मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अग्निरूपेण संस्थिता…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“अग्निरूपेण संस्थिता… ☆ श्री संभाजी बबन गायके 

भस्मासूराची राखरांगोळी करण्यासाठी हृदयात अग्निचा संचार व्हावा लागतो… आणि हा अग्नी प्रज्वलित व्हावा यासाठी मुखाने त्या अग्नीला आवाहन करावे लागते… मरणावर चालून जाताना एकाच वेळी हजारो मुखांतून ज्वाला माता की जय! असा जयकारा उच्चारला जातो… आणि उर्वरित कार्यभार अग्नी देवता तिच्या शिरावर घेते!

भारतीय सैन्यातील Gentlemen Warriors अर्थात सभ्य, सुसंस्कृत लढवय्ये अशी ख्याती असलेले डोग्रा सैनिक जेंव्हा सैनिकी कारवाईस निघतात, आनंदाचे क्षण साजरे करतात तेंव्हा त्यांची पहाडी गर्जना असते… ज्वाला माता की जय!

जळी, स्थळी, अग्नी आणि पाषाणी आपल्या देवता वास करतात! पाषाण कितीही कठीण असला तरी त्याच्यातून भावनांचा झरा प्रवाहित करण्याची मानवी मनांत शक्ती असते. आभाळातून बर्फ पडतो हे जरी खरं असलं तरी त्या बर्फाने मनातल्या शिवलिंगाचं दृश्य स्वरूप धारण केलं तर तो बर्फच शिवस्वरूप होऊन जातो! अग्नीचं तरी काय निराळं असतं… प्राणिसृष्टि सदैव सचेतन राखण्यासाठी जे चैतन्य आवश्यक असतं त्यासाठी अग्नीच कारणीभूत. अशावेळी या अग्नीची एक पुसटशी ज्वालासुद्धा देवता बनते!

अग्नी प्रज्वलित होण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते हे कुणीही नाकारणार नाही, पण या इंधनाचा स्रोत, त्याची निर्मिती कुणीतरी करत असेलच… आणि निर्मितीचे पितृत्व निसर्गाच्या भाळी स्पष्टपणे गोंदवलेलं दिसतं!

सुमारे हजार वर्षांपूर्वी देवभूमी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एका पर्वताच्या पायथ्याशी एकाच वेळी नऊ ज्वाला प्रकटल्या असं इतिहास सांगतो… आणि हे उघड्या डोळ्यांना दिसतं… आणि स्पर्शाला जाणवतं!

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि सामूहिक मानसशास्त्र यांच्यात मानवी मनाची शक्ती अजेय ठरते. एखाद्या घटनेचा अर्थ कसा लावायचा ते समूह ठरवतो… आणि त्याचा निर्णय शिरसावंद्य मानला पाहिजे, असा संकेत आहे!

भूगर्भातून वायू उत्सर्जित होत राहतो आणि त्याला अग्निचा स्पर्श घडल्यास त्यातून ज्योत उमलते हे साहजिकच. परंतु एवढ्या मोठ्या प्रदेशात, विशिष्ट ठिकाणी असं घडणं याला दैवी चमत्कार अशी संज्ञा प्राप्त होणंही काही आश्चर्याचं नाही.

मनातील भावनांच्या ज्योती मालवून टाकणं शक्य नसतं. भौतिक ज्योत फुंकून टाकता येते… पण इथं तर तेही शक्य झालेलं नाही आजवर. तरवारीच्या जोरावर तसं करूनही बघितलं गेलं… पण ज्योती आजही लवलवत आहेतच. भूगर्भ वायूतज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले आहेत. किमान याक्षणापर्यंत तरी कुणाला स्रोत समजला नाही… ! असो.

मानवी बुद्धीच्या, आकलन शक्तीच्या पल्याड बरंच काही असतं. एखाद्या श्वानाला जो गंध जाणवतो तो विकसित मानवी घ्राणेंद्रिय टिपू शकत नाहीत… याचाच अर्थ आपल्याला मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणे किंवा न करणे यावर सर्वसामान्य मानवी व्यवहाराचे काहीही अवलंबून नाही! यास्तव सामान्यत्वाचा छाप घेऊन जगणाऱ्यांनी चमत्कारांना नमस्कार करणे क्रमप्राप्तच असते.

जम्मू – काश्मीर, हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी डोग्रा नावाच्या समाजसमूहातून अत्यंत नीडर, कर्तव्यदक्ष, कणखर आणि त्याचवेळी सुसंस्कृत, सभ्य सैनिकही जन्म घेतात. त्यांच्या माध्यमातून भारत भूमीच्या पर्वतीय सीमा अभेद्य आहेत. या सैनिकांनी ज्वाला मातेला त्यांची रक्षक, पूज्य आणि स्मरणीय देवता मानली आहे. आणि याच भक्तीचा आधारे त्यांनी शक्तीची जोपासना केली आहे.

ज्वालामुखी, ज्वालाजी अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राचा जीर्णोद्धार, विकास डोग्रा सैनिक मोठ्या आस्थेने करत असतात, हे लक्षणीय आहे!

अखेरीस, भारतभूमी देवता मानली असता तिची अशी पूजा बांधणे सर्वथा वंदनीय मानले पाहिजे!

सैनिक आहेत म्हणून देश आहे… आणि हे सैनिक जिथे माथा टेकवतात.. ते ठिकाण आपल्यालाही पूजनीय असावे!

यानिमित्ताने कर्तव्यं अन्वात्मा अर्थात मृत्यूआधी कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणारे डोग्रा सैनिक आणि व्याघ्रावर आरूढ ज्वालामाता यांना नमस्कार.. जय हिंद… जय हिंद की सेना!

(धरमशाला/धर्मशाला येथे स्थापित war memorial पाहण्यासारखे आहे. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात व्हावे!)

(लेखात व्यक्त केलेल्या भावना माझ्या वैयक्तिक आहेत. हिमाचल प्रवासातून..) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संतवाणी म्हणजे नेमकं काय ?? ” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “संतवाणी म्हणजे नेमकं काय ?? ” ☆ संकलन आणि प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग आहे.

ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते, कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात “कार्यक्रम संपला” अशीच भावना होती.

तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—

“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का?”

क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

पण भीमसेन जोशी थांबले.

त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं,

“अहो, पेटी-तबला काढू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”

… सगळे स्तब्ध झाले.

पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी

“ तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…” सुरू केलं.

सुधीर गाडगीळ सांगतात— ‘ तो अभंग मैफिलीचा फाके एक भाग नव्हता.. तर तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते— तर ते अनुभवत होते.

… अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.

गाडगीळ शेवटी म्हणतात—

“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली. ”

हा प्रसंग ‘ संतवाणी म्हणजे नेमकं काय ’ हे कायमचं समजावून जातो.

संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिंग्रोबा.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ शिंग्रोबा.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

शिंग्रोबा

शिंग्रोबा धनगर कोण होते? त्यांचं नाव मिसिंग लिंकला देण्याची मागणी का होतेय? वाचून अभिमान वाटेल – – – 

एक असा माणूस ज्यानं खऱ्या अर्थानं मुंबई-पुण्याला जोडलं. एक असा माणूस ज्यानं बक्षीसात मरण मागितलं. एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं…

अर्थातच ते व्यक्ती होते शिंग्रोबा धनगर… मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

मुंबई-पुणे मार्गाचे खरे शिल्पकार

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि आडवाटांची खडान् खडा माहिती असणारा हा माणूस! आज ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जातंय, पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते शिंग्रोबा धनगर यांना! ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील…..

शिंग्रोबा कोण होते? त्यांनी मुंबई-पुणे मार्गाचा शोध कसा लावला? आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली? – – 

साल होतं १८५०. भारतमातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते. देशातलं धन, धान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी १६ एप्रिल १८५३ रोजी देशात पहिली रेल्वे धावली- बोरीबंदर ते ठाणे..

… पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणं. मात्र, मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता, आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपाऱ्यांतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा? हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या. कित्येक गोरे तज्ज्ञ आले, डोकं खाजवून परतले. पण सह्याद्रीनं कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग जंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या.

शिंग्रोबा धनगर आणि इंग्रजांची भेट – – 

त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंग्रोबा धनगर. शिंग्रोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास! मेंढरं चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंग्रोबा लांबून बघत होते.

शिंग्रोबांनी ‘राजमार्ग’ दाखवला

‘रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात, ‘ हे शिंग्रोबांच्या कुतूहलाचा विषय ठरला. शेवटी राहवलं नाही आणि शिंग्रोबांनी विचारलं- “काय हरवलंय का तुमचं? काय शोधताय एवढं?” हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली “आम्हाला मुंबई-पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय… ” हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दडलंय. शिंग्रोबा हसले आणि म्हणाले- “चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. “

शिंग्रोबांच्या बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले

काही वेळातच शिंग्रोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे! एका धनगराच्या अनुभवापुढे सातासमुद्रापारची विद्या थकली होती. शिंग्रोबांच्या अफाट बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्याभल्या इंजिनिअर्सना सुटलं नव्हतं, ते एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं.

स्वाभिमान आणि बलिदानाची गोष्ट – – 

कमालीचे खूश झालेले गोरे अधिकारी शिंग्रोबांना म्हणाले- “माग काय मागायचं तुला? पैसा, जमीन की जहागिरी?” ती वेळ अशी होती की शिंग्रोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंग्रोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबाडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परकीय इंग्रज शिंग्रोबांनाही बोचत होते.

शिंग्रोबा शांतपणे म्हणाले “साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!” हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळाने सातासमुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं, हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या माणसाने त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंग्रोबांवर कृतघ्न इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंग्रोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानाने हा घाट अमर झाला.

शिंग्रोबांचे स्मारक : मिसिंग लिंकला नाव देण्याची मागणी – – 

शिंग्रोबांनी जिथे प्राणाची आहुती दिली, तिथेच आज त्यांचं एक छोटंसं श्रद्धेचं देऊळ उभं आहे. आजही जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचा ‘मिसिंग लिंक’ लोकांसाठी खुला झालाय. त्याला शिंग्रोबांचं नाव द्यावं*, अशी मागणी जोर धरतेय. सरकार काय निर्णय घेईल तो घेईल, पण शिंग्रोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली, हे त्रिकालबाधित सत्य आहे.

अपरिचित पण अलौकिक व्यक्तिमत्त्व शिंग्रोबा.

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

मागच्या भागात आपण रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथांविषयी थोडी माहिती घेतली. रविंद्रनाथांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजे देवेंद्रनाथ! त्यांनी बंगालचं सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विश्व समृद्ध केलं. त्यांच्याविषयी आणखी माहिती आज घेऊया.

ब्राह्मोसमाजाचे अनुयायी देवेंद्रनाथांचा उल्लेख महर्षी देवेंद्रनाथ असा करीत. तत्त्वबोधिनी पत्रिका ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस गती देऊन त्यांनी मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच लिहिले. ‘स्वरचित जीवनचरित’ हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे त्यांची मुले, सत्येंद्रनाथ आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी ‘देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित’ नावाने इंग्रजीत भाषांतरही केले.

देवेंद्रनाथांच्या मुलांनी देखिल विविध विषयात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवली. द्विजेंद्रनाथ कवि, दार्शनिक और गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. सत्येंद्रनाथ पहले भारतीय ICS अधिकारी बनले. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार व संपादक झाले. रवींद्रनाथांनी नोबेल पुरस्कार मिळवून जागतिक किर्ती प्राप्त केली. त्यांची कन्या स्वर्णकुमारी देवी देखिल प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार व संपादक होत्या.

देवेंद्रनाथांच्या नातवंडांपैकी अनेकजण लेखक, चित्रकार, संगीतकार, संपादक, राजकारणी वा समाजकारणी आहेत.

देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांचा साहित्यगुरू होय. देवेद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून, तो त्यांनी आप्तेष्टांना व स्नेह्यासोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि त्यांच्या आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही, स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी, विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली.

सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती. शिक्षणप्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. सर्वतत्त्वदीपिका सभा, तत्त्वबोधिनी सभा, हिंदू हितार्थी विद्यालय, समाजोन्नतिविधायिनी सुहृदसमिती इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.

बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनीच स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’मध्ये व नंतर ‘विश्वभारती’मध्ये केले.

देवेंद्रनाथांचा मृत्यू वयाच्या ८८ व्या वर्षी १९ जानेवारी १९०५ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला.

—–

☆ गीत : ७० ☆

IS it beyond thee to be glad with the gladness of this rhythm? To be tossed and lost and broken in the whirl of this fearful joy? 

All things rush on, they stop not, they look not behind, no power can hold them back, they rush on.

Keeping steps with that restless, rapid music, seasons come dancing and pass away ⎯colours, tunes, and perfumes pour in endless cascades in the abounding joy that scatters and gives up and dies every moment.

——

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७० ☆

किती चंचल अन् द्रुत ते संगीत

तरी, पदन्यास करीत त्या लयीत 

येती अन् जाती ऋतु सारे

*

रंग, गंध, अन् संगीत, सुरांचा

वर्षाव निरंतर करी तू सुखाचा

आनंदाचे भय परी मनी दाटते रे

*

क्षणात सारे विखरून जाते 

क्षणात सारे निसटून जाते

क्षणात सारे भंगून जाते

*

येथे तर सारे सतत धावती

मागे वळूनही कधी न पाहती

या रोखणे कुणा हाती असे का ?

*

घे तू ही आनंद, हा क्षणभराचा

घे तसा भावगंध, तरल संगीताचा

त्यात हरवून, विरून जाशील का?

*

असेल फक्त तुझाच हा क्षण

करून घे श्वासांचे औक्षण

तुज कुवत एवढी नसेच का?

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ७१ ☆

THAT I should make much of myself and turn it on all sides, thus casting coloured shadows on thy radiance ⎯ such is thy maya.

Thou settest a barrier in thine own being and then callest thy severed self in myriad notes. This thy self-separation has taken body in me

The poignant song is echoed through all the sky in many-coloured tears and smiles, alarms and hopes; waves rise up and sink again, dreams break and form. In me is thy own defeat of self.

This screen that thou hast raised is painted with innumerable figures with the brush of the night and the day. Behind it thy seat is woven in wondrous mysteries of curves,

casting away all barren lines of straightness.

The great pageant of thee and me has overspread the sky. With the tune of thee and me all the air is vibrant, and all ages pass with the hiding and seeking of thee and me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७१ ☆

तुझ्या तेजावर राया

माझी रंगीत छाया 

अशी तुझी माया 

देवा, अशी तुझी माया॥

*

स्वरलहरीतून अनंत

तुझी रूपे दिगंत

दाविसी मला पामरा

देवा, दाविसी मला पामरा॥

 *

गीते तुझी रसभरीत

निनादती गगनात 

भारती या विश्वाला

देवा, भारती या विश्वाला॥

 *

रंग अनेक शोकाचे

गंध अनेक हर्षाचे

तुझीच ही किमया 

देवा, तुझीच ही किमया॥

*

आशेच्या किरणांची

भीतीच्या डोहांची

भूल तूच पाडसी

देवा, भूल तूच पाडसी॥

*

ओहोटी अन् भरती

स्वप्ने काचेची फुटती

पुन्हा स्वप्ने तूच दाविसी

देवा, तूच स्वप्ने दाविसी॥

*

तुझ्या या चकव्यात

जरी मी नच फसत

हार तुझीच होते

देवा, तुझी हार होते॥

*

दिनरातीच्या कुंचल्याने

नाट्याचा पडदा बहु रंगांने

चितारसि, तूच रंगविसी 

देवा, तूच रे रंगविसी॥

*

त्या पडद्याच्या पार विराजे

आसन अगम्य रेषांचे तुझे

तसेच जीवन गुंतागुंतीचे

देवा, जीवन गुंतागुंतीचे॥

*

तू मला यात गुंतवावे

मी परंतु नच फसावे

मम सुरांनी गगन भेदावे

देवा, गगन सुरांनी भेदावे॥

*

खेळ चाले युगे युगे तरी

डाव मजवरी येता परी

नच सापडसी मला

देवा, नच सापडसी मला॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत ७२ ☆

HE it is, the innermost one, who awakens my being with his deep hidden touches.

He it is who puts his enchantment upon these eyes and joyfully plays on the chords of my heart in varied cadence of pleasure and pain.

He it is who weaves the web of this maya in evanescent hues of gold and silver, blue and green, and lets peep out through the folds his feet, at whose touch I forget myself.

Days come and ages pass, and it is ever he who moves my heart in many a name, in many a guise, in many a rapture of joy and of sorrow.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७२ ☆

हाच तो !

जो अंतर्यामी वसतो

दिव्य स्पर्शाने जागृत करतो

 

हाच तो !

मम नयनां मोहवितो

मम हृदीची तार छेडितो

सुख दुःखाची लय साधतो

 

हाच तो !

जो मायाजाल विणतो

सतत बदलत्या रंगी रंगवितो

सोनेरी, चंदेरी अन् कितीतरी तो

 

हाच तो !

युगायुगांची वाट दावितो

अनंत रूपे मम हृदयी भेटतो

ब्रम्हानंदी सुखदुःखाच्या असतो

 

हाच तो!

ज्याचे चरण पाहतो

अन् मी मजला हरवून बसतो

हाच तो अन् हाच तो!! 

*

– क्रमशः भाग २४..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झारमुरी – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ झारमुरी – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

हा खाद्य पदार्थ बंगाल मध्ये सर्वांनाच माहीत होता. पण निवडणुकीमुळे देशातच काय पण परदेशात सुद्धा एकाएकी प्रकाश झोतात आला. विदर्भात मात्र हा पदार्थ सर्वांनाच माहीत आहे. येथे याला चकना म्हणतात. अरे विज्या चकना बनवला की नाही. सर्व मित्र येतीलच. विजुभाऊ फक्त चकनाच खातो. हा पदार्थ केंव्हाही बनवता येतो. पण काही मुहूर्तावर बनवायचं लागतो. पण आता मात्र झारमुडी खूपच लोकप्रिय होईल. जो खातो तो जिंकतो.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… कोणताही ऋतू असो, भारतीय माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी कायम स्थिर असतात — चहा आणि त्याच्या सोबत काहीतरी खायला! आणि या “काहीतरी” मध्ये जर कोणी खरा राजा असेल तर तो म्हणजे झारमुरी आणि मुरमुरे चिवडा! बैठकीत तर पहिल्या क्रमांकावर असतो. समजदार को इशारा काफी है.

झारमुरी म्हणजे बंगालचा आत्मा आणि आपल्या गावाकडच्या मुरमुरे चिवड्याचा शहरात गेलेला चुलत भाऊ! फरक एवढाच की आपल्या इथला चिवडा शांत, साधा आणि घरगुती असतो; तर झारमुरी म्हणजे एकदम फिल्मी हिरो! कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, शेव, चटणी, मसाला… एवढे सगळे टाकून तो असा तयार होतो की वाटते आता हा थेट निवडणूक लढवेल!

पूर्वी गावात मुरमुरे चिवडा बनवणे म्हणजे एक कौटुंबिक सोहळा असायचा. आई मोठ्या परातीत मुरमुरे घेणार, त्यात फोडणीचा सुगंध पसरायचा. आपण बाजूला बसून “मी मदत करतो” म्हणायचो आणि मदतीपेक्षा खाणेच जास्त करायचो. आई म्हणायची, “अरे, पाहुणे येणार आहेत!” आणि आपण मनात म्हणायचो, “त्यांनी येण्याआधीच संपवूया!” 

त्या काळी चिवडा डब्यात भरून ठेवला जायचा. पण घरातील प्रत्येकाला त्या डब्याचे गुप्त ठिकाण माहिती असायचे. विशेषतः वडिलांना! रात्री सगळे झोपल्यावर स्वयंपाकघरात “टकटक… खुटखुट…” आवाज यायचा. आई विचारायची, “कोण आहे?” आतून आवाज यायचा, “मांजर असेल…” पण दुसऱ्या दिवशी डब्यातला चिवडा निम्मा कमी! ते मांजर दोन पायांचे असायचे हे सगळ्यांना माहिती असायचे.

झारमुरीवाल्यांची स्टाईल तर भारीच! हातात मोठा डबा, त्यात मुरमुरे आणि वर छोट्या छोट्या डब्यांत मसाले. तो ज्या वेगाने सगळे मिसळतो ते पाहून पहिले जिभेवर त्याचा परिणाम दिसतो. आणि शेवटी तो कागदाचा कोन करून झारमुरी देतो. त्या कोनातली झारमुरी खाताना अर्धी तोंडात आणि अर्धी शर्टावर पडते. पण तरीही आनंद असा मिळतो जणू काही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवत आहोत.

मुरमुरे चिवड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो “हलका” असतो. त्यामुळे माणूस स्वतःला फसवत राहतो. “अरे, हे काय… हलकेच आहे!” असे म्हणता म्हणता अर्धा किलो संपतो.

रेल्वे प्रवासात तर मुरमुरे चिवडा हा राष्ट्रीय खाद्यपदार्थ वाटतो. एकाने पाकीट उघडले की पूर्ण डब्यात सुगंध पसरतो. समोरचा माणूस लगेच पुस्तकातून वर बघतो. बाजूचा प्रवासी नकळत जवळ सरकतो. आणि दोन मिनिटांत “थोडे घ्या ना…” पासून मैत्री सुरू होते.

आजकाल मोठमोठ्या कंपन्यांनी झारमुरी आणि चिवड्याला आकर्षक पॅकेटमध्ये बंद केले आहे. त्यावर इंग्रजीत मोठे नाव लिहिलेले असते — “Spicy Puffed Rice Mix” पण आत उघडल्यावर चार शेंगदाणे, दोन कढीपत्ते आणि बाकी हवा! त्यापेक्षा आपल्या घरचा चिवडा म्हणजे प्रेम, आठवणी आणि पोटभर आनंद!

खरं सांगायचं तर मुरमुरे चिवडा हा फक्त खाऊ नाही. तो बालपण आहे, प्रवास आहे, गप्पा आहेत, आणि “थोडे अजून घेऊ का?” या मोहाचा अखंड इतिहास आहे! 

काल बंडोपंत खूप घाईत दिसले विचारले तर म्हणाले संध्याकाळी सुमी ला पहायला येणार आहे तू पण ये. मनात विचार आला बरे झाले बरेच दिवसात कांदेपोहे खायला मिळतील. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. सुमी आता कांदेपोहे घेऊन येईल असे वाटले तर सुमी झारमुरी घेऊन आली. ती खाल्ल्यावर पोराने पटकन मुलगी पसंत आहे असे सांगितले. एवढा इन्स्टंट इफेक्ट पहिल्यांदाच पाहिला. आता कांदेपोहे कार्यक्रम न होता झारमोरी कार्यक्रम होईल. शेवटी काय तर झारमुडी बनवताना ममता पाहिजे.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शेवटचा दुर्दैवी अध्याय …’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शेवटचा दुर्दैवी अध्याय …’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

सुवर्णमहोत्सवी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या प्रभात कंपनीच्या संत तुकारामया चित्रपटाच्या गाथेचा शेवटचा अध्याय दुर्दैवीच म्हणायचा.

ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू आणि वास्तू जपण्यात आपण भारतीय किती संवेदनशील (! ) आहोत याच्या खुणा देशातील कानाकोपऱ्यात आढळून येतात.

– – व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्तम चित्रपट’ हे ‘संत तुकाराम’ चे मूळ प्रमाणपत्र बरीच वर्षे हरवलेले होते. कोणाकडून, कां, कसे, कधी, हे प्रश्न इथे असंबद्ध आणि अप्रासंगिकच समजा. आपल्याला वाटत असेल, होता तो केव्हाचा तरी जुन्या जमान्यातील एक सिनेमा! एवढे काय मनाला लावून घ्यायचे! मुळात ते हरवलेले अमूल्य कागद गवसले नसते तरी ‘अळी मिळी गुप चिळी’ म्हणत आम्ही स्वस्थ बसलो असतो.

पण तुकारामांची फरफट आजच्या जमान्यात देखील सुरु ठेवण्यात अग्रेसर असलेले आपण कर्मदरिद्री आहोत हे एका प्रसंगाने दाखवून दिले – – 

– – – १९३६ सालचे ते हरवलेले मूळ प्रमाणपत्र १९७४ साली तिरुवनंतपुरमच्या सनी जोसेफ नामक सिनेमॅटोग्राफरला पुण्यातील लॉ कॉलेजच्या कचराकुंडीत सापडले. बहुदा पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीच्या मूळ परिसरात १९६० साली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था सुरु होणार असताना ‘आवाराची साफसफाई’ करतांना हे कागद कचराकुंडीत गेले असावेत.

– – – असो, जोसेफ यांनी ते मौल्यवान कागद २००२-२००४ च्या दरम्यान पुण्यातील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी सुपूर्द केले.

मैत्रांनो, ही माहिती वाचल्यावर मला एक गोष्ट ध्यानात आली की ज्या व्यक्तीला ते कागद सापडले तो सिनेक्षेत्राशी जोडलेला होता म्हणून त्याने किमान त्यांची किंमत ओळखली, अन्यथा… अधिक काय बोलणे?

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सुगंधययोग’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सुगंधययोग’ ☆ श्री दिवाकर बुरसे

इंद्रियभोगातून आत्मबोधाकडे

 — सुगंधाच्या माध्यमातून जीवनसमृद्धी व* *अध्यात्माचा सेतू*

प्रास्ताविक:

भारतीय जीवनदृष्टीत सुगंध हा केवळ इंद्रियांचा विषय नाही. तो दृश्य नाही, स्पर्श्य नाही; तो आसमंतात, सर्वत्र व्यापून राहतो. तो स्मृती चाळवतो, मन शांत करतो, शरीरावर परिणाम घडवतो, व्यक्तीला प्रमुदित, उल्हसित करतो तर साधकाला अंतर्मुख करतो.

म्हणूनच भारतीय शास्त्रपरंपरेत सुगंधाला भोग आणि योग यांच्यातील सेतू मानले गेले आहे. गंध हा स्थैर्याचा, धारणा-शक्तीचा, पोषणाचा गुण आहे. जिथे सुगंध आहे, तिथे तृप्त जीवन आहे.

गंधशास्त्र : भौतिकतेपासून अध्यात्मापर्यंत

आज ‘परफ्यूम’ हा शब्द ऐकला की लक्झरी, उच्छृंखलता, स्वैरता, सौंदर्य, आकर्षण यांची आठवण होते. परंतु भारतीय गंधशास्त्रात सुगंधाचा उद्देश केवळ आकर्षण नव्हता; तो आरोग्य, मनःशांती, सामाजिक प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती यांचा एकत्रित विचार करत होता.

रामायणात अयोध्येचे वर्णन येते. त्यात ‘ नगरातील पुष्पवाटिका सुगंधाने भरलेल्या आहेत ‘ असा आवर्जून उल्लेख केलाय महर्षींनी. इथे राज्याची समृद्धी सुगंधाने व्यक्त होते. समृद्ध समाज सुगंधलोलुप असतो. गृहस्थाने ऋतुमानानुसार सुगंध धारण करावा असे शास्त्र सांगते. हे भारतीय समृद्ध संस्कृतीचे सूक्ष्म संकेत आहेत.

गंगाधरकृत ‘ गंधसार ‘

सर्व गंधांचे सार

या गंधपरंपरेचे शास्त्रबद्ध रूप म्हणजे _’गंधसार’. _ ‘गंगाधरा’ने रचलेला हा ग्रंथ सुगंधनिर्मिती, इत्र, धूप, सुगंधी तेल, अंगराग, अंगलेप, सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गंध यांचे तंत्रशुद्ध विवेचन करतो. “सर्व गंधांचे सार” हे नाव केवळ काव्यमय वर्णन नाही; ते ग्रंथाच्या आशयाचे नेमके वर्णन आहे.

हा ग्रंथ केवळ शृंगार, भक्ती, पूजेसाठी नाही, तर तो

वैद्यांसाठी,

राज सभांसाठी,

जनसम्मेलनांसाठी,

उत्सव – महोत्सवांसाठी,

शोभायात्रांसाठी

व्यापाऱ्यांसाठी, आणि

 साधकांसाठीही आहे.

श्लोकबद्ध विज्ञान आणि सौंदर्य

गंधसार श्लोकबद्ध ग्रंथ आहे. परंतु हे काव्य अलंकारासाठी नाही; ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, त्यातील गंधशास्त्रसिद्धांत स्मरणसुलभ व्हावेत म्हणून. हे सूत्ररूपात मांडलेले ज्ञान – विज्ञान आहे.

सुगंधीं पुष्टिवर्धनम ।

गंध मनाला प्रसन्नता देतो आणि शरीराला पुष्टी देतो. गंधसार हीच भूमिका स्वीकारतो.

 

सुगंधांचे वर्गीकरण : द्रव्य आणि गुण

गंधसारमध्ये सुगंधांचे वर्गीकरण पुष्पगंध, काष्ठगंध, मूलगंध, फलगंध आणि प्राणिज गंध असे केले आहे. हे वर्गीकरण केवळ भौतिक नाही; ते गुणात्मकही आहे.

चंदनाचा गंध शीत, प्रसन्न, सत्त्ववर्धक आहे.

अगरुचा गंध उष्ण, स्थिर, वातशामक आहे.

कस्तुरी प्राणिज असूनही चेतनाशील आणि शक्तिवर्धक आहे.

म्हणूनच गंध हा द्रव्य आणि गुण यांच्यातील दुवा ठरतो.

 

कामसूत्रातील गंधयुक्ती : सुगंधाला लाभलेली सांस्कृतिक प्रतिष्ठा

भारतीय परंपरेत सुगंधनिर्मिती ही केवळ गृहकला नव्हती; ती एक प्रतिष्ठित विद्या मानली जात होती. वात्स्यायनाने आपल्या ‘कामसूत्र’ ग्रंथात सांगितलेल्या चौसष्ट कलांपैकी ‘गंधयुक्ती’ ही एक महत्त्वाची कला आहे. गंधयुक्ती म्हणजे सुगंधांची निर्मिती, त्यांचे योग्य संयोग, संवर्धन आणि उपयोग यांचे शास्त्र. ही कला केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर सामाजिक प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व विकास, प्रणय, आरोग्य आणि मानसिक प्रसन्नता यांसाठी आवश्यक मानली गेली होती.

वात्स्यायन सांगतो की सुसंस्कृत नागर व्यक्तीने सुगंधांची जाण ठेवली पाहिजे. ऋतूनुसार, प्रसंगानुसार आणि व्यक्तीनुसार योग्य गंधांची निवड हीच गंधयुक्तीची खरी कसोटी. यावरून स्पष्ट होते की सुगंधनिर्मिती ही त्या काळी स्त्री-पुरुष दोघांसाठीही एक सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण आणि प्रतिष्ठेची कला होती.

पुढे गंधसारसारखे ग्रंथ हीच परंपरा अधिक शास्त्रबद्ध, आयुर्वेदाधिष्ठित आणि तांत्रिक पातळीवर विकसित करतात. त्यामुळे कामसूत्रातील गंधयुक्ती आणि गंधसारातील गंधशास्त्र हे एका अखंड सांस्कृतिक परंपरेचे दोन टप्पे ठरतात.

 

गंधयुक्ती : रसायन नव्हे, संस्कार

गंधसारमधील भावना, पाचन, वेधन, संयोग, धूपन या प्रक्रिया पाहिल्या की लक्षात येते, येथे केवळ मिश्रण नाही, तर संस्कार आहे.

आयुर्वेदानुसार –

संस्कार म्हणजे गुणांचे रूपांतर. 

गंधयुक्ती म्हणजे द्रव्याला नवा गुण देणे. जड पदार्थाला सूक्ष्म आणि परिणामक्षम बनवणे.

 

सौंदर्य आणि समृद्धी

गंधसारमध्ये वर्णन केलेले अंगलेप, विलेपने, सुगंधी तेले, उटणी इ. केवळ सौंदर्यासाठी नाहीत तर आरोग्यासाठी आहेत. तसेच ही द्रव्ये सामाजिक प्रतिष्ठा, आकर्षण आणि समृद्धीची द्योतके आहेत.

प्राचीन राजसभा सुगंधाने ओळखल्या जात. निमंत्रितांचे स्वागत अत्तर लावून व सुगंधी जल शिंपडून केले जायचे. जसे राजशिष्टाचारात सुगंधांचे महत्व तसेच सार्वजनिक सभा संम्मेलनात, उत्सवकार्यात.

व्यापारात विविध रत्ने, चांदी, सोने या धातूंप्रमाणे सुगंधी द्रव्ये, इत्र, केशर, कसुरी इ. या मौल्यवान वस्तू मानल्या जात. त्याच्या विक्रीतून व्यापा-याला उत्तम प्राप्ती होत असे. त्यामुळे सुगंध हा अर्थकारणाचाही भाग होता.

 

आयुर्वेद आणि गंधसार : शरीर–मन–आत्मा

शरीर आणि मन यांचे स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. 

गंधसार या आरोग्याला सुगंधाच्या माध्यमातून साधतो. वात-पित्त-कफ दोषांनुसार गंध निवडणे ही पूर्णतः आयुर्वेदिक संकल्पना आहे.

वातासाठी — उष्ण, स्थिर गंध

पित्तासाठी — शीत, मधुर गंध

कफासाठी — तीक्ष्ण, उष्ण गंध

 

गंधचिकित्सा : नासिकेतून मनापर्यंत

नाक हे जसे श्वासाचे तसेच मनाचेही द्वार आहे, ही कल्पना भारतीय शास्त्रांना ज्ञात होती. योगशास्त्र म्हणते-

नासिकाग्रभागी मन एकाग्र करावे.

नाकातून प्रवेश करून सुगंध थेट मनावर परिणाम करतो. म्हणूनच गंधसारमध्ये अनिद्रा, चिंता, उदासीनता यांवर गंधोपचार सांगितले आहेत. आधुनिक Aromatherapy याच परंपरेचा आधुनिक अवतार आहे.

 

त्रिगुण आणि सुगंध

सत्त्व, रज, तम हे त्रिगुण

गंध हे मनोगुण बदलू शकतात.

सत्त्ववर्धक — चंदन, कमळ

रजशामक — अगरु

तमोनाशक — कर्पूर, धूप

साधनेत वापरला जाणारा धूप हा केवळ वातावरण सुगंधी करत नाही; तो मन शुद्ध करतो, ध्यानास सहाय्य करतो.

 

अध्यात्म आणि सुगंध

पूजेत देवाला नाना परिमल द्रव्ये अर्पण करावीत. _“यत्र गन्धः तत्र देवता: । जिथे सुगंध आहे, तिथे देवता वास करतात. _

सुगंध सूक्ष्म आहे. तो अहंकार तोडतो, मन प्रसन्न करतो, वातावरण पवित्र करतो. म्हणूनच धूप, अगरबत्ती, चंदन यांचा उपयोग पूजेत, साधनेत अनिवार्य मानला जातो.

 

भोगातून योगाकडे

गंधसारची सर्वात मोठी देणगी म्हणजे तो भोग आणि योग यांना परस्परांच्या विरोधात उभे करत नाही. सुगंध सौंदर्य देतो, आरोग्य देतो, व्यापार घडवतो आणि त्याच वेळी मन शुद्ध करून अध्यात्माकडे नेतो.

 

उपसंहार : सुगंध — एक सूक्ष्म साधना

आयुर्वेद तत्त्वज्ञान देतो.

गंधसार त्या तत्त्वांना अनुभव देतो.

सुगंध ही केवळ लक्झरी नाही; ती संस्कृती आहे.

तो केवळ भोग नाही; ती साधना आहे.

गंधसार हा ग्रंथ वाचकाला भान देतो की, जीवन समृद्ध हवे असेल, तर ते सुगंधी असले पाहिजे! 

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – राणी वेलू नचीयार – लेख क्र. ६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – राणी वेलू नचीयार  – लेख क्र. ६. ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या *वेलू* ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… *मुत्तू वेदुंगानाथ थेवर* यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक *विध्वंसक युद्ध* म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा *लढ, आगे बढो*… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या *समिधेने*! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक *मोळीच बांधली* तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… *कुयिली ला* आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी *कुयिली* ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात!

नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा *टिपू सुलतान* वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगईवीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

 वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपूयात ही त्रिपुटी… आणि म्हणूयात ना… तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हां घडो! 

– लेख क्र. ६.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पनीर : नीर-क्षीर विवेक!…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“पनीर : नीर-क्षीर विवेक!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

जग जवळ आलं नव्हतं तेव्हा ज्याने त्याने आपापल्या हवामानाला, परिस्थितीला आणि उपलब्धतेला साजेल असं भोजन विकसित केलं आणि त्यामुळे सारं काही व्यवस्थित सुरु होतं.

भारतही याला अपवाद नव्हता. भारतातील राज्ये, जिल्हे एकमेकांच्या जवळ आल्याने अन्न आणि खाद्यसंस्कृतीमध्ये संकर होण्यास वेळ लागला नाही!

१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच वर्षी देश-विभाजन झाल्याने देशांतर्गत, विशेषत: पंजाब, हरयाणासारख्या राज्यांतून देशाच्या इतर भागांत स्थलांतर वाढले. पुढे रस्ते वाहतूक वाढल्यामुळे एका राज्यातील माल दुस-या राज्यांत पोहोचवणारी वाहतूक व्यवस्थाही वाढली. पंजाबमधील चालकांना प्रवासात पंजाबबाहेर पडल्यावर पंजाबी खाद्यपदार्थ मिळेनासे झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर यथावकाश ढाबा नावाची व्यवस्था आली. आणि या डाब्यावरूनच महाराष्ट्र आणि इतरही राज्यांच्या खाद्यान्नगृहांत पनीर नावाचा पदार्थ पोहोचला आणि रूढ झाला! अर्थात, स्वत:च्या खाद्यसंस्कृतीचा हिरीरीने पुरस्कार करणा-या दाक्षिणात्य राज्यांनी मात्र पनीर काय किंवा रोटी काय हे असलं अजिबात स्वीकारलेलं नाही… अपवाद Maggieचा… अर्थात तिखट शेवई! मात्र दक्षिणेने त्यांचे इडली(इटली नव्हे! ), दोसई, मेदू (मेंदू नव्हे! ) वडई हे स्वस्त पदार्थ देशाच्या सर्वच भागांत किंमती वाढवून पोहोचवले.

 पनीर १६व्या-१७व्या शतकात मुघालांच्या, अफगाणांच्या माध्यमातून भारतात पोहोचले. मुघलांचा वावर आरंभी उत्तर भारतात अधिक असल्याने तिकडे पनीर जेवणात अधिक असे. हे पनीर तयार करण्याची पद्धत तशी साधी. गरम दूध लिंबाचा रस किंवा दह्याचे विरजण घालून हेतूपुरस्सर नासवायचे. (याला उत्तरेत दूध ‘फाडणे’ म्हणतात!) या प्रक्रियेत तयार झालेले दहीसदृश मिश्रण त्यातील पाणी काढून टाकून कपड्यातून गाळून घ्यायचे व त्या मिश्रणावर जड वस्तू ठेवल्या की मिश्रण एकजीव आणि विशिष्ट पातळीपर्यंत घट्टही होते, ज्याच्या वड्या, हव्या त्या आकाराचे तुकडे पाडता येतात! हे तुकडे मग मसाल्याच्या मिश्रणात शिजवले की महाग पदार्थ तयार! याचाच एक अर्थ असा की, पनीरफक्त दुधापासूनच तयार करता येते!

खपते ते विकायला ठेवले जाते, या न्यायाने सर्वत्र हॉटेल्स, खानावळी, मेजवान्या यांत पनीर वापरून पंजाबी तेलकट, तुपकट ग्रेवी नावाच्या घट्ट द्रवात आकंठ बुडालेल्या पनीरचे लालसर तुकडे महागड्या दराने विकले जाऊ लागले. जुन्या पिढीला हे लाल पनीर म्हणजे लाल भोपळ्याचे तुकडे वाटत असत! असो.

पुढे पुढे पनीरचे इतर पदार्थ प्रसिद्ध झाले… पनीर पसंदा तर आहेच, पण पनीर चिल्ली (चिल्ली नव्हे… चिली म्हणजे मिरची! ), पनीर बुर्जी, पकोडे आणि काय काय!

आता मुख्य प्रश्न. पनीरची मागणी वाढली. पण ते ज्याच्यापासून तयार करतात त्या दुधाचे उत्पादन कुठे वाढले? एक किलो पनीर तयार करायला म्हशीचे पाच ते सहा लिटर्स दूध लागते. म्हशीच्या दुधाचा दर किमान ७५ रुपये लिटर आहे. म्हणजे साधारण पावणे तीनशे रुपयाचे दुध लागेल. पुढचा खर्च निराळा. मग हे पनीर सुमारे साडेपाचशे रुपयांना विकले जाते. म्हणजे इथेच सरळ दोनशे रुपयांचा घाटा आहे. वर मागणीनुसार पनीर बनवायचे तर इतर उपयोगासाठी दूधच शिल्लक राहणार नाही. असे असूनही बाजारात मुबलक प्रमाणात पनीर उपलब्ध आहे. मोठमोठ्या कंपनी पनीर कसे बनवत असतील ते असोत, पण हॉटेलांत मिळणारे पनीर हे analog प्रकारचे असते. यांत दूध नसते. दुधाची पावडर असू शकते. पाम तेल, रासायनिक खाते आणि अन्य काही पदार्थ वापरून हे पनीर तयार होते. त्यामुळे त्याची किंमत कमीच असावी, पण यामुळे पनीरच्या पदार्थांची किंमत मात्र जादाच असते. यामुळेच हॉटेलवाल्यांना परवडते आणि पनीर सगळ्यांना पुरते सुद्धा!

हे analog पनीर आरोग्याला लगेचच हानी करत नाही म्हणून सर्वांचे बरे चालले आहे. हे पनीर सातत्याने खाल्ल्याने पचनसंस्था, मूत्रपिंडे यांचे काही आजार होऊ शकतात, असे वैद्यकीय मत दिसते.

शासनाने नुकतेच ‘आम्ही हे पनीर वापरतो’ असे ग्राहकांना लेखी स्वरूपात कळवायला सांगितले आहे.. म्हणजे बिलवर उल्लेख, मेन्यू कार्डमध्ये उल्लेख करायला सांगितले आहे!

मुळात स्थानिक परिस्थिती, वातावरण, हवामान यांवर आपल्या पूर्वजांनी खाद्यपदार्थ संस्कृती उभारली आहे. संस्कृतीमध्ये केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विकृती येत असेल तर मग प्रकृती ठीक कशी राहील?

पाहूयात… शासनाच्या या निर्णयाचे पुढे काय होतं ते. तोवर हॉटेलमधील गर्दी आणि त्या गर्दीत पालकांच्या पुढे जाऊन पनीर order करणारी पोरं “अंकल… मुझे एक पनीर टिक्का मसाला! असं ओरडत राहतील. (टिक्का हे तीखा म्हणजेच तिखट या शब्दाचा खास दाक्षिणात्य उच्चार! ) 

अस्सल आणि analog पनीर कसे ओळखायचे याचे शेकडो विडीओज नेटवर उपलब्ध आहेत. खाण्याआधी विचार करावा, हे उत्तम! दक्षिण दावणगिरी डोसा भाजताना संबंधित कारागीर त्यावर मूठ मूठभर लोणी फेकत असतात… ते लोणी गोकुळातून येत असेल तरच अस्सल असावे, अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे sandwich इत्यादीवर भसाभसा खिसले जाणारे चीज मस्त असेल का? असल्यास ते विक्रेत्यांना कसे परवडते? असा सवाल उरतोच. टमेटो sauceच्या नावाखाली काय सुरु आहे ते समजत नाही. आंबा रस, आंबा सरबत किती भरपूर उपलब्ध असते ना? असो. याबाबत तुम्हीच संशोधन करा आणि द्या order!

(अस्सल पनीर तयार करणारे उत्पादक, ते विकणारे विक्रेते, त्याचे चवदार पदार्थ करून विकणारे हॉटेलचालक यांना नमस्कार! माझ्यासारख्या सामान्य खाद्यप्रेमींसाठी लिहिले आहे. इतरांनी ‘कृपया विवेक से काम लें!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४१ आणि ४२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४१ आणि ४२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४१ — 

बहु हिंडता सौख्य होणार नाही |

सीणावे परि नातुडे हीत काही |

विचारे मना अंतरा बोधवीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४१|

अर्थ:  समाधान किंवा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खूप हिंडले किंवा फिरले तरी समाधान होणार नाही. त्याने नाहक श्रम मात्र होतील पण हाती काही लागणार नाही. म्हणून हे मना, तू नीट विचार करून स्वतःची समजूत घाल आणि भगवंतापाशीच कायमचा आश्रय घे.

(नातुडे – साध्य होत नाही/ हाती लागत नाही, अंतरा – अंतर्मन)

विवेचन : हा अतिशय अर्थगर्भ असा श्लोक आहे. “बहु हिंडता सौख्य होणार नाही “या ओळीचे तीन प्रकारचे अर्थ घेता येतात. आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान प्राप्त व्हावे म्हणून आपण वणवण हिंडत असतो. व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे “अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा. ” आपल्या उपजीविकेसाठी सुद्धा आपण आयुष्यभर वणवण करत असतो. उपजीविकेसाठी, पोटासाठी धावपळ करणे हे समजू शकते. हा पहिला अर्थ घेता येईल.

दुसरा अर्थ असा सांगता येतो की परमार्थात सुद्धा माणसे खूप भटकत असतात पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. मन:शांती नाही, अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून लोक बाबा, बुवांकडे हिंडत असतात. देवालये, नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे, तीर्थयात्रा माणूस आयुष्यभर करत राहतो. पण तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तो कोरडाच राहतो. या ठिकाणी एक पौराणिक कथा आठवते.

महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात. हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो, ” माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या. ”

पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात. कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ‘ आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक. ‘ त्यावर भीम म्हणतो, ‘ केशवा, आमची चेष्टा करतोस का? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल? ‘

तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. समर्थ आपल्याला या श्लोकात हीच गोष्ट समजावून सांगतात.

तिसरा अर्थ सर्वात महत्त्वाचा वाटतो. तो हा की हिंडत राहणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हिंडत राहणे. विषयवासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे चक्र सुरू राहते. यालाच समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही असे म्हणतात. कारण यातून कोणतेही हीत साध्य होत नाही. अनेक जन्म घेऊनही मुक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. जीवात्मा मात्र जन्ममृत्यूच्या या चक्रात भरडून निघतो.

मग अंतिम समाधान किंवा सौख्य कुठे मिळेल? तर ते एका परमेश्वराच्याच ठायी आहे. आपण विचार करून आपल्या मनाला या गोष्टीचा बोध करून दिला पाहिजे. आणि त्या राघवाच्या ठिकाणीच आपले मन कायम स्वरूपी एकाग्र केले पाहिजे. “सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.. “असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते यासाठीच!

स्वसंवाद :: 

१) मी आयुष्यात कशासाठी सर्वाधिक वणवण केली? पैशासाठी, यशासाठी की मनःशांतीसाठी? त्यातून खरे समाधान मिळाले का?

२) लिंबाची काडी स्नानाने गोड होत नाही. माझ्या बाह्य धार्मिक कृतींमागे अंतर्मनाची शुद्धी आहे का?

३) तीर्थयात्रा, उपवास, पूजापाठ या गोष्टी मी करतो. परंतु माझ्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर कमी झाले आहेत का?

४) जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हे आपले अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात या ध्येयाची जाणीव मला असते का?

– – – –

श्लोक क्र. ४२ – – –

बहुतांपरी हेचि आता धरावे |

रघुनायका आपुलेसे करावे|

दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४२|

अर्थ : हे मना, तुला वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले. आता ही एकच गोष्ट लक्षात ठेव की रघुनायकाला म्हणजे रामाला तू आपलेसे कर. तो अनाथांचा नाथ आहे असा त्याचा लौकिक सर्वत्र गाजतो आहे. तेव्हा तू मनाने भगवंतपाशीच कायमचा निवास कर.

(बहुतांपरी – वेगवेगळ्या प्रकारे, धरावे – लक्षात ठेव, तोडर – पायातील किंवा हातातील एक अलंकार/तोडा/तोरड्या)

विवेचन : सगळ्या गोष्टींचा (आपल्या कर्तव्याचा किंवा स्वधर्माचा नव्हे) म्हणजे माया, मोह इत्यादींचा त्याग करून भगवंताला शरण जावे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले असे समर्थ आपल्याला सांगतात. इथे बहुतांपरी या शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे नाना परीने, निरनिराळ्या प्रकारे. जी लहान मुले ऐकत नाहीत त्यांना आपण निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच समर्थ देखील आपल्याला हे वेगवेगळ्या शब्दात समजावून सांगतात. चांगल्या गोष्टी या परोपरीने पुन्हा पुन्हा सांगून मनावर ठसवाव्या लागतात. तसेच समर्थ या ठिकाणी करतात परंतु अशा गोष्टींनाही एक मर्यादा असते. म्हणून ते निर्वाणीचे सांगतात की आता तू रघुनायकाला म्हणजे भगवंताला आपलेसे कर.

बहुतांपरी या शब्दाचा दुसराही अर्थ असा घेता येतो की परमेश्वराचे जे अनेक भक्त झाले, त्यांच्याप्रमाणे तू वाग आणि परमेश्वराला आपलेसे करून घे. रामायणातील कैकयी, रावण यासारखी काही मोजकी पात्रे वगळली तर बहुतेक इतरांनी श्रीरामांना भक्तीने आपलेसे करून घेतले आहे. हनुमान, बिभीषण, शबरी, गुहक असे अनेक जण त्यांचे भक्त होते. सुदामा, कुंती, द्रौपदी, पांडव, विदुर यासारखी अनेक मंडळी श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे करून घेतले होते. श्रीकृष्ण त्यांना आपला सखा, मित्र, बंधू, मार्गदर्शक, तारणहार असे सगळे काही वाटत होता.

रावणाला श्रीरामांबद्दल सर्वांनी सांगितले. परंतु त्याला ते कधी आपलेसे वाटले नाहीत. त्याला स्वसामर्थ्याचा अहंकार होता. पांडवांना श्रीकृष्ण जसा आपला वाटला, तसा दूर्योधन आणि अन्य कौरवांना कधी वाटला नाही. ज्यांना ज्यांना भगवंत आपला वाटला नाही, त्यांचा मार्ग चुकला. ते नको त्या मार्गाने गेले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला.

जसा अहंकारी माणूस व्यवहारातही कोणाला आवडत नाही. तसा तो भगवंताला सुद्धा आवडत नाही. अहंकार हा अध्यात्मात फार मोठा शत्रू आहे. म्हणून आपण आपला सर्व अहंकार टाकून भगवंताला शरण जावे आपल्याला तो आपलासा वाटला पाहिजे.

तो ‘ दीनानाथ ‘ आहे, हे त्याचे ब्रीद सर्वत्र गाजते आहे. इथे आपण ‘दीनानाथ ‘या शब्दाचा अर्थ केवळ दीनदुबळ्यांचा नाथ असा न घेता शरणागताला आश्रय देणारा असा घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भगवंताशिवाय ज्यांना आपले दुसरे कोणी नाही असे वाटते अशांचा तो नाथ आहे. संत मीराबाई म्हणतात, ” मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई. ” तेव्हा हे मना तू केवळ एका राघवाचा म्हणजेच भगवंताचा आश्रय घे.

भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर भगवंताशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे, आत्मीय असे नाते आहे. ज्याला भगवंत “आपला” वाटतो, त्याचा जीवनप्रवास सुकर होतो. आणि ज्याने भगवंताला “आपलेसे” केले, त्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही.

स्वसंवाद ::

१) माझे भगवंताशी नाते कसे आहे? त्यात प्रेम, समर्पण भाव आहे का? की ते गरजेपोटी आहे?

२) माझ्या स्वभावातील अहंकार मला जाणवतो का? तसे असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय करतो?

३) संकटाच्या वेळी खरोखर एकमात्र भगवंतच मला तारील असा त्याच्यावर विश्वास ठेवतो का? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक ४१ आणि ४२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares