चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती. कारण काय, तर केळीचे डोहाळजेवण करायचे ठरले होते. गडबड म्हणजे काय, तर हिरवी साडी आणायची. तिला बांगड्या ब्लाऊज पीस, ओटीचे सामान, विड्याची पाने, हे आणायचे होते. घुगऱ्यांसाठी हरबरे, शेंगदाणे भिजत घालायचे होते. मनात खूप उत्सुकता होती, कारण मला पण हे नवीन होते.
दुसरा दिवस उजाडला. सगळी पूजेची तयारी केली. मग सगळ्याजणी म्हणजे कामाच्या 12 बायका आणि मी आम्ही निघालो. जवळ जवळ अडीच हजार झाडे लावलेली त्यातला जो पहिला घड पडला होता, तेच झाड आम्ही निवडले. तिथली जागा स्वच्छ केली. विड्याची पानं मांडली.
त्यावर सुपारी, हळकुंड मांडले. मग त्यावरच सगळा नैवेद्य घातला. म्हणजे दहीभात, वरणभात, मसालेभात, शेवयाची खीर, गव्हाची खीर (इथे त्याला हुग्गी म्हणतात), भाजी, मुख्य पदार्थ म्हणजे आंबील. ती नाचणीची असते. थंडावा देण्यासाठी असते म्हणे. नैवेद्य झाल्यावर ओटी भरली. ओटीत साडी, ब्लाउजपीस, पाच प्रकारची फळे, बांगड्या असे सगळे साहित्य ठेवले होते. मग ती साडी जशी आपण नेसतो तशी झाडाला निऱ्या वगैरे करून नेसवली. त्यानंतर आरती केली. फोटो सेशन तर सतत चालले होतेच. मग सगळ्या बायकांनी गारवा आणला होता. त्यात भाकऱ्या, मुगाची उसळ, दाण्याची चटणी, दहीभात, झुणका, गोड म्हणून मोतीचूराचे लाडू असे आणले होते. त्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्या सगळ्यांनी माझी ओटी भरली. अभिजितला टॉवेल टोपी दिली.
जो घरी केलेला राहिलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण दोन एकराच्या रानात चारी बाजूंनी शिंपडला. मग दुसऱ्या झाडाचा तयार झालेला घड काढला.
हे सगळे का करतात, हा प्रश्न तर मनात होताच. तर केळीचे झाड असे आहे की जे फक्त आपल्या मुलासाठी जगते. जेव्हा झाड मोठे होते, तेव्हा त्याला कोका पडतो, तेव्हा त्याला पण त्रास होतो. झाडातून विव्हळण्याचा आवाज येतो, असे जुन्या बायका सांगतात. जसा घड मोठा होतो तसे त्याचे वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचे, आणि पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचे. आणि जेव्हा घड काढला जातो, तेव्हा स्वतःला समर्पित करायचे. घड काढून झाला, की झाड आपोआप वाळत जाते. म्हणून ही पूजा त्या साठी असते की झाडाची माफी मागून घड कापायचा असतो. अशा प्रकारे आज नवीन माहिती कळली.
लेखिका:सौ. मंजिरी अभिजित वझे
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अनिकेतला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७२ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता.
अनिकेत चिडून म्हणाला, “काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. चला, मला लवकर ‘हिंजवडी’ला सोडा. “
आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली.
रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता.
अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, “अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझी मीटिंग आहे. “
आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, “साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल. “
अनिकेतने तोंड वाकडं केलं, “बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं. ” शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते.
अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, “ठेवा सुट्टे. उपकार समजा. “
आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका ‘छोट्या टिफिन बॉक्स’ मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला.
अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला.
त्याने विचारलं, “त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय? ” आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं.
त्यात ‘चिल्लर आणि नोटा’ होत्या आणि एक ‘फोटो’ होता.
तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता. तिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले:
“साहेब, ही माझी नात आहे, ‘रिया’. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. “
आज तिची ‘शाळेची फी’ भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो.
आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले.
“साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात… पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला ‘उशीर’ म्हणत होतात ना… तो माझ्यासाठी ‘संघर्ष’ होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं. “
हे ऐकून अनिकेत सुन्न झाला.
ज्या हातांना तो ‘कमकुवत’ आणि ‘म्हातारे’ समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते.
त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली.
अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती.
त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले.
आजोबांनी हात जोडले, “नको साहेब, हे खूप आहेत. “
अनिकेत हळवा होऊन म्हणाला, “आजोबा, हे पैसे फीसाठी नाहीत. हे त्या ‘रिया’साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला ‘माणुसकी’ शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल. “आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली.
अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो.
कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी ‘पालक’ असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जेव्हा मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी एकत्रित पुन्हा भेटतात ना, तेव्हा खूप आनंद होतो.
तारुण्यातील मैत्री व साठीतली मैत्री यात बराच फरक असतो.
तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो. कारण तेव्हा मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…
मैत्री टिकली तर टिकली, नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असतं. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो आपण. पण जेव्हां साठीला पोहोचतो, तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो, ते कळत सुध्दा नाही…
जेव्हा साठीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात, तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलंसं वाटत असतं की, ती मैत्री खूप खूप हवी हवीशी वाटत असते.
नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल, तर सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो. आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतं. आपल्याला समजावून घेतो, सुखादु:खात सहभागी होतं व चुकलं तर बोलतं व माफही करतं. असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
आपण कोणाचे कोणीच नसतो, पण आपले मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात. म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.
आत्ता आयुष्याची साठी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे, तेव्हा या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात, त्यांना भेटूया….
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…
ते स्टेशन आलं की उतरावंच लागते…
म्हणून जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे, तोपर्यंत त्या प्रवासात मनातल्या तक्रारींना बाजूला काढून टाकू या.
माहीत नाही, परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू?
म्हणून मैत्रीची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!
पण अशी मैत्री समजून घेणारे फार कमी असतात.
ज्यांना खरे निःस्वार्थी मित्र लाभले ना, ते खरेखुरे भाग्यवानच!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भक्तीचा उद्गार– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.
ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते. कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात ‘कार्यक्रम संपला’ अशीच भावना होती.
तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—
“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का? ”
क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
पण भीमसेन जोशी थांबले. त्यांनी त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं, “अहो, पेटी-तबला ठेवू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”
सगळे स्तब्ध झाले.
पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी
“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…”
सुरू केलं.
सुधीर गाडगीळ सांगतात—तो अभंग मैफिलीचा भाग नव्हता; तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते—ते अनुभवत होते.
अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.
गाडगीळ शेवटी म्हणतात—
“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली.”
हा प्रसंग, संतवाणी म्हणजे नेमकं काय, हे कायमचं समजावून जातो.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈