☆ ‘तुम्हाला विनोदबुद्धी कुठून मिळाली?‘ – लेखक – कै. पु. ल. देशपांडे प्रस्तुती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
…. ह्या प्रश्नाचे उत्तर मला सुचवणाऱ्याला मी इष्टेट लिहून देईन. मला वाडवडिलार्जित फक्त आजपर्यंत संधिवात मिळाला आहे. आजीला दमा होता, त्या वाटणीची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहात आहे. विनोदबुद्धी कोण देणार?
ज्याने मला डोळे दिले (चष्मा वगळून- तो मी विकत घेतला.) त्याखेरीज ते दातृत्व मी आणखी कुणाच्या वाट्यावर जमा करू?
गणितातला कच्चेपणा, मी माझ्या एका मामाकडून मिळवला. चित्रकलेतील अधोगतीला एक दूरचा चुलता जिम्मेदार आहे. सिग्रेटी फुंकायचे व्यसन माझ्या एका आतेभावाने लावले.
इतिहासाचा तिटकारा इतिहासाच्याच गुरूजींनी निर्माण केला ! त्यामुळे शिवाजीचा गुढगी रोग मी औरंगजेबापर्यंत नेऊन पोचवला आहे, आणि इंग्लंडच्या गादीवरच्या चार्ल्स बरोबर अनेक हेन्री मंडळींची मुंडकी तिमाही – सहामाहीत ह्या हाताने उडवली आहेत.
संगीताची आवड ही शेजारच्या घरात वेळी अवेळी पेटी बडवणा-या एका इसमावर सूड म्हणून उत्पन्न करून घेऊन त्याची पेटी बंद पाडली.
नाटकात पहिली भूमिका मिळाली, ती ‘नरवीर तानाजी मालुसरे’ ह्या नाटकाच्या सोनावणे मास्तरांनी ‘डायरेक्शन’ केलेल्या प्रयोगात ! तानाजी मेल्यावर जे मावळे पळतात त्यांतला आघाडीवरचा मावळा म्हणून मराठी रंगभूमीला माझा चिमुकला पदस्पर्श झाला.
-“मूर्खांनो! तो दोर मी केव्हाच कापला आहे, ”
हे सूर्याजीचे भाषण ज्या मूर्खांना उद्देशून होते त्यातला मी आघाडीचा मूर्ख! तिथे देखील उजव्या विंगेत कड्याच्या दिशेला न पळता उदेभानाच्या महालाच्या दिशेला पळाल्यामुळे डाव्या विंगेत उभ्या असलेल्या सोनावणे मास्तरांनी उजव्या हाताने माझ्या डाव्या गालफडावर एक सणसणीत ‘डायरेक्शण’केलेले स्मरते.
सुटलेला कल्ला आणि जीव बालमुठीत धरून मी पुन्हा एकदा तलवार आणि मावळी पागोटे सांभाळीत उजव्या विंगेत पळताना वाटेत आडव्या पडलेल्या तानाजीच्या छातीवर पाय देऊन पळालो होतो. त्या आघाताने तो मेलेला तानाजी कोकलत जिवंत झाला.
असो; हे विषयांतर झाले.
विनोदबुद्धीचा उगम माझ्या मानेवरील चामखिळीप्रमाणे केव्हा झाला हे अजिबात स्मरत नाही
☆ नुसता सल्ला नव्हे.. हे तर झणझणीत अंजन – लेखक – श्री नाना पाटेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.
परीक्षेत १००% पाहिजेत.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे… त्यानंतर Dance क्लास
attend करायचा… भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ
करायचेच… कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.
— Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.
— एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.
— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की.. “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता- ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?”
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.
— ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही.
School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.
वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर
लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे
मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली.. आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही.
– दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.
ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते… कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट.. E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
– – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.
– – लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. — – –
– – कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद,
निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य.. ह्याला बाजारू
किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.
– – काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय…. पण त्यात देशाचं नाही, तर भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल, पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?… असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात… “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.
जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल, ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.
अनावश्यक विषय शिकवत नाहीत.
चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषयआणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
‘ शिक्षण काय असतं?’ –
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
— एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती.
आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत
फिरत होता… तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.
— सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं.
पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “
— टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात… आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि – –
…… आणि जगायचं राहून जातं !!
☆
लेखक —नाना पाटेकर
संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “Mandatory overs!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
एका पाठोपाठ एक wickets पडाव्यात तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं.
डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं appeal करतायंत! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं तर बायको पाठीमागे caught behind साठी तत्पर! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळवले तर ते नेमके ते wide ball पडल्या सारखे उजवी डावी कडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून, नातू सारे एक सुरात leg before wicket out म्हणतात. खरं म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
काठी ठेवत चला bat सारखी!
आजकाल कान सुद्धा माझं ऐकत नाहीत. त्या मुळे बरेच शब्द, काही वेळा अख्खं वाक्य mis-field होतं आणि विषय पार boundary line च्या बाहेर! है ना चौका देनेवाली बात! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
डोक्याच्या pitch वर जरा कुठे गवत राहीलं असेल तर शप्पथ! पार पाटा wicket. पोटाचा आकार Shape बदललेल्या चेंडू सारखा होत चाललाय. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय चालायचंच. आता mandatory overs! विसरलात वाटतं.
गुळगुळीत दाढी करून पँट वर ball घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय. पण व्यर्थ! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच,
mandatory overs. विसरालात वाटतं!
मनगटं तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझं मलाच समजत नाही. डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
काहीही लक्षणं नसताना सर्दी होते. रुमालाची covers on होतात आणि खेळ थांबतो नाक आणि घशाचं field inspection होई पर्यंत! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
कॉन्फिडन्स तर एवढा शेकी झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण beat होतो. hook करायला जावं तर हुकतो! डॉक्टर नांवाचा umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या Power play च्या overs केव्हाच संपल्यात. तेव्हा उगाच मोठे strokes न मारता जमतील तेवढ्या chikki runs काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलंय. पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय. मोठी attacking field लावलीय. डायबेटिस, बीपी,
सांधेदुखी, कंपवात, विस्मरण हे fielders, slip, gully, covers, point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing, outswing ची भेदक balling करतायंत. *umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandetory overs! विसरलात वाटतं!
त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शन्स् चे pad बांधून इन्सुलिन चे helmet घालून gap काढत आपली मात्र batting चालू आहे. तरी एकदा attacking stroke ने दगा दिलाच. mid on ला चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय, चालायचंच! आता mandatory overs! विसरलात वाटतं!
आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच होतो!
पण तो वरती बसलाय ना third umpire! त्याने चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितला परत परत! आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल! आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नांवाच्या umpire ला म्हणू दे ना…
mandatory overs! विसरलात वाटतं!
☆
लेखक : श्री. पु. ल. देशपांडे
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पंढरीचा चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्रधर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे “विठ्ठल”.
ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले.
ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे:
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!
विठ्ठला, तू वेडा कुंभार!”
प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो.
विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार यांचा” असही झालं. कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचा अंतपार लागत नाही. तो अनादी, अनंत आहे.
एकूणच विठ्ठल अनेक युगे पुतळा चैतन्याचा बनून उभा ठाकला आहे. ज्याने अनेकांना विविधरंगी, विविध अंगी दर्शन दिलं आहे.
संत एकनाथ महाराज लिहितात..
“काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल”
या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे. पंढरी म्हणजे नुसतीच जमलेली गर्दी. अगदी शरीराच्या अवयवांसारखी. नुसता कलकलाट, नुसता गोंगाट.
एक एक अवयव, हळूहळू निघून गेला की गर्दी संपते. शेवटी काहीच उरत नाही.
मग विठ्ठल कुठे आहे?
एकनाथ उत्तर देतात…. “आत्मा हा विठ्ठल !”
शेवटी जो उरतो तो आत्मा, विठ्ठल !! शरीर नष्ट होईल पण आत्मा अटळ विठ्ठल अमर आहे असा धीरही एकनाथ महाराज देतात.
तसा विठ्ठल सावळा आहे; पण त्यातही अनेक रंग आहेत, त्याची रूपेही खूप आहेत. त्याचं सावता माळी ह्यांना वेगळंच रूप दिसलं.
सावता माळी आपल्या मळ्यात दिवसरात्र राबत असत. त्यांच्या मळ्याजवळून अनेक लोक पंढरपूरला जात असत. एकदा एक जण सावता माळींना म्हणाला- आम्ही नेहमी उपास-तापास करून पंढरपूरला अनवाणी जातो, तू कधीच का येत नाहीस.
सावता माळींनी उत्तर दिलं-
कांदा-मुळा-भाजी।
अवघीं विठाबाई माझी॥
*
लसुण-मिरची-कोथिंबिरी।
अवघा झाला माझा हरीं॥
सावता माळी बी पेरत असत. उन्हातान्हात उभे राहून त्याला पाणी घालत असत आणि मग ते बी तरारून बाहेर येई. लसूण, मिरची, कोथिंबिरी हेच हरीसारखे प्रसन्न होत असत.
साक्षात विठ्ठल सावता माळींसमोर उभा राही!!
सावता माळींनी मनगट वापरलं, ते कर्म करत राहिले, मग विठ्ठलाने त्यांना दर्शन देण्याचं स्वतःच कर्म – स्वतःच कर्तव्य पार पाडलं.
इथे पुन्हा शब्दप्रभू ग. दि. मा. आठवतात. त्यांनी लिहिलं आहे :
जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम
दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी!
नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी!
जे सावता माळींनी सांगितलं तेच माडगूळकर वेगळ्या शब्दात सांगतात.
भूमिपुत्राने घाम गाळला तर स्वतः श्याम म्हणजे देव येऊन उभा राहील. जिथे हात राबतील, तिथे हरी येईल.
विठ्ठल अनेकांना अनेक रूपात दिसला आणि महाराष्ट्रात फार मोठी संतपरंपरा उभी राहिली.
संत कान्होपात्रा, सेना महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई, निवृत्तीनाथ आणि अनेक ज्ञात -अज्ञातांनी विठ्ठलाला पाहिले.
नरहरी सोनारांनी देवाचे वर्णन करताना म्हटले,
“देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार”
इथे नरहरी आणि कबीर ह्यांच्यातील साम्य दिसते. कबीर म्हणत असे की मी वस्त्र विणतो तेव्हा राम म्हणतो. नरहरीही आपली प्रत्येक कृती देवासाठी करत राहिले. तोच धागा पकडून पी. सावळाराम ह्यांनी गीत रचले,
“धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया”
संत जनाबाईंनी म्हटले,
हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला
गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर
कृष्ण लोणी चोरून मित्रांना वाटत असे. विठ्ठलाचंही वर्णन करताना जनाबाईंनी “चोर” म्हटले आणि मराठी भाषेची प्रतिभा पहा, हा चोर लोकांना आवडला.
आपली संत परंपरा विवेक जागृत करायला शिकविते, अंतरीचा दिवा उजाळायला शिकविते. संत सोहिरोबाई ह्यांनी लिहिले:
सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।
तेथ कैचि दिवस-राती।
तयावीण नेत्रपाती हलवू नको रे।
हरिभजनाविण काळ घालवू नको रे।
ज्ञानजोतीविना नेत्रपातीही हलवू नको रे, दिवस-रात्र या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत आराम करू नको रे. हरिभजनाशिवाय वेळ वाया घालवू नको रे.
आणि बहिणाबाईंनी देवावर भाष्य केलं नसतं तरच नवल. अंधश्रद्धेतून देव संकल्पनेला मुक्ती देताना त्या म्हणतात:
बापा नको मारू थापा
असो खऱ्या, असो खोट्या
नहि नशिब नशिब
तया हाताच्या रेघोट्या
*
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
अनेकांनी देव ही संकल्पना कर्मवादाशी जोडली. महाराष्ट्रात देवाला दगडातून बाहेर काढणारी परंपरा उभी राहिली.
कवी बोबडे यांनी स्वतःमधला देव दाखवण्यासाठी लिहिले:
*
सागर पोहत बाहू बळाने।।
नाव तयास… मिळो न मिळो रे ॥१॥
*
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप… जळो न जळो रे ।।२॥
*
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास… कळो न कळो रे ॥३॥
*
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास… मिळो न मिळो रे ॥४॥
बघा या कवितेतून किती सुंदर अर्थ त्यांनी सांगितला आहे. “जो स्वतःच्या हाताने पोहत जाईल, त्याला नाव मिळाली नाही तरी चालेल. जो स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित आहे, त्याच्या घरात दीप नसला तरी चालेल. जो निरंतर कर्म करतो, त्याला वेद कळले नाही तरी चालेल आणि ज्याला स्वतःची ओळख पटली आहे, त्याला देव मिळाला नाही तरी चालेल. “
काही कारणास्तव, काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, जवळच्या विठ्ठल मंदिरातही जाता येणार नाही. तरीही हरकत नाही. विठ्ठल तर आपल्या आत आहे. त्याला चोरून देवालयात बंद करण्याइतका पुण्यवान कोण आहे?
ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे..
*
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई
*
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वभूता ठायी
*
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शिर झुकवुनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही, देव भरुनिया राही
*
देव इतका सोपा आहे, सुलभ आहे. बस स्वतःमध्ये पाहिला की सापडतो.
।। राम कृष्ण हरी ।।
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈