मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ सुंदरता… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू… 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्योंकि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। ’

—- फार छान ओळी आहेत या की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ 

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो. जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

— सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

— स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

— तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

— तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

— तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

— तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे….. 

— प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

— आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

— नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

— दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

…… म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल.

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.

एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.! 

म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.

म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!

टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.

ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.! 

मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.

आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.

चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.

तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली  रिकामी पडलेली दिसली. 

तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.

मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!

लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.

मी बागेला पाणी घातलं नाही,

कार धुतली नाही,

डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,

बिलांचे चेक टाकले नाहीत,

वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,

कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!

माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?

अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.

२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 

३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.

४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.

५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.

६. स्वयंशिस्त बाळगावी.

७. वय वाढते तसे ‘मन धावते,  पण शरीर धावू शकत नाही’ याचेही भान ठेवावे. शारीरिक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 

८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 

९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 

ध्यानधारणेचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(Glory of Indian Architecture…) 

ऐहोळे, दख्खनचं पठार, कर्नाटक…

Khalil Gibran says ….  “And let to-day embrace the past with remembrance and the future with longing. Art arises when the secret vision of the artist and the manifestation of nature agree to find new shapes.“ 

पाषाणातली अथांग मृदुता ….

ही अद्वितीय निर्मिती सातव्या शतकातली आहे. म्हणजे आजमितीला बाराशे तेराशे वर्ष एवढा कल्पनेपलीकडचा काळ या मूर्तीने वादळं, उन्हाळे, पावसाळे झेलले आहेत. दख्खनच्या पठारावरचा अविरत वाहणारा वेडापिसा वारा झेललाय. तरीही ही कला दिमाखात उभी आहे. हे पाषाण चिरंजीव आहेत.

थोडंसं नीट बघा. मन देऊन बघा. तो किती आर्जव करतोय. आणि ती लटक्या रागाने हे सगळं सुख उपभोगत्येय. त्या दोघांचं हे प्रेम कालातीत आहे, हेच ही मूर्ती सांगत्येय. त्या शिल्पीनी … कलाकारांनी पराकोटीची कमाल केल्येय. महाकठीण पाषाणाला जुईच्या फुलासारखं नाजूक, मृदू केलंय. दोघांच्या शरीरातला कण न कण ती मृदुता … त्यांचं प्रेम, भावना दर्शवतोय. कलेची आपली परंपरा किती दिव्य आहे, हे आपल्याला सांगतोय. नीट बघा …कलाकारांच्या छिन्नी हातोडयाची अगाध किमया. त्यात त्यांनी प्राण ओतला. भावना, घाट, पोत, प्रमाणबद्धता, बारीक कलाकुसर यांची अजोड घडण सामान्य मनाला देखील जाणवत्येय. 

…… खरंच  पाषाणातली मृदुता अथांग आहे. 

चित्र साभार – श्री प्रकाश पिटकर 

लेखक – श्री प्रकाश पिटकर 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उत्तरायण….दक्षिणायन… Adv. समीर आठल्ये, देवरुख ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उत्तरायण….दक्षिणायन… Adv. समीर आठल्ये ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

उत्तरायण दक्षिणायन संदर्भास चपखल शोभणारी कविता :-

 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे 

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे॥

 

रवि जरासा अवखळ भारी

          एका जागी स्थिर नसे 

               एका जागी नित्य उगवणे

                   हेच तया मंजुर नसे॥  

 

वदे रवि तो ब्रह्मापाशी 

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी                    

 मजला येईल कंटाळा॥

 

आज येथुनी उद्या तेथुनी

      उगवलो तर होईल छान

         रोज नव्या देशाला देईन

            पहिला बघण्याचा हो मान॥  

 

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा 

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायचा॥

 

मान राखुनी परी रविचा

   ब्रह्मदेव वदले त्याला

       उगवताना पूर्व दिशा अन्

            पश्चिमेस जा अस्ताला॥

 

परी उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा 

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा॥

 

सूर्य तोषला रचना ऐकून 

    उदय आणिक अस्ताची

        दिशा जरी ती एक परंतु

            जागा बदले नित्याची॥

 

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे॥

 

संक्रमणाने फुलते जीवन

   गती लाभते जगण्याला

      म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

          नभांगणातुनी दिवसाला॥

 

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे॥

 

कवी : Adv. समीर आठल्ये, देवरुख. 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं.… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. ” माझं चुकलं ” बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा आता करू वाटतं नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोकं आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटतं नाही. चूक बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते.आधी दुनिया खूप पुढे चाललीये, लोकं फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साइड पट्टीवर निवांत चालत  राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील. हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं..आपण बरं आणि आपलं आयुष्य बरं…

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

छापा की काटा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

दोघांचीही निवृत्ती झाली होती

साठी कधीच ओलांडली होती

अजूनही परिस्थिती ठीक होती

हातात हात घालून ती चालत होती

 

तो राजा होता ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती

 

अचानक त्याची तब्येत बिघडते

मग मात्र पंचाइत होते

तिची खूपच धावपळ होते

पण कशीबशी ती पार पडते

 

आता तो सावध होतो

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो

वारसाची पुन्हा खात्री करतो

मृत्यूपत्राची तयारी करतो

 

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो

पासबुक तिच्या हातात ठेवतो

डेबिट कार्ड मशीनमध्ये घालतो

तिलाच पैसे काढायला लावतो            

 

पुन्हा तिला सोबत घेतो

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो 

तिलाच रांगेत उभं करतो

बिल भरायचं समजावून सांगतो

 

अचानक तिला सरप्राईज देतो

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो

वाय-फाय नेटची गंमत सांगतो

नवा सोबती जोडून देतो

 

बाहेरच्या जगात ती वावरू लागते

प्रत्येक व्यवहार पाहू लागते

कॉन्फिडन्स तिचा वाढू लागतो

निश्चिंत होत तो हळूच हसतो     

 

बदल त्याच्यातला ती पहात असते 

मनातलं त्याच्या ओळखत असते

थोडं थोडं समजत असते 

काळजी त्याचीच करत राहते

 

एक दिवस वेगळेचं घडते

ती थोडी गंमत करते

आजारपणाचा बहाणा करते

अंथरूणाला खिळून राहते

 

भल्या पहाटे ती चहा मागते

अन् किचनमध्ये धांदल उडते

चहात साखर कमी पडते

तरीही त्याचे ती कौतुक करते

 

नाष्ट्यासाठी उपमा होतो

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो

दिवसा मागून दिवस जातो

अन् किचनमधला तो मास्टर होतो

 

कोणीतरी आधी जाणार असतं

कोणीतरी मागं रहाणार असतं

पण मागच्याचं आता अडणार नसतं

अन् काळजीच कारण उरणार नसतं

 

सह-जीवनाचं नाणं उडत असतं

जमिनीवर ते पडणार असतं

आधी काटा बसतो की छापा दिसतो

प्रश्न एकच छळत असतो…!! …… 

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 47 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 47 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

८७.

किती आशेनं मी तिला शोधायला निघतो.

माझ्या खोलीच्या कोणत्याही

कोपऱ्यात ती मला सापडत नाही.

माझं घर छोटं आहे.

एकदा हरवलेली वस्तू त्यातून पुन्हा मिळत नाही.

तुझं निवासस्थान अफाट आहे.

हे स्वामी हरवलेली ती वस्तू शोधायला

मी तुझ्या दाराशी आलो आहे.

सायंकालीन आकाशाच्या सोनेरी छताखाली

उभं राहून माझे उत्सुक डोळे

तुझ्या चेहऱ्याकडे मी लावतो.

जिथून काहीच नाहीसं होणार नाही

त्या शाश्वताच्या काठावर मी आलो आहे.

आशा,सुख,दृष्टी जी आसवांतूनही पाहू शकते –

हे काहीही नाहीसं होणार नाही.

माझं रिकामं आयुष्य त्या सागरात इतकं

बुडवून टाक की ते पूर्णपणे आतपर्यंत भरू दे.

मला एकदाच त्या विश्वाच्या पूर्णतेचा

मधुर स्पर्श अनुभवू दे.

 

८८.

भग्न मंदिरातील देवते!

वीणेची तुटलेली तार तुझं स्तवन गीत गात नाही.

सायंकालीन घंटानाद तुझ्या पूजेची वेळ झाली

हे सांगणार नाही.

तुझ्या भोवतीची हवा स्तब्ध, शांत आहे.

 

उनाड वासंतिक वारा

तुझ्या निर्जन निवासात शिरतो.

आपल्या बरोबर तो फुलांचा सुगंध आणतो.

पण ती फुलं तुझ्यावर पूजेत उधळली जात नाहीत.

 

पूर्वीचा तुझा पुजारी अजून भटकतो आहे.

आपली तेव्हाची मन:कामना पूर्ण होईल असं त्याला वाटतं.

सायंकाळी जेव्हा उन आणि सावल्या धुळीच्या अंधारात मिसळून जातात

तेव्हा मनात आशा धरून थकून -भागून तो या

भग्न मंदिरात येईल.

त्यांच्या पोटात तेव्हा भूक असेल.

भग्न मंदिरातील देवी,

आवाज, गोंगाट न करता उत्सवाचे किती दिवस

तुझ्या मंदिरात येतात.

दिवा न लावताच किती तरी रात्री

प्रार्थना, पूजा न करताच जातात.

 

तल्लख बुद्धीचे किती कारागीर

नवनवीन मूर्ती बनवतात. त्या मूर्ती त्यांची वेळ

येताच विस्मृतीच्या विरून जातात.

फक्त भग्न देवालयातल्या मूर्तीच

मृत्युहीन विस्मरणात अपूजीत राहतात.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता. आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली. व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !

घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले..!  काजव्याच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली, ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत  ..! सेवक ओरडला, ” मालक , तुम्ही  एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा !”

व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखीच चमकत होते.

व्यापारी म्हणाले:  “मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे !” 

नोकर मनात विचार करत होता, ” माझा मालक किती मूर्ख आहे….!”

तो म्हणाला:  ” मालक यात काय आहे हे कुणालाही कळणार नाही !”  तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. 

उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, ” मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे मी काजव्याखाली लपवले होते.  आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!” 

व्यापारी म्हणाला,  ” मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे, म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही !”  जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता….!

शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: “ खरं तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. “ या कबुलीजबाबानंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी केली आणि त्यातील हिरे मोजले !

—  पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही, तेव्हा तो म्हणाला, “ हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते ? “

 व्यापारी म्हणाला…. ” माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान….!”

 विक्रेता मूक होता !

—  ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, ‘ स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा ‘, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे….!

आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते

आणि….

जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते !!*……

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं ! ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 सुख म्हणजे नक्की काय असतं ! 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं. 

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.  

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं?  

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,

सुख म्हणजे काय?—–

उत्तरं अगदी भन्नाट होती.

कोणी लिहिले,

निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. 

एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. 

एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणं म्हणजे सुख. 

एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. 

कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख. 

तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. 

सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे—- म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, 

कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, 

कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत…. 

आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

— म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे. 

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत. 

— मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.

हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो.  पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.

जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलंबित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

—  प्रत्येक गोष्टीत टेन्शन. 

— जागा शोधायचं टेन्शन. 

— कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन. 

— ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं. 

गृह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,  संसारसंगे बहु कष्टलो मी ! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

मुलं मोठी  होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करू लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,

“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “ प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.  काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटीपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला — आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

— हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय? 

— परमात्मा मेहेरबान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?  

— घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय? 

 ’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं

काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं

मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात. 

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका, आणि  आनंदाने जगू लागा.

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्याई… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्याई… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा   विनाश होण्यास  सुरूवात झाली आणि शेवटी  रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही ! 

अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त रहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून त्यांना राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की ‘ काका! आपण तीर्थयात्रेला जावे ‘. जसे विदुराने हस्तिनापूर सोडले, तसे कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले, आणि  कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !! 

याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत  आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा ! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने  मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !!  सोबत काही घेऊन आलो नाही व  जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares