ुर्गों को ग़ाहे-बेग़ाहे अपने आत्म-सम्मान को दांव पर लगा कर चुकाना पड़ता है, क्योंकि वे तो अनुपयोगी अर्थात् बोझ होते हैं। सारे घर का दारोमदार तो उन काम वाली बाईयों के कंधों पर होता है और वे तो घर-परिवार के लिए प्राण-वायु सम होती हैं। सो! आजकल तो इनकी मांग ज़ोरों पर है। इसलिए वे बहुत  अधिक भाव खाने लगी हैं।

परंतु कई घरों में तो उनका शोषण किया जाता है। दिन-रात काम करने के पश्चात् उन्हें पेट-भर भोजन भी नहीं दिया जाता। साथ ही उन्हें बंधक बनाकर रखा जाता है; मारा-पीटा जाता है और शारीरिक- शोषण तक भी किया जाता है। अक्सर उनकी तनख्वाह भी वे कारिंदे वसूलते रहते हैं। सो! वे मासूम तो अपनी मनोव्यथा किसी से कह भी नहीं सकतीं। जुल्म सहते-सहते, तंग आकर वे भाग निकलती हैं और आत्महत्या तक कर लेती हैं। सो! आजकल तो एजेंटों का यह धंधा भी खूब पनप रहा है। वे लड़की को किसी के घर छोड़ कर साल-भर का एडवांस ले जाते हैं और चंद घंटों बाद, अवसर पाकर वह लड़की अपने साथ कीमती सामान व नकदी लेकर भाग निकलती है। मालिक बेचारे पुलिस-स्टेशन के चक्कर लगाते रह जाते हैं, क्योंकि उनके पास तो उनका पहचान-पत्र तक भी नहीं होता। वहां जाकर उन्हें आभास होता है कि वे ठगी के शिकार हो चुके हैं। सो! उस स्थिति वे प्रायश्चित्त करने के अतिरिक्त कर ही क्या सकते हैं।

परंतु बहुत से बच्चों के लिए मज़दूरी करना, उनकी मजबूरी बन जाती है… विषम पारिवारिक परिस्थितियों व आकस्मिक आपदाओं व किसी अनहोनी के घटित हो जाने के कारण; उन मासूमों के कंधों पर परिवार का बोझ आन पड़ता है और वे उम्र से पहले बड़े हो जाते हैं। यदि उन्हें मज़दूरी न मिले, तो असामान्य परिस्थितियों में परिवार-जन ख़ुदकुशी तक करने को विवश हो जाते हैं। इसलिए भीख मांगने के अतिरिक्त उनके सम्मुख दूसरा विकल्प शेष नहीं रहता। परन्तु कुछ बच्चों में आत्म-सम्मान का भाव अत्यंत प्रबल होता है। वे मेहनत-मज़दूरी करना चाहते हैं, क्योंकि भीख मांगना उनकी फ़ितरत नहीं होती और उनके संस्कार उन्हें झुकने नहीं देते।

चंद लोग क्षणिक सुख के निमित्त अपनी संतान को जन्म देकर सड़कों पर भीख मांगने को छोड़ देते हैं। अक्सर वे बच्चे नशे के आदी होने के कारण अपराध जगत् की अंधी गलियों में अपना जीवन नष्ट कर लेते हैं। वे समाज में अव्यवस्था व दहशत फैलाने का उपक्रम करते हैं तथा वे बाल-अपराधी रिश्तों को दरकिनार कर, अपने माता-पिता व परिवारजनों के प्राण तक लेने में लेशमात्र भी संकोच नहीं करते। लूटपाट, फ़िरौती, हत्या, बलात्कार, अपहरण आदि को अंजाम देना इनकी दिनचर्या में शामिल हो जाता है। मुझे ऐसे बहुत से बच्चों के संपर्क में रहने का अवसर प्राप्त हुआ। लाख प्रयास करने पर भी मैं उन्हें बुरी आदतों से सदैव के लिए मुक्त नहीं करवा पाई। ऐसे लोग वादा करके अक्सर भूल जाते हैं और फिर उसी दल-दल में लौट जाते हैं। उनके चाहने वाले दबंग लोग उन्हें सत्मार्ग पर चलने नहीं देते, क्योंकि इससे उनका धंधा चौपट हो जाता है।

‘मज़दूरी इनकी मजबूरी’ अर्थात् ऐसे सत्पात्रों पर विश्वास करना कठिन हो गया है, क्योंकि आजकल तो सब मुखौटा धारण किए हुए हैं। अपनी मजबूरी का प्रदर्शन कर लोगों की सहानुभूति अर्जित कर, उनकी भावनाओं से खिलवाड़ कर उन्हें लूटना… उनका पेशा बन गया है। वे बच्चे; जिन्हें मजबूरी  के कारण मज़दूरी करनी है– सचमुच वे करुणा के पात्र हैं। समाज के लोगों व सरकार के नुमाइंदों को उनकी सहायता-सुरक्षा हेतु हाथ बढ़ाने चाहिएं, ताकि स्वस्थ समाज की संरचना संभव हो सके और हर बच्चे को शिक्षा का मौलिक अधिकार प्राप्त हो सके… मानव- मूल्यों का संरक्षण हो सके तथा संबंधों की गरिमा बनी रहे। स्नेह, प्रेम, सौहार्द, सहयोग,परोपकार, सहनशीलता, सहानुभूति आदि दैवीय गुणों का समाज में अस्तित्व कायम रह सके। इंसान के मन में दूसरे की मजबूरी का लाभ उठाने का भाव कभी भी जाग्रत न हो और समाज में समन्वय, सामंजस्य व समरसता का साम्राज्य हो। मानव स्व-पर और राग-द्वेष से ऊपर उठकर एक अच्छा इंसान बन सके।

अंत में मैं यही कहना चाहूंगी, यदि हम सब मिलकर प्रयासरत रहें और एक बच्चे की शिक्षा का दायित्व- निर्वहन कर लें, तो हम दस में से एक बच्चे को अच्छा प्रशासक, अच्छा इंसान व अच्छा नागरिक बना पाने में सफलता प्राप्त कर सकेंगे और शेष बच्चे भले ही जीवन की सुख-सुविधाएं जुटाने में सक्षम न हों;  शिक्षा प्राप्त करने के पश्चात् आत्म- सम्मान से जीना सीख जाएंगे और अपराध-जगत् की अंधी गलियों में भटकने से बच पायेंगे। निरंतर अभ्यास, अथक परिश्रम व निरंतर प्रयास के द्वारा, हमारा  मंज़िल पर पहुंचना निश्चित है। सो! हमें इस मुहिम को आगे बढ़ाना होगा, जैसा कि हमारी सरकार इन मासूम बच्चों के उत्थान के लिये नवीन योजनाएं प्रारम्भ कर रही है; जिसके अच्छे परिणाम हमारे समक्ष हैं। परंतु सकारात्मक परिणामों की प्राप्ति के लिए संविधान में संशोधन करना अपेक्षित व अनिवार्य है। हमें जाति-विशेष को प्रदत्त आरक्षण सुविधा को समाप्त करना होगा; जिसे संविधान के अनुसार केवल दस वर्ष के लिए दिया जाना सुनिश्चित किया गया था। परंतु हम आज तक वैयक्तिक स्वार्थ व लोभ-संवरण के विशेष आकर्षण व मोह के कारण उससे निज़ात नहीं पा सके हैं। सो! हमें अच्छी शिक्षा-प्राप्ति व जीवन-स्तर उन्नत करने के निमित्त, उन्हें आर्थिक-सुविधाएं प्रदान करनी होंगी, ताकि उनमें हीन-भावना घर न कर सके। देश की अन्य प्रतिभाओं को भी प्रतियोगिता में योग्यता के आधार पर समान अवसर प्रदत्त हों और प्रतिस्पर्द्धा में निर्धारित अहर्ताओं के मापदंडों पर सब खरे उतर सकें तथा जाति-पाति के भेदभाव को नकार, वे भी  सिर उठा कर कह सकें…’हम भी किसी से कम नही।’

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रचना संसार # ९९ – गीत – शारदे प्यार दो… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ☆

सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम गीत – शारदे प्यार दो

? रचना संसार # ९९ ?

? गीत – शारदे प्यार दो…  ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’ ? ?

है विनय,आपसे,भक्त को तार दो।

द्वार हम,हैं खड़े,शारदे प्यार दो।।

*

ज्ञान हो,ध्यान हो,वेद की साधना।

हम करें,नित्य ही,मातु आराधना।।

तेज हो,सूर्य सा,कर कृपा हैं शरण।

नंदिता,पूजिता,हैं गिरे हम चरण।।

मीत हो,जीत का,आप उपहार दो।

द्वार हम,हैं खड़े,शारदे प्यार दो।।

*

राह हम,जो चलें,सत्य का पाथ हो।

द्वेष मन,में न हो, श्रेष्ठ का साथ हो।।

हो हृदय,भी विमल,मातु भयहारिणी।

मंत्र हो,प्रेम का,हो जगततारिणी।।

कंठ पे,नाम हो,माँ अमिय धार दो।

द्वार हम,हैं खड़े,शारदे प्यार दो।।

*

यह धरा,देश की,मातु है पावनी।

ताज हो,सिर सदा,शांति की आसनी।।

हम सदा,हों सफल,पूर्ण हर काम हो।

ओम ही,ओम हो,माँ अमर नाम हो।।।

पाप का,नाश हो,हाथ तलवार दो।

द्वार हम,हैं खड़े,शारदे प्यार दो।।

*

पाठ हम,तो पढ़े,मातु बस प्रीति का।

हो सृजन,आप ही,छंद हो गीतिका।।

बुद्धि दो,शुद्धि दो,हाथ माँ थामना।

सब सुखद, हो सरस,बस यही कामना।।

लेखनी,को सदा,आप विस्तार दो।

द्वार हम,हैं खड़े,शारदे प्यार दो।।

© सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’

(सेवा निवृत्त जिला न्यायाधीश)

संपर्क –1308 कृष्णा हाइट्स, ग्वारीघाट रोड़, जबलपुर (म:प्र:) पिन – 482008 मो नं – 9424669722, वाट्सएप – 7974160268

ई मेल नं- meenabhatt18547@gmail.com, mbhatt.judge@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares