लहानपणी पुण्यातल्या घरांमधल्या भांड्यांवर खिळ्याने ठोकून नावं घातलेली असत. प्रत्येक तांब्या-पितळेच्या आणि नंतर स्टीलच्या सुद्धा भांड्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तीचं नाव (मालक म्हणून असावं बहुदा !) तारीख आणि गावाच्या नावासह वळणदार अक्षरात कोरलेलं असायचं. जर एखाद्या समारंभात ते भांडं दिलं असेल तर ” चि. सौ. का. xxx च्या विवाहाप्रित्यर्थ किंवा चि. XYZ च्या मौजीबंधन समारंभ प्रित्यर्थ– ABC कुटुंबाकडून सप्रेम भेट ” असं तारखेनिशी लिहिलेलं असायचं !
असं नाव कोरून देणारा माणूस माझ्या दृष्टीनी भांड्यांच्या दुकानातला सगळ्यात इंटरेस्टिंग माणूस असायचा ! तुळशीबागेच्या समोर जराशा उजव्या हाताला असणाऱ्या “पंड्याच्या” भांड्यांच्या दुकानात आईची खरेदी सुरु झाली, की माझा मोर्चा तिथे शेजारीच असलेल्या देवळाच्या पायरीवर बसून, भांड्यांवर कोरून नावं घालणाऱ्या काकांकडे वळलेला असायचा—-आणि त्यांचं एकाग्रपणे चाललेलं ते काम मीही मन लावून बघत बसायची.
एका संथ तालात, किंवा लयीत म्हणूया, साध्या खिळ्याच्या साह्याने ठोकत ठोकत, गिऱ्हाईकाने कागदावर लिहून दिलेली मराठी किंवा इंग्रजी अक्षरं अगदी वळणदार पद्धतीने उतरवणारे ते हात एखाद्या शिल्पकारासारखे वाटायचे मला— आता कुठे गेले ते हात ? काही दिवसांनी नावं घालायच्या मशीनचा उदय झाला, आणि ही परंपरागत कला लोपच पावायला लागली— बघता बघता लोप पावली सुद्धा !!
पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, की मशीननी घातलेली नावं पुसूनही जातात , पण ठोकून कोरलेली नावं ५०-६० वर्षांनंतरसुद्धा अजूनही भांड्यांवर टिकून आहेत !!!
– सुश्री शुभा गोखले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ वृद्धत्व श्रावणबाळाचे !! …’स्नेहसावली’ संस्थांतील एक समाजसेवक ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला “नॉट आऊट १०२” हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते. तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होतो त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो.
असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला ‘ स्नेहसावलीत ‘ आला —–
एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते,– “ डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो? ‘ मी म्हणालो, “ आजोबा अजिबात काळजी करू नका. इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल.” त्यावर ते म्हणाले, ” नाही नाही डॉक्टर, मला माझ्यासाठी नाही, तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो. १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे. कुठलाही आजार नाही तिला. फक्त आताशा कमी ऐकायला येते.”
मी आश्चर्यचकित होऊन विचारले,” अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे? ” “ त्याचे काय आहे डॉक्टर, मला मागच्या वर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे, दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही.”
त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच आश्यर्यचकित झालो. मी सहज आजोबांना म्हणालो–” मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत?” त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होतं – “अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे, तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे. पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे.” हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून, प्रसंगी त्रास सहन करूनदेखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पाहिले की चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते…!!
लेखक : – “स्नेहसावली“ या संस्थेतील एक समाजसेवक
संग्राहक : – श्री अनंत केळकर
≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बननाही नहीं था, क्यों की मैं हमेशासे जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरताको मेन्टेन करती हूँ। ’
फार साध्या सोप्या ओळी आहेत की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ – आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं? आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.
जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला, हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो. पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.
तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.
सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता. आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमता राहिलं आहे. मी म्हणजे कॅमेरा तोंडावर असेपर्यंत झळकणारी नटी नाही. हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. पुरुषांना काय आवडेल, याचा विचार करून स्वत:ला घडवू नका. पुरुषी नजरेतून स्वत:चं सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाचं अध:पतन करवून घेणं. पुरुषांना उद्दीपित करण्याचं साधन म्हणून आपण किती काळ जगणार आहोत?
गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहू या. तुम्ही जशा जन्माला आल्या आहात त्याच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकलं तर दुसऱ्या सौंदर्याकरिता दुसऱ्या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.
जीवन खूप यांत्रिक झालंय् . माणसामाणसातले संवाद तुटलेत .माध्यमे असतील अनेक .पण व्हरच्युअल रिलेशनशिपने नक्की काय साध्य झालेय्.. ? नुसते ईमोजी ,लाईक्स, परस्परातील स्नेह आपुलकी खरोखरच जपतात का? की तो केवळ एक टाईम पास…! एक खूळ. एक चाळा.. अंतर्जालात कुठेतरी दूर असलेल्या,–कधीकधी तर अनोळखीही असलेल्या व्यक्तीशी संवाद–
नव्हे चॅटींग करत असताना, जवळ बसलेल्या व्यक्तीची आपण दखलही घेत नाही, नव्हे आपण तिचं अथवा त्याचं अस्तित्वही विसरलोय् याची जाणीव तरी होते का?
कित्येक वेळा असंही अनुभवायला येतं की माणसं..मित्र मैत्रिणी म्हणा किंवा नातलग असूद्यात ..भेटीसाठी एकत्र जमतात, तरीही आपापल्याच त्या सहा इंची विश्वातच असतात….
मग नकळतच माझं मन परीवार या शब्दापाशीच रेंगाळतं—हे सहा इंचातले समूह म्हणजे परिवार का?—-अर्थात काही गोष्टी मी नाकारु नाही शकत.
या माध्यमाने अनेक हरवलेले दुवे पुन्हा जोडून दिलेत. अंधारातले चेहरे समोर आणलेत. अनोळखी नात्यांची वीण गुंफली.
पण तरीही मागे वळून पाहताना, माझ्याच आयुष्यातल्या अनेक व्यक्तींच्या आठवणी जेव्हां माझ्या मनात रुंजी घालतात,तेव्हा उणीवा जाणवतात. त्रुटी भासतात.
नेमकं हे बरोबर की चूक ? हे खरं की खोटं ?नुसतंच आभासी..? यात गोंधळायला होतं. मग मी या विचारापाशी येऊन थांबते—–
परिवार या शब्दाची नेमकी व्याख्या काय? माझा परिवार म्हणजे नेमका कुठला परिवार..?
मी माझा नवरा आणि आमच्या दोन मुली ..एव्हढाच ? की माझ्या बहिणी (अत्यंत लाडक्या) ,माझे दीर ,नणंदा- जावा, त्यांची मुले ,सुना—-शिवाय असंख्य मित्रमैत्रिणी..ज्यांच्या बरोबर मी पस्तीस ते चाळीस वर्षे काम केले , तो सहकर्मचार्यांचा परिवार…समान आवडीमुळे निर्माण झालेले इतर अनेक परिवार—-
आपले शेजारी, अगदी आपल्याकडे कामाला येणारी माणसे..त्यांच्यातलीही आपली गुंतवणुक….
खरोखरच मी स्वत: परिवारप्रिय व्यक्ती आहे—हे सगळे परिवार माझ्या आयुष्याचे महत्वाचे भाग आहेत…माझा परिवार हा संकुचित असूच शकत नाही ..तो खूप व्यापक आहे…
कालच माझ्या पुतण्याचा फोन आला ,म्हणाला, ” काय काकू आहेस कुठे? किती दिवसात फोन नाही भेट नाही ..म्हटलं गेलीस की काय अमेरिकेला मुलींकडे..”
“नाही रे कुठे जाऊ? या लाॅकडाउनपायी गेले सहा महिने घरातच आहे…”
मग खूप गप्पा झाल्या.. किती बरं वाटलं ! परिवारातली माणसं आपल्यावर इतकं प्रेम करतात ,आपली आठवण ठेवतात या भावनेनं आयुष्य वाढलं नाही तरी सुखद नक्कीच होतं..!
कालच आम्ही दोघं जुने अल्बम पहात होतो—
—अनेक आठवणी.. अनेक पारिवारीक सोहळे, प्रवास, गेट टुगेदर्स…सुखदु:खांचे अनेक क्षण ! अनेक प्रसंग !
अल्बम पाहता पाहता एकमेकांची काळजी वाहिलेले क्षण तर आठवलेच, पण शाब्दिक वार नि भांडणेही आठवली..
अल्बममधले कित्येक चेहरे काळाच्या पडद्याआड गेलेही. पण मनात जपलेला परिवार आठवणीत अतूट–अखंडच राहिला,..
या सगळ्यांनी आपल्याला किती आणि काय काय दिलं—-आपल्या जीवनाला आकार दिला. आज ते नसूनही आहेत. त्यांच्या स्मृतींशी आजही आपला संवाद आहे…
बाळपणीच्या परिवारातली शिस्तप्रिय आई—‘ लाभालाभौ जयाजयौ स्थितप्रज्ञ ‘ असलेले ,विनोदबुद्धी असलेले वडील…प्रचंड माया करणारी आजी—सतत भांडणे उकरुन काढणारी –पण तितकीच अनेक कलांमधेही प्रवीण असलेली.काकू –.
आणि गंमतीजमती करणारी, भांडणारी, खोड्या काढणारी, आम्ही मामे आते चुलत मावस भावंडे……
माझं सासरही तसं भरगच्च– माणसांनी भरलेलं—डोईवरचा पदर,.गौरवर्ण, उंच ताठ बांधा, अंगभर दागिने ..चेहरा प्रसन्न पण काहीसा करारी कठोरही— अशा सासूबाई..
“अग ! तुला साधी भाकरही थापता येत नाही का? ” म्हणून फटकारणार्या—तेव्हां रागही यायचा, वाईटही वाटायचं. कधी कधी मनातला अहंभावही ऊफाळून यायचा. अनेक क्षेत्रातलं माझं प्राविण्य हे असं एका भाकरीपाशी निष्प्रभ व्हावं याचं वैषम्य वाटायचं. खेद वाटायचा. पण मग आईची काही वाक्यं आठवायची. आई विणायला शिकवायची तेव्हां म्हणायची,” सुईवरचे टाके सैल पडू नको देऊस..वीण घट्ट ठेव. नाहीतर सगळं उसवेल…” आईचे हे शब्द मग माझ्या पुढच्या जीवनात निराळे अर्थ घेऊन सोबत राहिले. आणि आता जाणवते, वैवाहिक जीवनाचे खरे धडेही सासूबाईंच्या कठोर शब्दांनीच शिकवले मला…त्या खरखरीत वाटण्यार्या पानांमधेही तुडुंब ओलावा होता..म्हणून काटेरी असली तरी हिरवी होती….
खरंच मोठ्या परिवारात खूप गंमत असते बरं का..?- व्यक्ती आणि वल्लींंचा एक गुच्छच असतो तो— कुणी मनमिळाऊ, कुणी अलिप्त. कुणी हसरा कुणी रागवणारा… कोणी नासका कांदा तर कोणी चिडका बिब्बाही..
माझ्या स्वत:च्या दोन मुलींच्या स्वभावातही केव्हढा फरक…एक गाव गोळा करेल, तर एक अत्यंत सावध–चाचपडत पारखत–उगीच कूणाला लटकणार नाही अन् कुणाला लटकूही देणार नाही…
परिवार म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. मतभेद होणारच. काहीसा गृपीझमही असतो…
कुठे त्याग समर्पण प्रेम— तर कुठे अप्पलपोटेपणा, स्वार्थ, स्वकेंद्रीतता…
पण तरीही सर्वांचं संतुलन सांभाळणं हे परिवाराचं शास्त्र असतं..या शास्त्रांचा अभ्यास नीट झाला तर परिवार तुटत नाही .सांधला जातो…
पानगळ होते. नवी पालवी बहरते.. वृक्ष विस्तारतच राहतो…
तो उन्मळत नाही, कारण मुळं घट्ट मातीत रूतलेली असतात—
परिवाराचंही तसच आहे…
माझ्या सगळ्या प्रकारच्या परिवारात मी सदैव एक हिरवं पान असावं हीच मनीषा….
मग या सगळ्या भावनिक आंदोलनात तरंगत असताना मनात येतं–जे भोगलं ,जे पाह्यलं,जे अनुभवलं, ते आताच्या आभासी जगात खरंच आहे का..? तिथे असं काय निराळं आहे की ते माणसामाणसाला खिळवूनही ठेवतंय् आणि प्रचंड दुरावाही निर्माण करतंय्..
शिक्षण: B.Sc. chemistry ,Diplom in journalism,master in communication and journalism,Ph.D.in journalism.
Cert. course in film making and documentary, चित्रपट रसास्वाद कोर्स,सार्वजनिक कार्यक्रम संयोजन सर्टिफिकेट कोर्स.
अवगतभाषा: मराठी,हिंदी,गुजराती ,इंग्लिश.
लेखन: विविध मासिके, दिवाळी अंकातून लेखन, मान्यवरांच्या मुलाखती, संशोधनात्मक लेखन, संपादन, स्वामी विवेकानंद चरित्र मालिकेचे सोशल मिडियासाठी लेखन, विशेषांक व स्मरणिकांचे संपादन.
आकाशवाणी: ड्रामा B grade artist., बालनाट्ये, शैक्षणिक कार्यक्रम यांचे लेखन व सहभाग, पुणे आकाशवाणीवर तेजशलाका या मालिकेसाठी काही भाग लेखन, नाट्य लेखन, दिग्दर्शन व सहभाग.
मुक्त पत्रकार व माध्यम अभ्यासक म्हणून काम चालू.
संस्कार भारती साहित्य विधा अ.भा.समिती सदस्य व पश्चिम प्रांत प्रसिद्धी संयोजक.
संस्थापक: मोहोर बुक क्लब.
संयोजक: साहित्य कट्टा, वर्तक बाग, पुणे.
साहित्य पर्यटन: साहित्यिकांचे गावी पर्यटन व माहिती घेणेदेणे.
साहित्य कार्यक्रमांची निर्मिती,संशोधन,लेखन,दिग्दर्शन. शाॅर्ट फिल्म निर्मिती.
विविधा
☆ उत्तीष्ठत ! जाग्रत ! ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
श्रेष्ठ जीवनमूल्यांनी युक्त आणि आत्मजागृती झालेला असा समाज घडवण्याचे स्वप्न पहाणारे योगी, पण धर्म संघटक असलेले स्वामी विवेकानंद पाश्चात्य लोकानांही शिकवण देऊन गेले, ही शिकवण आजच्या जीवनशैलीच्या काळात अत्यंत उपयोगी पडणारी आहे.
गेली दोन वर्षे जगभरात कोरोना या साथीच्या रोगाचे तांडव सुरू आहे. त्याचा प्रसार फार वेगात होतो आहे . भारताने या साथीत आपल्या लोकांसाठी आपल्याच देशात कोरोंना वर लस निर्माण केली जी जगात इतर देशांना पण पुरवता आली. भारताने हा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सर्व पार्श्वभुमीवर स्वच्छता .आरोग्यादायी जीवनशैली, आहार विहार, योगसाधना, आयुर्वेद यावर पुन्हा पुन्हा चर्चा होत आहेत. लोकसंख्येचा विचार करता भारताच्या बाबतीत तर असा विचार होणं आवश्यकच आहे. आपल्याकडील पारंपरिक जीवनशैली आपल्या प्राचीन ग्रंथातून सांगितली आहे. हे ग्रंथ आजही आपल्याला मार्गदर्शक असेच आहेत. हेच स्वामी विवेकानंद ११८ वर्षापूर्वी आपल्या भारतीय लोकांना विशेषता तरुणांना वारंवार सांगत होते. त्यांचा भर तरुणांवर होता. आपला देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यासाठी तरुणांना दृष्टीकोण असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे आणि हा दृष्टीकोण आपल्याच संस्कृतीत सामावला आहे फक्त तो तरुणांना देण्याची गरज आहे असे त्यांना वाटत होते.
स्वामी विवेकानंद भारतीय तरुणांना म्हणताहेत, “तुम्हाला केवळ एक संदेश देण्यासाठी मी जन्माला आलो आहे. आणि तो संदेश आहे, की उठा जागे व्हा, माझ्या तरुण देशबंधुनो! या, माझ्या बरोबर उभे रहा. बाहेर पडा, खेडोपाड्यात जा. देशात सर्वत्र जा आणि धैर्याचा हा संदेश सर्वत्र पोहोचवा. सबलांपासून दुर्बलांपर्यंत. लोकांशी बोला, त्यांना प्रेरणा द्या. त्यांना समजू द्या की, त्यांच्या जवळ अपार सामर्थ्य आहे. आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत हे त्यांना कळू द्या. त्यांना आत्मनिर्भर होऊ द्या. आजवर अपार श्रद्धेच्या पोटीच श्रेष्ठ कार्य घडून आली आहेत. पुढे चला, माझ्या तरुण देशबांधवांनो, पुढे चला”.
भारत आणि भारताबाहेर जाऊन आल्यानंतर त्यांनी जे अनुभव घेतले, जे जे पाहिले, त्यावरुन त्यांनी आपल्या देशाला कशाची गरज आहे याचा विचार केला. आपल्या देशाचे पुनरुत्थान होण्यासाठी आवश्यक असलेली अलौकिक शक्ति आपल्याकडे आहे. मग उशीर कशाला? असे म्हणून विवेकानंद कामाला लागले. त्यांना कळून चुकले की भारताची परंपरा आणि प्राचिनता एव्हढी भक्कम आधारावर उभी आहे की तीच सर्व जगाला मार्गदर्शक ठरू शकेल.
जेंव्हा तरुण नरेंद्र बोधगयेला जाऊन आल्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांना म्हणाला होता, “ आपण निर्विकल्प समाधीमध्ये सच्चिदानंदात डुंबून राहू इच्छितो” तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “ एखाद्या विशाल वटवृक्षासमान होऊन हजारो लोकांना शांतीची सावली द्यायची सोडून, तू आपल्या व्यक्तीगत मुक्तीसाठी तडफडणार आहेस? तुझे ध्येय इतके क्षुद्र आहे का ? नरेंद्रने केवळ अध्यात्म जपजाप्य, समाधी यातच मग्न न राहता आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचा उपयोग, आपल्या देशबांधवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गुरूंची इच्छा आणि स्वत:चा अनुभव, याच्या जोरावर नरेंद्रनाथांनी पुढे आपले आयुष्य खर्ची घातले.
हे काम करता करता सर्वात आधी नरेन्द्रनाथ आपला देश जाणून घ्यायला उत्सुक होते. अयोध्या, लखनौ आग्रा वृंदावन अशी ठिकाणे पहात पहात ते भारताच्या चारही दिशांना परिभ्रमण करू इच्छित होते.असे तीर्थाटन अर्थात परिभ्रमण केल्याने त्यांना आपल्या देशाची स्थिति कळली. आपल्या लोकांचे दैन्य समजले. दास्य आणि दारिद्र्य समजले. आपसातील भेद, अज्ञान, सामर्थ्यहीनता, ही समाजातली कमतरता लक्षात आली. परिव्राजक म्हणून फिरल्यानंतर त्यांना वाटले की आपला समाज पुन्हा सामर्थ्यशाली झाला पाहिजे, त्याचं वैभव पुन्हा त्याला मिळालं पाहिजे, राष्ट्रोत्थान झालच पाहिजे.
म्हणून त्यांना भारतात असलेली इंग्रजांची सत्ता, गुलामी, अशा वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी त्यांनी कश्मीर ते कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत, अवलोकन करता करता भ्रमण केले. त्यांना दिसलं की जनतेत धर्माबद्दल आस्था आहे पण सामाजिक जीवनात गतीशीलता नाही. दोष धर्माचा नाही पण धर्माचा धंदा झाल्यामुळे समाजजीवन पंगु झालं आहे. त्यांना मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच होतं. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पाश्चिमात्य लोकांची संस्कृती आणि चालीरीती व त्यांच्या डामडौलावर न भुलता, आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घेतली पाहिजे. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्य आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.
खरच आहे आपल्याकडे जे अध्यात्म आहे, वेद, उपनिषदे यासारखे अनेक प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात आपल्या जीवन जगण्याचे, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सार सांगितले आहे. जीवनपद्धती सांगितली आहे. हा आपल्या संस्कृतीचा मूळ पाया आहे जो इतर कुठल्या ही देशात नाही आणि एव्हढी प्राचीन परंपराही नाही. म्हणूनच स्वामी विवेकानंद जेंव्हा सर्व ठिकाणी भारताबाहेर फिरले तेंव्हा त्यांना हेच जाणवलं होतं की, भारताकडे एव्हढी समृद्ध प्राचिनता असूनही भारत अधोगतीकडे का चाललाय? तर भारताच्या अधोगती च्या मुळाशी कोणतीही धडपड न करण्याची, उद्युक्त न होण्याची आणि कठोर परिश्रम न घेण्याची प्रवृत्ती आहे, पुढे जाण्याची ईर्ष्या नाही. इच्छा नाही, स्वत:च्या हिमतीवर उभे राहण्याचा गुण आपल्यात नाही. त्यामुळे काहीतरी प्रेरणा मिळेल, धीर मिळेल असे स्फुरण जो पर्यन्त चढत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही.
जेंव्हा स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी म्हणून अमेरिकेत शिकागो येथे गेले, त्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर त्यांना आपला देश आणि इतर देश यांच्यातली तफावत जाणवत होती. ते बघितलेल्या गोष्टींची आपल्या देशाशी तुलना करायचे, अगदी प्रवासाच्या सुरुवातीलाच जहाजाने जाता जाता त्यांना जपान, चीन असे देश लागले. ते बघून त्यांना भरून आले की आपल्या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे, उज्ज्वल वारसा आहे, बळकट असं अध्यात्म आहे, धर्मविचार आहे, हे भूषणावह असे प्राचीनतेचे श्रेय कुठे हरपले आहे? आज आपल्या मातृभूमीतले हे वैभव, त्याचा मागमूसही दिसू नये याचे दु:ख त्यांना झाले.
जपान मध्ये जेंव्हा जहाज थांबले होते तेंव्हा खूप मोठा फरक त्यांना जाणवला. स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येक बाबतीत दिसणारी त्यांची सौंदर्य दृष्टी, रुंद रस्ते, घराभोवती बागा व शहराची नीट रचना , आधुनिकतेच्या काळात केलेला विज्ञानाचा स्वीकार, असे पाश्चात्य जगाचे आव्हान स्वीकारून जपान ताठ मानेने उभा आहे याचेही त्यांना कौतुक वाटले. तिथे त्यांना संस्कृतमध्ये मंदिरातील भिंतींवर श्लोक लिहिलेले आढळले. तिथल्या पुरोहितांना संस्कृत कळत नव्हते, पूरोहित आधुनिक दृष्टीकोण असणारे होते. हे सर्व बघून विवेकानंद यांना वाटले शक्य तितक्या भारतीय तरुणांनी जपानला भेट दिली पाहिजे, कारण जपान पासून आपण शिकाव्यात अशा खूप गोष्टी आहेत. योकाहोमा ला पोहोचताच त्यांनी जहाजातूनच आपल्या मद्रासच्या शिष्यांना पत्र लिहिले की, जरा इकडे या, हे लोक पहा,आणि शरमेने आपले तोंड झाकून घ्या. पण त्यांना हे माहिती होतं की परंपरेने गुलाम असण्याची सवय भारतीयांना जडली आहे ती जाणार थोडीच ? आणि जात ? तिची तर खूप सवय, जरा इथून बाहेर पडले की आपण आपली जात गमावून बसू अशी भीती या लोकांना वाटतेय. शेकडो वर्षे खाणेपिणे, गुलामी, जुन्या पुराण्या चालीरीती पाळणे, आणि महत्वाकांक्षा काय तर एखादी नोकरी मिळवणे किंवा फार फार तर वकील होणे. एव्हढेच”. विवेकानंद कोणाचीही तमा न बाळगता निर्भीडपणे पुढे म्हणतात की, या तर, प्रथम माणसे व्हा. ज्यांचा नेहमी प्रगतीला विरोध असतो त्यांना झुगारून द्या. आपल्या बिळातून बाहेर पडा. आणि सभोवताली दृष्टी टाका सारी राष्ट्रे कशी दौडत चालली आहेत ते पहा. तुमचे आपल्या देशावर प्रेम असेल तर पुढे या. अधिक चांगल्या आणि उच्च दर्जाच्या गोष्टी हस्तगत आपण प्रयत्न करूया, मागे वळून मुळीच पाहू नका, पुढेच जात रहा” केव्हढा विचार आहे या मागे .
त्यांना अनुभवाने माहिती होते की चांगल्या कामात विघ्ने आणणारे लोक काही कमी नसतात. कर्तृत्व, पौरुष आणि पराक्रम या गुणांचे विवेकानंद यांना आकर्षण होते. अमेरिकेस जाताना खर तर अजून कित्येक किलोमीटर प्रवास व्हायचा होता, पॅसिफिक महासागर पार व्हायचा होता. पण त्या क्षणाला जे त्यांनी पाहिले ते आपल्या भूमीवरच्या लोकांना लगेच सांगावे अशी आंतरिक इच्छा निर्माण झाली होती आणि जपान सारखा प्रगतीत पुढे असणारा देश सुद्धा भारताबद्दल आदर बाळगतो याचा त्यांना जेव्हढा अभिमान वाटला तेव्हढेच वाईट वाटले आणि भारताची दुरवस्था डोळ्यासमोर उभी राहिली.
आता अमेरिकेत पोहोचल्यावर तिथले लोक, सुधारलेल्या व उच्च शिक्षित स्त्रिया, शहरे, वाहतूक, तिथले वातावरण, घरे, लोकांची वागणूक या सर्वांचे निरीक्षण विवेकानंद करत होते. त्यांच्या नजरेतून महत्वाच्या गोष्टी टिपल्या जात होत्या. सर्व धर्म परिषदेला वेळ होता आणि तिथे तब्बल ७०० एकर जमिनीवर भरवलेले अवाढव्य असे कोलंबियन एक्स्पोझीशन (औद्योगिक प्रदर्शन)भरले होते. विवेकानंद ते पाहून आश्चर्य चकित झाले. तिथे असणारी सुबत्ता, विज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान, अद्ययावत संशोधन, यंत्रे, उपकरणे, सर्वसर्व बघण्यासारखे होते. ते मानवाच्या बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे प्रदर्शनच होते म्हणा ना. भौतिक प्रगती होती ती. तिथल्या नैतिकतेचे पण त्यांनी अनुभव घेतले. त्यांना हे लक्षात आले की जरी भौतिक प्रगतीत हे देश पुढे असले तरी त्या देशांना आपल्यासारखा अध्यात्माचा पाया नाही त्यामुळे त्यांची जीवनशैली नुसता देखावा आहे . शाश्वत नाही. त्यांच्याकडे शिक्षण आहे पण संस्कृती नाही. या उलट आपल्याकडे जीवन जगण्याचा शाश्वत असा आधार आहे. फक्त दारिद्र्य आणि अज्ञान दूर व्हायला हवे. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे , ते मिळाले की नवा दृष्टीकोण मिळेल, आत्मविश्वास वाढेल.
आत्मनिर्भर भारताचा विचार स्वामी विवेकानंद यांच्या समोरच सुरू झाला होता. याच प्रदर्शना जमशेटजी टाटा भाग घ्यायला गेले होते. जाताना ते स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर जपान ते शिकागो च्या प्रवासास होते. त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून, त्याग आणि तपस्या याचे पुनरु:जीवन करण्याची योजना टाटांनी आखली आणि बंगलोर इथे विज्ञान विषयाला वाहिलेली, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभी केली.
त्यांनी अशा प्रगतिच्या व विकासाच्या अनेक गोष्टी पाहिल्या आणि त्यातील मोठमोठ्या उद्योजक जॉन डी रॉकफेलर, तिकडचे तत्वज्ञ अशा लोकांच्या भेटीतून तिथल्या विकासाचे मर्म समजून घेतले. आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास, आपल्याकडे शेती, विविध कला, कारागिरी आणि कौशल्ये आहेत त्याचा विकास व्हयायला हवा. त्याचे शिक्षण प्रशिक्षण, देऊन लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग यांना प्रेरणा द्यायला हवी. आपण करू शकतो असा विश्वास मनात निर्माण करून त्या तरुणांना बळ द्यायला हवे.
आज घडीला भारतात तरुणांना आकर्षित करणारी अनेक क्षेत्रे आहेत, अनेक संधी आहेत. अन्नधान्य उत्पादन , ऊर्जा क्षेत्र आहे, संरक्षण क्षेत्र आहे औषध निर्माण आहे, तंत्रज्ञान क्षेत्र आहे. मुख्य आहे संशोधन क्षेत्र. आता कोरोना काळात औषध क्षेत्रात भारताला यात लागणार्या औषधे व वस्तूंची निर्मिती करण्याची संधी मिळाली आहे. अशा संधी घेऊन स्वावलंबी होणं केंव्हाही देशाच्या दृष्टीने हिताचेच आहे.
भारत स्वयंपूर्ण झाला तर भारताची अर्थव्यवस्था सुधारेल. भारताची निर्यात वाढली तर त्यातून परकीय चलन जमा होईल. अर्थव्यवस्था बळकट होईल आपण जी वस्तूंची आयात करतो त्या वस्तु जर भारतातच आपण उत्पादित करू लागलो तर आपला पैसा बाहेर जाणार नाही, त्यामुळे भारताचा खर्च कमी होईल आणि वस्तूंची टंचाई भासणार नाही. तसेच किमती पण माफक राहतील, चलनवाढ होणार नाही. दर वाढणार नाही. देशातच खूप उत्पादन झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात राहतील आणि या वस्तूंची निर्यात करता येईल जेणे करून पुन्हा त्यावर परकीय गंगाजळी वाढेल.
स्वामी विवेकानंद यांनी जो देशाच्या पुनरुत्थानाचा मार्ग सांगितला की,“या देशाचे जीवन म्हणजे धर्म, याला धर्माचीच भाषा उमगते. धर्म हेच याचे प्राणतत्व, तुमचे राजकारण, समाज, महापालिका, प्लेगनिवारण कार्य, दुष्काळ निवारण, या गोष्टी केवळ धर्माच्याच माध्यमातून होतील, एरव्ही तुम्ही कितीही हातपाय हलवले तरी, आक्रंदने केली तरी त्याचा काही उपयोग नाही”. कसा याचा विचार आपण जरूर करू. आत्मनिर्भर होण्यासाठी , विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे आपले अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची आजही आवश्यकता आहे.
☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
लहानपणी सुट्टीमध्ये व्यापार हा खेळ चालायचा. मी नेहमी बँकर व्हायची. मला वाटायचे आपल्याला विकत घेणे, विकणे जमणार नाही. पण खेळ खूप आवडायचा. मग हळूहळू व्यापाराची गंमत कळायला लागली आणि मोठेपणाची बीजे रुजू लागली.
शाळा खूप छोटी होती. त्यामुळे फारश्या गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. वेगळे शिक्षण घेतले नाही. आजकाल शाळेमधून सुध्धा एक्स्ट्रा ॲक्टिविटीज खूप असतात.
नंतर एमएससी झाले. १९७५ साली.माझे पोस्ट ग्र्याज्युएशन आणि लग्न एकदमच झाले. कॉलेज संपले. आणि नवीन वैवाहिक जीवनाची सुरवात झाली. पण माझी मनापासून काहीतरी स्वतः करण्याची इच्छा प्रचंड होती. नोकरी न करता स्वतः लोकांना नोकरी द्यावी म्हणजेच एखादा व्यवसाय सुरू करावा अशी प्रबळ इच्छा होती. तसेही नोकरी करण्यास घरून विरोध होता.आणि मग माझ्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे १९७७ साली दिवाळी पाडव्याला घरामध्ये व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवली गेली. त्याला नाव दिले ‘ हेम इलेक्ट्रॉनिक्स ‘.दोन टेबले, एक कामगार आणि आमचे घर ही व्यवसायाची जागा. मग मार्केट शोधणे, कच्चा माल जमा करणे, हे सर्व सुरू झाले आणि मार्च ७८ मध्ये १००स्के. फूट जागेमध्ये तयार झाला पहिला प्रॉडक्ट.
नंतरची दोन वर्षे इमर्जन्सी लाईट युनिट्सच्या खूप ऑर्डर्स मिळत गेल्या. त्यावेळी ५-६ तास दिवे जात असत. अशी हळूहळू सुरवात झाली. नंतर आम्हाला मार्केटिंग एजन्सीनी संपर्क साधला आणि मग व्यवसाय वाढीस लागला. माझे पतीही ८४ साली नोकरी सोडून हेम इलेक्ट्रॉनिक्सला जॉईन झाले. ते बंगलोरहून M E झालेले असल्याने ते आल्यावर आम्ही जवळ जवळ २०० नवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणले.
त्यांची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ह्यामुळे आम्ही आमचे पाय घट्ट रोऊन परदेशी प्रॉडक्टच्या इतकेच उत्तम दर्जाचे पण संपूर्ण स्वदेशी बनवटीचे प्रॉडक्ट्स खूप कमी किमतीत सर्व इंजिनियरिंग इन्स्टिट्युट ,आर अँड डी लॅबना पुरवठा करू लागलो.
जसा जसा व्यवसाय वाढला तशी जागा कमी पडू लागली. मग आम्ही एम आय डी सी मिरजमध्ये आमच्या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केले. नंतर कालांतराने दुसरी इमारतही उभी राहिली.
माझा धाकटा मुलगा दोन वर्षे बंगलोर मधील मल्टी नॅशनल कंपनी मध्ये काम करून २००९ साली आमच्या कंपनी मध्ये रुजू झाला. तिघे मिळून २०२० डिसेंबरपर्यंत काम केले.
माझे पती ह्यांचे डिसेंबरमध्ये निधन झाले. थोडे दिवस मी थोडी व्यवसायापासून दूर गेले होते. पण आता पुन्हा नव्या दमाने कामात रुजू झाले.
व्यावसायिकाला वयाची अट नसते. एक उद्योजक स्वतः काम करून रोजगार निर्माण करतो आणि अप्रत्यक्षपणे सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सोडवायला मदत करतो.
म्हणून मला असे वाटते की जास्तीत जास्त मुलांनी फक्त छान नोकरी मिळवणे हे ध्येय न ठेवता, स्वतः उद्योजक होण्याचा विचार करावा.
सरकार नवीन उद्योगाला खूप मदत करते. महिला उद्योजकाला सरकारकडून खूप योजनाही जाहीर होतात.
म्हणून मला इतकेच सांगायचे आहे की कितीतरी क्षेत्रात अजून नवनवीन उद्योग निर्मिती होऊ शकते. नवीन पिढीने तिथे काही करत येईल का असा विचार करून आत्मनिर्भर भारत करण्यास सहाय्य करावे.
(पण, नेमकं इथेच कुठेतरी काहीतरी चुकतं आणि नाती तुटतात – फाटतात आणि लोक रस्त्यावर येतात… !) इथून पुढे —-
अशा तीन पिढ्यातले, हे तीन प्रतिनिधी आज रस्त्यावर होते …!
प्रसंगी या तिघांचा मी मुलगा झालो… प्रसंगी वडील झालो आणि जमेल तेव्हा यांचा आजोबाही झालो.
एकाच जन्मात तीन पिढ्या जगलो… !
सासवडला निघायची वेळ झाली, तिघांनीही डोळ्यात पाणी आणून मला निरोप दिला.
Paralysis वाल्या बाबांना काही केल्या हात जोडता येईनात…. मी त्यांच्या पाया पडलो आणि जोडू पाहणारे ते हात माझ्या हाताने माझ्याच डोक्यावर ठेवून घेतले…!
रस्त्यावरून आज हे तिघेही एकाच वेळी, एकाच दिवशी एकाच सुरक्षित घरात जातील…
मला किती आनंद झालाय…. हे सांगण्यासाठी…. कुठून शब्द उधार आणु….?
श्री मंगेश वाघमारे माझा सहकारी….!
मंगेशला म्हटलं, ‘सासवडला जाताना भारीतल्या भारी हॉटेलमध्ये यांना घेऊन जा आणि खाऊ पिवु घाला… जे हवंय ते.’
आम्ही काय करतोय ते रस्त्यात बघत उभा असलेला एक बिनकामाचा बघ्या छद्मीपणे म्हणाला, ‘पण यांना भारी हॉटेलमध्ये येऊ देतील का ?’
मला चीड आली… म्हणालो, ‘का रे ? ते माणसासारखे दिसत नाहीत तुला …?
का ती माणसं नाहीत… ?
का नाहीत येऊ देणार त्यांना हॉटेल मध्ये… ?
दोन पायांवर उभे असलेले तुझ्या बापाच्या वयाचे हे लोक तुला “माणूस” म्हणून दिसत नाहीत फुटक्या ???
रिकामटेकड्या बघ्याने माझा अवतार पाहून पळ काढला.
मंगेशकडे वळून बघत पुन्हा म्हणालो, ‘मंगेश, हॉटेलमध्ये तुम्हाला कोणीच अडवणार नाहीत, आणि जर कुणी अडवलंच तर सांगा यातला एक डॉ. अभिजित सोनवणेचा “भाऊ” आहे, एक “बाप ” आहे आणि एक “आज्जा” आहे !
मंगेशने गालात हसत या तिघांना हाताला धरून गाडीत बसवलं.
श्री अमोल शेरेकर, श्री गौतम सरोदे आणि श्री बाळू गायकवाड या माझ्या सहकाऱ्यांनी, मी पाहिलेल्या या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी खूप मदत केली….
अंघोळ घालण्यापासून ते पायातले किडे काढण्यापर्यंत या साथीदारांनी मला मदत केली…… मी ऋणात आहे त्यांच्या !
डॉ. भाटे सर, माझ्या कुटुंबातली ही तीन माणसं, आज मी आपल्या स्वाधीन करतोय…. आपल्या छत्रछायेखाली उर्वरित आयुष्य ते नक्कीच आनंदाने जगतील, याची मला खात्री आहे.
पूर्वी रस्त्यावर पडलेल्या, परंतु आता डॉ. भाटे दाम्पत्याच्या पदराखाली असणाऱ्या, इतर आई-बाबांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या, जर कोणाला सेवा करावीशी वाटली तर, ती डॉ. भाटे दाम्पत्याच्या माध्यमातून जरूर करता येईल.
त्यांचे फोन नंबर मी देत आहे.— 96890 30235 //7276647470
पुढे माझ्या या कुटुंबीयांना, हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून अत्यंत अदबीने मिळालेली वागणूक… माणूस म्हणून मिळालेला मान… याने हे तिघेही भारावून गेले.
त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञता, तृप्ती, समाधान आणि शांती असे सर्व संमिश्र भाव दाटून आले होते.
त्यांचे हे भाव म्हणजेच माझी जमा पुंजी….!
ही सर्व पुंजी मी माझ्या मनाच्या तिजोरीत जपून ठेवली आहे.
आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस मी असल्यागत मला वाटतंय राव… !!!
(या तिघांच्याही आत्मप्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीने माहितीसाठी त्यांचे फोटो Soham Trust या नावे असलेल्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत)
तिघांचीही सोय करणं गरजेचं होतं… पण माझ्या स्वतःकडे कोणतीही सोय नाही….
तिघांची एकदम, एकाचवेळी, सोय कुठे आणि कशी करणार ? कोण या तिघांना पटकन प्रवेश देऊन कायमची जबाबदारी स्वीकारेल ?
मी कात्रीत सापडलो होतो, आणि हे तिघेही माझ्याकडे डोळे लावून बसले होते….!
मागच्या आठवड्यात माया केअर सेंटरचे संचालक डॉ. श्री व सौ भाटेताई यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती.
या दाम्पत्याचं मला कौतुक वाटतं. जिथं प्रत्यक्ष मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत, तिथं हे दोघे रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना आपल्या घरात घेऊन येतात. मुलांनी सोडून दिलेल्या आईबापांना स्वतःचे आई-बाबा म्हणून सांभाळतात.
एखादी व्यक्ती घरात घेऊन येणं म्हणजे एखादी वस्तू घरात आणण्या इतकं सोपं नसतं. त्या व्यक्तीचं जेवण-खाणं, कपडा लत्ता, दुखणं खुपणं, सर्वच बघावं लागतं …. मरेपर्यंत!
अशात, यांच्याकडे जागा कमी, काम करायला कामगार मंडळी कुणीही नाहीत, अपुरी साधनसामुग्री, सरकारी कोणतीही मदत नाही.
डॉ सौ भाटेताई, स्वतः आजारी असून सुद्धा, स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करून या आईबाबांची सेवा शुश्रूषा करतात.
अशाही परिस्थितीत, यापूर्वी रस्त्यावर मला सापडलेले चार ते पाच लोक मी यांच्या सेंटरला ठेवले आहेत, डॉ भाटे दांपत्य, माझ्या या लोकांचा सांभाळ करत आहे.
ऋण कसं फेडावं यांचं ?
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असताना, आपण आणखी तीन लोकांचा भार यांच्यावर टाकावा का ? …. असं म्हणत, निर्लज्जपणे मी पुन्हा डॉ. भाटे सरांनाच फोन लावला.
भाटे सरांना विषय सांगताच ते चटकन म्हणाले, ‘पाठवून द्या सर माझ्याकडे त्यांना.’
‘पण भाटे सर, अगोदरच तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ मारून नेत आहात त्यात…’
मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, ‘परिस्थिती आपल्याला अनुकूल अशी कधीच नसते, ती आपल्याला बनवावी लागते सर, आणि आपण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसलो तर रस्त्यात पडलेले हे लोक आपली वाट न बघता देवाघरी जातील, आपणच मग आपल्याला माफ करू शकणार नाही… पाठवून द्या तुम्ही तिघांनाही…!’
काय बोलू मी या माणसापुढे ?
शुक्रवार 17 डिसेंबर 2021, हा दिवस या तिघांना भाटे यांच्या आश्रमात पाठवण्यासाठी मी निश्चित केला.
त्या अगोदर बाकीची सर्व तयारी म्हणजे पोलिसांना कळवणे, त्यांच्यासाठी लागतील त्या सर्व वस्तू विकत घेणे वगैरे सोपस्कार पार पाडले.
शुक्रवारच्या सकाळी यांची आंघोळ आणि दाढी कटिंग झाली.
यांना आणलेले नवे कोरे कपडे घातले. तिघांनाही नवीन बॅगा आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या बॅगेत ठेवून दिल्या.
आंघोळ आणि दाढी-कटिंग नंतर, वर्षानुवर्षे काळवंडून पडलेली पितळी समई, घासावी पुसावी आणि लख्ख व्हावी …. तसे आता हे तीघे दिसत होते… !
पहाटेचा काळोख हळूहळू विरत जावा आणि सूर्याने आपला मुखडा दाखवावा…. आज तसे ते दिसत होते… !!!
संध्याकाळी घरात पूर्ण अंधार असावा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली पणती आपण चेतवावी आणि यानंतर तो देव्हारा काळोखात उजळून निघावा, आज तसे भासत होते मला हे तिघेही…. !!!
माझ्यासाठी हिच पूजा…हाच माझा अभिषेक… !
हाच माझा नैवेद्य… हाच मला मिळालेला प्रसाद आणि हिच मी केलेली आरती… !!!
आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली !
(माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….!) इथून पुढे —-
पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर त्या रुग्णांमध्ये काहीही केलं तरी विशेष सुधारणा होत नसते, तरीही माझ्या या आजोबांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.
हेतू पुन्हा तोच…. किमान काही दिवस हॉस्पिटलमध्ये का होईना, पण चांगल्या ठिकाणी तरी राहतील आणि दोन वेळच्या जेवणाची तरी सोय होईल.
एके दिवशी या ही हॉस्पिटल मधून सुद्धा फोन आला, तुमच्या पेशंटचं जितकं काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं आहे, पेशंटला डिस्चार्ज देत आहोत, कृपया त्यांना घेऊन जावे.
आता या आजोबांना कुठे घेऊन जाऊ ? की सोडू परत बागेबाहेरच्या त्याच फूटपाथवर यांना ? की सांगू त्यांना ? पडून राहा इथे बागेबाहेर …. मरणाची वाट बघत !
प्रसंग तिसरा – पुणे कॉर्पोरेशनकडून शनिवारवाड्याकडे जात असताना, तिथल्या पुलावर अचानक एक फोन आला, मी गाडी थांबवून तो फोन घेतला.
माझं सहज लक्ष गेलं, पुलाच्या कठड्यावर एक मध्यम वयाची व्यक्ती बसली होती. त्याला दिसत नव्हतं, हे त्याच्या हालचालींवरुन मला समजलं, जागेवरच बसून त्याची काहीतरी चुळबूळ चालली होती.
थोडा चुकला, तर पुलाच्या कठड्यावरून सरळ खाली पाण्यात पडेल…. त्याला कुठेतरी सुरक्षित जागेत बसवून द्यावं, असा विचार करून त्याच्या जवळ गेलो, त्याला सुरक्षित जागेत हलवलं आणि सहज विचारपूस केली…
याचं सध्याचं वय साधारण 42
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच याला दिसत होतं, पण घरच्या कटकटीमुळे वैतागून पुण्यात आला, एका हॉटेलमध्ये नोकरी करून स्वतःपुरता व्यवस्थित जगत होता.
एके दिवशी, म्हणजे त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका अपघातात डोक्याला मार लागला आणि यात त्याची दृष्टी गेली.
दृष्टी गेली, तशी नोकरी गेली…. घर आधीच सुटलं होतं…. आता तो भिक्षेकरी म्हणूनच जगायला लागला. फूटपाथ वर राहायला लागला
जन्मतः ज्यांना दृष्टी नसते ते लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात….
पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी, दृष्टी जाणे हा धक्का अतीभयानक असतो. ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत….!
अचानक पणे बसलेल्या अशा धक्क्यातून कुणीच लवकर सावरू शकत नाहीत. अशात घरच्यांचा आधार असेल तर ठिक , पण ज्याला कोणाचाच आधार नाही, अशा दृष्टी गेलेल्या व्यक्तीने जगायचं कसं ?
याची कहाणी ऐकून, मी याच्या जवळ ओढला गेलो….
यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रात डोळ्यांच्या संदर्भात ज्या काही ट्रीटमेंट असतील त्या सर्व ट्रीटमेंट त्याला पुण्यातल्या नामांकित Opthalmologist कडून दिल्या. पण कसलाही फरक पडला नाही….
शेवटी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सांगितलं, निसर्गापुढे आपण हरलो आहोत, याला आयुष्यात कधीही दिसणार नाही.
याला हे समजल्यानंतर, ज्या पद्धतीने तो कळवळून रडला होता, ते कारुण्य मला इथे शब्दात मांडता येणं शक्य नाही.
तरीही त्याच्या मनाला उभारी देऊन, त्याला एक व्यवसाय टाकून दिला.
फुटपाथवर बसून तो हा व्यवसाय करायचा.
रात्री कुठेतरी आडोशाला झोपायचा. भुरटे चोर येऊन याला त्रास द्यायचे, झालेली कमाई काढून घेऊन पळून जायचे…. दिसत नसलेला हा…. याने प्रतिकार कसा करावा?
आता, वैतागून तो आत्महत्येची भाषा करायला लागला.
कुणाच्यातरी देखरेखीखाली त्याला ठेवावं असं मला वाटू लागलं…. अन्यथा डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःचा अंत करून घेतला असता…!
नेमकं काय करावं मी ? या एका मागोमाग आलेल्या तीन प्रसंगांनंतर…..?
पहिल्या बाबांची सोय कुठे करावी….? या विचारात असताना दुसरे बाबा समोर आले…..आता या दोघांची सोय कुठे करावी ? या विचारात असताना हा तिसरा अचानकपणे समोर आला…