☆ “असाही एक हृदयस्पर्शी खटला…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
* सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. *
“ वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही “ – त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरूद्ध दावा ठोकला…..
“ वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत.”…
…. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.
जजसाहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आई वडिलांनाच विचारले, ‘ आपली काय इच्छा आहे? ‘.. तेव्हा ते म्हणाले ‘ जजसाहेब आपणच सांगा काय ते. ’
…. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धाय मोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले.
धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय. आय. टी. इंजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत. या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आई वडिलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.
– – वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मुके अभंग, मुक्या ओव्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..
ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल.. अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ”
तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.
आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.
आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय. असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..
आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंतकरणाला देऊन गेली.
अधूनमधून होतात आमची भांडणे… पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..
तुम्हाला एक खरं सांगू.. ?
हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी आजोबा मुके झालेत. परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.
आणखी एक… घरातलं लहान बाळ रडायला लागलं, कि आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही… कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत.
ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.
नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना मला आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…
“जरी या वर्तमानाला
कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या
पिढ्यांशी बोलतो आम्ही”
मला नम्रपणे इतकंच सांगायच आहे की, “भट साहेब तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवित आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.
बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आईचं प्रेम.. तिचा स्पर्श” – लेखक : श्री दिलीप कुंभोजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
कवी माधव ज्यूलियन
☆
कविता : प्रेमस्वरूप आई (माधव ज्यूलियन)
कवी माधव ज्यूलियन म्हणजेच डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन यांची प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! ही लोकप्रिय कविता. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही कविता ऐकताना रसिकांचे मन गलबलते.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहास कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे. माधव ज्यूलियन यांचा जन्म बडोदे येथे झाला तर प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आवळस येथे झाले. पण परत बडोदे येथे मामाकडे जाऊन त्यांनी बी. ए. केले.
नंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून फारसी व इंग्रजीत एम. ए. केले. प्रथम फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते पण नंतर अमळनेर, कोल्हापूर येथे फारसीचे प्राध्यापक म्हणून काम केले. वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात त्यांना खूप तडजोड करावी लागली.
‘गॉड्ज गुड मेन’ या मेरी कोरलेली यांच्या कादंबरीतील एका व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्यूलियन हे नाव घेतले असे सांगितले जाते. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होत. त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता आणि कवित्व यांचा अपूर्व असा मिलाफ झालेला बघायला मिळतो.
जरी ते वृत्तीने झुंजार कवी जाणवले, तरी त्यांच्या साहित्यातून कणखरपणा बरोबर वात्सल्याची कोमल भावना अनुभवास मिळते. त्यांच्या ”गज्जलांजली” या निर्मितीमधून यौवनातील प्रेम व्यक्त झाले आहे पण त्या वेळेच्या समाजास हे मान्य झाले नाही, त्यांना ‘प्रणयपंढरीचा वारकरी’ ही पदवी देऊन हिणवले.
छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारतातली पहिली डी. लिट. प्रदान केली गेली. ते १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्ष होते. मराठीत त्यांनी उमर खय्याम यांचा रुबाया तसेच गझल, सुनीत हे काव्यप्रकार समर्थपणे आणले. ‘फारसी – मराठी शब्दकोश’ ही त्यांनी महत्त्वपूर्ण देणगी मराठी सारस्वताला दिली आहे.
ही कविता म्हणजे एक पोरका मुलगा जो आईच्या प्रेमाला लहानपणीच पारखा झाला आहे, त्याचे मनोगत आहे. त्याच्या मनोव्यापाराचे विश्लेषण आहे, त्याच्या भावनांचा हृदयस्पर्शी आविष्कार आहे. आजही आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकले आहेत त्यांना ही कविता आणि लतादीदींचा स्वर गलबलून सोडतो. प्रेम ही भावना ही दोन जीवांना अंतःकरणापासून जोडणारा अदृश्य धागा आहे किंवा आत्ताच्या भाषेत Cordless Bluetooth आहे.
त्यातही आई आणि मुलगा / मुलगी यांचे प्रेम म्हणजे अत्युच्च आणि निरपेक्ष असा ऋणानुबंध आहे. कधी कधी वास्तव इतके भयानक असते की मन स्वीकारत नाही. आई आता परत येणार नाही हे माहीत आहे. तरीही मनात आठवणींच्या पलीकडील डोंब पेटल्यावर तो वात्सल्य सिंधूला म्हणजेच प्रेमाच्या सागराला विचारत आहे – ‘ बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी?
नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना कांहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका॥१॥
आईविना वाढलेला, समजूतदार पोरका पोरगा प्रामाणिकपणे कबूल करीत आहे की माझी आबाळ झाली नाही, माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केले नाही. तरीसुद्धा… “आई तुझी उणीव माझ्या अंतःकरणात कायम आहे. तुझा चेहरामोहरा मला आठवत नाही पण माझा जीव हे ऐकत नाही, माझ्या मनाला तुझा स्पर्श हवा आहे. ” ही वेदनेची संवेदना आहे. ”ज्याचे जळते त्याला कळते, ” या उक्तीनुसार कवी येथे व्यक्त होत आहे.
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं
वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे॥२॥
वात्सल्य म्हटले की गाय आणि वासरू आपल्या डोळ्यासमोर नकळत येतात. वात्सल्य हा एक निरपेक्ष प्रेमाचा आदर्श आहे. मुल रडले की आई त्याला पदराखाली घेते. तिच्या दोन हातांचा स्पर्शही तिच्या दुधाएवढाच महत्त्वाचा आहे, तिची मांडी हा त्या बालकांचा विश्वास आहे, कवच आहे.
कवी आर्तपणे आईला सांगतो आहे, की माझी शारीरिक भूक ही वरचे दूध भागवेल पण माझी मानसिक भूक हा तुझा स्पर्शच आहे. दुसऱ्यांचे असे प्रेम पाहून मी जास्तच अस्वस्थ होतो, वाटते की आत्ताच्या आत्ता निघावे आणि तू जिथे असशील तेथे येऊन तुझ्या जवळ निजावे, तुला भरभरून पाहावे, आतून हसावे आणि तुझ्या हृदयात, मनात, अंतःकरणात विसावे. कवीची ही हृदयस्पर्शी आळवणी ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येते.
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरुनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी॥३॥
या कवितेचा अभ्यास करताना मनात सहज विचार आला, की शेक्सपियरच्या हॅम्लेटची प्रत्यक्ष आई कुठे आणि माधव ज्यूलियन यांनी या कवितेत उभी केलेली अप्रत्यक्ष आई कुठे आहे? भावना दोन्हीकडे आहेत पण संस्कृतीच्या संस्काराचा आविष्कार वेगळा आहे. लहान बालकाचा अस्वस्थपणा आईने त्याला छातीपाशी जवळ घेतले की कमी होतो, हृदयाचे वाढलेले ठोके आपोआप मंद होतात.
आई मला माहीत आहे, की तू या जन्मी मला भेटणार नाही तरी तुला भेटण्याची मनातील आस कमी होत नाही. तू परत जन्म घे, मी परत तुझ्याच पोटी जन्म घेतो. ही माझी इच्छा देव नक्की पुरी करेल. आद्य शंकराचार्य यांच्या पंक्तींमधून आपली पुनर्जन्मावरील श्रद्धा म्हणते, “पुनरपि जननं, पुनरपि मरणं पुनरपि जननी, जठरं शयनं”॥ माधव ज्यूलियन या वरील ओळीत हेच सांगताहेत.
तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी?
गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन् राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? ॥४॥
विविध उदाहरणांतून कवी माधव ज्यूलियन आपल्या भावना या पोरक्या मुलाच्या द्वारे रसिकांपर्यंत पोचवत आहेत. गायवासरू असू दे नाहीतर मायलेकरू… ताटातूट सहन होत नाही. देवकीने जन्म दिला तरी यशोदेचे प्रेम तितकेच खरे आहे. कान्हा, पान्हा आणि तान्हा यांचे नाते अतूट आहे.
तान्ह्यास दूर ठेवी – पान्हा तरीहि वाहे –
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;
नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते॥५॥
तान्ह्या बाळाला, बालकाला सोडून आई जरी दूर दूर गेली तरी प्रेमाचा पान्हा फुटतोच ना? (“घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी” संत जनाबाई). सतीच्या निष्ठुर प्रथेवर १८२९ मध्ये बंगालमध्ये प्रथम बंदी आली, तरी संपूर्ण देशातील जनमानसात हा नियम रुजायला बराच काळ गेला. काही परिस्थितीचे बळी गेले, तरी आज सतीप्रथेचे कोणीच समर्थन करणार नाही. आज मथितार्थ एकच घ्यायचा की हा पोरका अनाथ मुलगा आईची उणीव जाणून आक्रोश करीत आहे.
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.
सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥६॥
आईविना वाढलेला हा मुलगा म्हणत आहे, की जरी आज मी शिकलो आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे, मानसन्मान मिळाला तरी मी ”पोरका”च आहे. सगळं ऐश्वर्य मिळाले तरी आईचे प्रेम माझ्या नशिबात नाही. ही भावना माझ्या पोटात कायम पेटलेली आहे, ती मध्येच प्रसंगाने माझ्या मनावर अधिकार गाजवते.
आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे!
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥७॥
‘आई… ‘ लतादीदींचा आर्त स्वर अंतःकरणात घुसतो, तेव्हा कवीचे शब्द त्या आवाजात विरघळून जातात. आई तुझा वियोग, दुरावा, त्याच दु:ख कमी करण्यासाठी मला अख्ख ब्रह्मांड शोधले तरी तू सापडली नाही. आकाशातील सुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे उल्का रूप धारण करून तू परत ये! तुझा आत्मा शरीररूपात नसला, तो विदेह असला तरी माझ्या सभोवती आहे. तुझ्या अव्यक्त भावना मला अश्रूरूपात दिसल्या तरी मला आशीर्वादाचे ते तीर्थ जाणवते.
आपल्याकडे एक अशी म्हण आहे, की अशी दु:खद वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. ज्यांना आईचे प्रेम आणि सहवास लाभला त्यांना या पोरक्या मुलांची व्यथा कदाचित जाणवणार नाही पण कोणत्याही सहृदयी माणसाला समजल्याशिवाय राहणार नाही. माधव ज्यूलियन आणि त्यांच्या “प्रेमस्वरूप आई”च्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!
☆
लेखक : श्री दिलीप कुंभोजकर
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘ती’ बस कंडक्टर अशी का वागली? – लेखक : श्री चंद्रशेखर वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
मालेगांवला लग्नाला जायचं म्हणुन बस स्टँडवर आलो तरं सगळीकडे गर्दीचं गर्दी. लग्न सराई असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस प्रवाश्यांनी तुडुंब भरलेल्या.. बस्स! स्थानकाच्या आत शिरणारी बस पाहिले रे पाहिली की धावलेच प्रवासी. आतल्या लोकांना बस बाहेर येण्याची संधी न देता. जागा पकडण्याची नुसती शर्यत लागलेली. ड्राईव्हरची केबिन, खिडक्या, वाट्टेल तेथून आत जाण्याची धडपड. त्या गदारोळात अखेर महत्प्रयासाने मालेगांवला जाणाऱ्या बस मध्ये स्वतःला कोंबून घेतलं आणि कसाबसा दारांत उभा राहिलो. माझ्या नंतर बस मध्ये शिरायला कुणालाच वाव नव्हता इतकी बस फुल्ल होती.
आता ही बस कधी निघते याचं विचारात असताना लक्ष कंडक्टर सीट कडे गेलं. तर, त्यावर एक अगदीच तरूण कदाचित नवीनच असलेली महिला कंडक्टर एका हातात तिकिट देण्याचे मशिन आणि दुसऱ्या हातातला मोबाईल कानाला लावून कोणाशीतरी बोलण्यात मग्न होती. ‘निघालेच मी… अजुन थोडा वेळ जरा सांभाळा’ असं कांहीतरी काकुळतीला येवुन सांगत असल्याचं ऐकू येतं होतं. बोलणं झाल्यावर तिनं मोबाईल ठेवला आजुबाजुला एकदा पाहुन. डबल देण्यासाठी समोरची दोरी ओढली आणि तिकडं ड्राईव्हरने सेल मारला. पन्नास पंचावन्न प्रवाश्यांचे ओझे सांभाळत. कुरकुर करीत बस स्थानकाच्या बाहेर निघत मार्गस्थ झाली.
बस थोडीशी पुढे गेल्यावर ‘ती’ महिला कंडक्टर ‘तिकिट तिकिट’ हलक्या आवाजात ओरडली. पण बसचा आवाज आणि प्रवाश्यांची गडबड यांतच तिचा आवाज विरला. त्याचवेळी मी खिश्यातुन पैसे काढुन तिच्या समोर धरीत ‘एक मालेगांव’ म्हणतं तिकिट घेतलं. मग आजुबाजुला बसलेले उभे प्रवाश्यांची पैशे तिकिटाची देवघेव सुरु झाली. कदाचित काहींनी महिला कंडक्टर प्रथमच पाहिली असावी ते तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होते. हसुन कांहीतरी कॉमेंट्स पास करण्यात धन्यता मानीत होते. शेवटी बसच्या मागील भागातील प्रवाश्यांना तिकिट देण्यासाठी ‘ती’ गळ्यातली ब्याग आणि मशिन सावरीत उभी राहत. कांही अनावधानाने होणारे.. कांही हेतुपुरस्सर दिलेले धक्के… होतं असणारे स्पर्श यांना चुकवीत.. तोल सांभाळीत… सुट्या पैशांवरून.. मुलांच्या वया वरून नेहमीचे होणारे वाद यांना तोंड देतं देतं मागे जावू लागली… पण, ती कुठंतरी हरवल्या सारखी वाटतं होती. कसल्यातरी काळजीत असल्या सारखी.
तिकिटे देवुन झाल्यावर ती पुन्हा सीटवर येवुन अधीरतेणे शुन्यात नजर लावून बाहेर बघत होती. मधुनच येणाऱ्या मोबाईलवर ‘आलेच… पोहोचतेच’ अशीच उत्तरं देवुन फोन कट करीत होती. दरम्यान, बसने चांदवडचा टोलनाका पास केला होता. चांदवडच्या बस थांब्यावर बस उभी राहताच उतरणारे चढणारे यांची पुन्हा एकवार झुम्बड उडाली आणि त्या गर्दीत ‘ती’ घाईघाईने खाली उतरून गेली. एसटी बस पासुन थोड्या अंतरावर एक पडदे लावलेली रिक्षा उभी होती. चपळाईने ती रिक्षात शिरली. एव्हाना चढ उतार करणारे प्रवासी बस निघण्याची वाट पाहतं चुळबुळ करीत. बसची कंडक्टर गेली कुठं? असं विचारून ड्राईव्हरला भंडावून सोडीत होते. ‘येईल इतक्यात’ म्हणुन वेळ मारून नेत होता. माझंही कुतूहल जागं झालं होतं…
माझी नजर त्या दूरवर उभ्या रिक्षावर खिळली होती. कांहीच अंदाज येतं नव्हता. तोच ती रणरणत्या उन्हात उभ्या रिक्षातून घाईघाईने खाली उतरली. अक्षरशः धावत बसकडे येतं तिच्या सीटवर बसली आणि डबल बेल दिली. बस मालेगांवच्या दिशेनं निघाली. तिच्या शेजारी असलेला प्रवासी उतरून गेल्यानं मला बसायला जागा मिळाली होती. तिच्याकडे पाहताना एक जाणीव झाली. तिच्या चेहेऱ्यावरची काळजीची छटा लोपली होती. ती थोडीशी सावरल्या सारखी दिसतं होती.
नवीन प्रवाश्यांना तिकिट देवून ती शांत बसली होती. शेवटी न रहावुन. “ताई तुम्ही बस सोडून कुठं गेला होता? प्रवासी ओरडत होते” मी विचारलं… माझ्या अनपेक्षित प्रश्नानं क्षणभर ती गोंधळली. पण तडक उत्तरली.
“माझ्या साडेचार महिन्यांच्या बाळाला दूध पाजायला.. हों… नाशिक मालेगांव- मालेगांव नाशिक अश्या फेऱ्या मारताना रोजचं मला असं करावं लागतं… माझे पती इथेच चांदवडला रिक्षा चालवतात… सासुबाई बाळाला रिक्षात घेऊन येतात. भुकेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी दूध पाजते आणि पुढे जाते. कंडक्टर म्हणून आत्ताच नोकरीवर रुजू झाले. त्यामुळं रजा नाही. त्यासाठीच हे सगळं करावं लागतं. प्रवासी ओरडतात, तक्रारी करतात, पण त्याला ईलाज नाही. बाळासाठी नोकरीसाठी सारं सोसावं लागतं. ” ती बोलत होती. मी तिची व्यथा ऐकत होतो. न रहावून माझ्या जवळची माझी पाण्याची बाटली मी तिच्या समोर धरली. बुच उघडून ती अर्धे निम्मे पाणी घटाघटा प्याली. जणू बाळाला दूध पाजेपर्यत तिला तहान भुकेची कांहीच शुध्द नसावी इतकी ती तहानलेली होती. ‘धन्यवाद काका’ म्हणतं तिनं पाण्याची बाटली परत केली.
तिनं उलगडलेल्या तिच्या या अश्या दैनंदिन प्रवासाच्या कथेमुळं माझ मन हेलावल होतं. बाळासाठी आणि नोकरी टिकवण्याची तिची होणारी ससेहोलपट प्रत्यक्ष पाहतं अनुभवीत होतो. त्याचबरोबर नकळत तिच्यातील स्त्रीशक्तीला, तिच्या सहनशक्ती पुढं नतमस्तक होतं होतो. तिच्यातील मातृत्वाला. आपल्या बाळासाठी इतकं सगळं सोसणाऱ्या एका आईला वंदन करीत. आदराने तिच्या कडे पाहतं होतो. ती मात्र एखाद्या देवालयातील मुर्ती सारखी डोळे लावून शांत बसली होती. मालेगांव नाशिक येतांना पुन्हा आपल्या बाळाला दूध पाजण्याच्या विचारांत. स्वतःला तयार करीत असल्यासारखी….
लेखक : श्री चंद्रशेखर वैद्य
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सम्राट अशोकाची जयंती का नाही?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?
खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा!
सम्राट अशोक
वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्ता
आईचे नाव – सुभद्राणी
“सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.
“सम्राट” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.
“सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.
ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.
“अखंड भारत”(आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…
सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.
“सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.
“सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.
ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रेड ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2,000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..
माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.
– असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टी जाहीर केलेली नाही?
ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.
“जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर” कसा झाला??
चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.
आपण सर्वांनी मिळून ही “ऐतिहासिक चूक” सुधारण्याची शपथ घेऊया. 🙏
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ “महाभारताचा सारांश…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
– – फक्त थोडक्यात महाभारताचा सारांश समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोकांचे सार आहे.
तुम्ही हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे,
तुम्ही स्त्री असो वा पुरुष,
तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,
तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,
— —
जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… “कौरव”
तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… “कर्ण”
तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… “अश्वत्थामा”
अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… “भीष्म पितामह”
संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते… “दुर्योधन”
सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल… “धृतराष्ट्र”
ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल… “अर्जुन”
फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही… “शकुनी”
जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही…“युधिष्ठिर”
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अध्यात्मिक रंग होळीचा…‘– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
आध्यात्मिक रंग होळीचा 🟥🟧🟨🟩🟦🟪
एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडे गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी… हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणुन त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली…
ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… हळु हळु लोकांची गर्दी वाढु लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवुनही देत होता.
असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलुन निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणुस भगवंतासमोर हात जोडुन अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला माझे ही एक वस्त्र रंगवुन हवे आहे. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे.
… कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पुर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून “जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा”… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तु नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….
उसी रंग में रहना रे बंदे,
उसी रंग में रंगना….
जिस रंग में परमेश्वर राखे,
उसी रंग में रंगना….! ! !
☆
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈