मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या संस्थेने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या काव्यास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज पुरस्कार प्राप्त काव्य प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “सांग दर्पणा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त’)

न्याहाळते दर्पणी मी

सज्ज होऊनी साजिरी

ल्याली आभूषणे भारी

शालू माझा भरजरी ||

केला शृंगार देखणा

फिदा माझ्यावरती मी

सांग दर्पणा यामध्ये

काही नसे ना रे कमी ||

 *

तूच खरा मित्र जगी

रूप अचूक दाखवी

उणे अधिक काहीही

ओळखाया तू शिकवी ||

 *

ऐक दर्पणा एवढे

आठवाने मी लाजते

छबी नयनात त्याच्या

पाहण्याला आसुसते ||

 *

त्याची चाहूल लागता

सुखावले मी अंतरी

लाज साखर मिठीची

उमटली गालावरी ||

 *

नेत्र दर्पणी दोघांना

खूण पटे अंतरीची

सरे क्षणातच दूरी

साथ सात पावलांची ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२५ ☆ ।। गझल ।। ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२५ ?

☆ ।। गझल ।। ☆  प्रभा सोनवणे ☆

वागू नका असे की…उन्मत्त ते सवाली

आहे अजून भारत भरपूर भाग्यशाली

मारायला निघाले आहेत माय भू ला

सोडून लाज लज्जा करतात जे दलाली

 *

प्रत्येकजण सुखाचा मागेल एक प्याला

एका कुणास येथे बघ लाभती पखाली

 *

हे पाप कोणते अन पुण्यास कोण वाली

सारेच संत आता भोंदू, भुके, मवाली  

 *

राष्ट्रीय सण कधीही विसरू नका मुलांनो

देऊन प्राण गेले ते वीर…हो अकाली

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जिथे भीती जन्म घेते…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “जिथे भीती जन्म घेते…☆ श्री जगदीश काबरे ☆

भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.

परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या व्यक्तीला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, तिच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. अशावेळी त्या व्यक्तीला प्रसंगासमोर ठामपणे उभे राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लागते. तिचा स्वभाव ऐन मोक्याच्या वेळी कचखाऊ होतो. उलट ज्या व्यक्तीला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाते, तिच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.

सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. लोक काय म्हणतील? , नोकरी जाईल, देव रागावेल, समाजातून बहिष्कृत केले जाईल, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.

मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.

थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो. भीती, चिंता, काळजी, या भावना आपल्या जगण्याचा भाग असतातच. कारण आपण सगळेच जगण्यातल्या अशाश्‍वतेला घाबरत असतो. तरी कधी कधी काही गोष्टींना सामोरं जाण्याची मानसिक तयारीही आपण करत असतो आणि म्हणूनच या भावना आपल्या नियंत्रणात कशा ठेवायच्या याचा आपण विचार करायला हवा. पण तसं झालं नाही आणि या भावना सातत्यानं आपल्या मनात राहिल्या तर गडबड होतेच. आपल्याला जर सतत कशाची ना कशाची भीती वाटत राहिली तर समोर असणार्‍या समस्येला तोंड देण्यापेक्षा तिला टाळण्याची प्रवृत्ती वाटते. त्या परिस्थितीचे खोटंखोटं सर्मथनही करण्याची प्रवृत्ती वाढते. अशावेळी तारतम्यानं विचार करण्याची आपली क्षमता कमी होते. समस्येचं योग्य स्वरूपात आकलन होण्याऐवजी तिच्याकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाहीत. बर्‍याचदा असे घाबरून रहाण्याच्या स्वभावामुळे आपण आपल्या जगण्यातला आनंदही गमावून बसतो. आपल्या मनात सतत ‘असं होईल का? ‘ ‘तसं होईल का? ‘ ‘असं झालं तर काय..? ‘ ‘तसं झालं तर काय? ‘ असे विचार येत राहतात. मनातल्या मनात आपण अनेक कल्पना करत राहतो. पण त्यातल्या एकाही कल्पनेचं आजतागायत वास्तवात रूपांतर झालेलं नसतं. पण त्या कल्पना मात्र सतत आपल्या मनात भीतीचं वातावरण तयार करतात. आणि आपण जगण्यापेक्षा जर-तर म्हणत फक्त घाबरत राहतो. उदाहरणार्थ भुताची कल्पना.

या भीतीतून बाहेर पडायचं कसं? यावर खालील उपाय करून बघण्यासारखे आहेत.

१) ज्या गोष्टीची भीती मला वाटते आहे त्यात खरंच काही घाबरण्यासारखं आहे का याचा विचार करा. का घाबरतेय मी आता? कशाची भीती वाटतेय मला? हे प्रश्न स्वत:ला शांतपणे विचारा. या प्रश्नाचा विचार केला तर आपण बर्‍याच गोष्टींना विनाकारणच घाबरतो, असं तुमच्या लक्षात येईल.

२) ‘राईचा पर्वत बनवणं’ ही तुमच्या विचाराची पद्धत आहे का याचा विचार करा. असे विचार नेहमीच भीती निर्माण करणारे आणि भीतीला खतपाणी घालणारे असतात.

३) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर तुमच्या या भीती वाटण्याच्या भावनेविषयी बोला किंवा डायरीत तुमचे विचार लिहून काढा. मनातले विचार-भावना व्यक्त केल्यानं त्यांचं आकलन व्हायला मदत होते. आपली विचार करण्याची पद्धत त्यातून समजते व त्याची भीतीचे विचार हाताळायला मदत होते. मनात उमेद निर्माण करतील, स्वत:वरचा विश्‍वास कायम ठेवतील अशी वाक्यं तयार करा. भीतीच्या प्रसंगात या वाक्याचा वापर करा. सांगा स्वत:ला, ‘I CAN DO IT, YES, I CAN DO IT. ‘

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com, मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ श्रीमंती मोजायची ताकद… लेखक : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ श्रीमंती मोजायची ताकद… लेखक : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता तो १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.

ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “

सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.

“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “

ईशा संतापली होती.

“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “

असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.

तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली.

जाताना तिने बापाच्या तोंडावर पाहिलंही नव्हतं. गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.

वर्तमान:

ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.

तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.

“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “

ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी? “

काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “

ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.

काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.

“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “

ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेत. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “

ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?

ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?

ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.

“ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.

फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.

तुझा ‘कंजूस’ बाबा. “

ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.

“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “

तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.

पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.

त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.

ईशाला आता कळलं होतं…

बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.

आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माज्या कुलुपाची चावी हरवली…” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “माज्या कुलुपाची चावी हरवली…” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘पांडू हवालदार’ या दादा कोंडकेंच्या सिनेमात एक गाणं आहे, “माज्या कुलुपाची चावी हरवली, कोतवाल तुमी डायरीत ही क्येस न्हाई लिव्हली… ” ते गाणं दादांच्या टिपिकल द्व्यर्थी संवादाइतकं चावट जरी नसलं, तरी ऐकता-ऐकता आपोआप गालात जीभ जातेच!

पण शीर्षक म्हणून निवडलेल्या या शृंगारिक गाण्याचा आणि माझ्या लेखाचा खरं तर संबंध इतकाच की, आज अनेक दिवसांनंतर माझ्या हातून एक किल्ली हरवली.

लहानपणीचे किल्ली हरवण्याचे बरेच प्रसंग ‘माज्या डायरीत लिव्हलेले’ आहेत. कारण, मी स्वतःच ते अनुभवले होते किंवा माझ्या आसपास घडताना पाहिले होते.

साताऱ्याच्या सैनिक शाळेत असताना इयत्ता पाचवीपासून होस्टेलवरच राहात होतो. दर वर्षी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलं होस्टेलवर परत आली की दोघे-तिघे तरी आपल्या कपाटाच्या किल्ल्या घरी विसरून आलेले असायचे. कधीकधी मीही त्यातला एक होतो. क्वचित, खेळाच्या मैदानावर किंवा खेळायला जाता-येताना खिशातून किल्ली कुठेतरी पडून जायची. मग संध्याकाळी अगदी गडद काळोख होईपर्यंत किल्ली शोधण्याचे निष्फळ प्रयत्न व्हायचे.

आमच्या शाळेचे आवार म्हणजे जुना ब्रिटिश कॅम्प असल्याने, १९७०च्या दशकात आमची शाळा सातारा शहराच्या बाहेरच होती म्हणायची. सदर बाजार नावाची एक वस्ती तेवढी शाळेपासून जवळ होती. त्यामुळे डुप्लिकेट किल्ली बनवून देणाऱ्याला बोलावून कुलूप उघडणे तसे दुरापास्तच असायचे. मग रडवेल्या चेहऱ्यांनी ती मुलं कपाटाचे कुलूप तोडायचे मार्ग शोधू लागायची.

अशा वेळी काही वर्गमित्र आणि सिनियर मुलं मदतीला यायची. तशीच, मनातला आसुरी आनंद लपवत, लांबूनच फुकट सल्ले देणारीही काही मुलं होती. आमच्या कपाटांना लावलेली कुलुपं तशी साधीच असायची. त्यामुळे ती तोडायला फुटबॉल बूट हाच रामबाण उपाय कामी यायचा. त्या बुटांच्या तळाला जे कडक असे स्टड असायचे, त्यांच्या माऱ्याने त्या फुसक्या कुलुपाचा सहजी ‘आ’ वासत असे. आमच्यातली जरा जास्तच ‘Security Conscious’ असलेली काही मुलं सुट्टीवर जाताना आपल्या कपाटाला ‘नवताल’ किंवा अशाच कुठल्या तरी कंपनीची दणकट कुलुपं लावून जायची. त्यांची किल्ली जर हरवली तर मात्र त्यांची अवस्था बघवत नसे. तिथे फुटबॉल बुटांचा उपयोग होत नसे. मग दगडाचे ‘दाणदाण’ आवाज रात्री उशिरापर्यंत ऐकू येत असत.

अनेक कटू अनुभव घेतल्यानंतर, पुढे-पुढे माझ्याकडून किल्ली हरवण्याचे प्रसंग कमी झाले. कोणतीही किल्ली किंवा इतरही गोष्टी जपून ठेवण्याचं जरासं भान मला आपोआप आलं. हल्ली घरातून बाहेर पडताना, मी गाडीच्या किल्लीचा वजनदार गुच्छ रुमालासोबत पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवतो आणि घराच्या किल्लीची छोटी रिंग उजव्या खिशात ठेवतो. उद्देश हा की, रुमाल किंवा गाडीची किल्ली काढताना चुकून घराची किल्ली हाती येऊ नये किंवा खिशाबाहेर पडू नये.

आज मी जरा गडबडीत बाहेर पडलो होतो. एका हातात पिशवी असल्याने, दुसऱ्या हाताने दोन्ही किल्ल्या उचलल्या आणि एकाच खिशात कोंबल्या. पुढच्या दोन तासात, सदर्न कमांड हॉस्पिटलमधील दोन डिपार्टमेंट्स, आणि एक-दोन दुकाने अशा विविध ठिकाणी जाऊन, वेगवेगळी कामे करून, स्वातीला तिच्या क्लिनिकमधून घेऊन मी घरी आलो. तिला लगेच कॉलेजात लेक्चर घ्यायला निघायचे होते. घर उघडण्यासाठी खिशात हात घातला तो काय? किल्ली गायब! दोन्ही खिसे दोन-तीनदा तपासले, हातातली पिशवी तपासली, पण व्यर्थ.

स्वातीजवळच्या किल्लीने घर तर उघडले. पण “घराची किल्ली हरवल्यामुळे, सुरक्षेचा विचार करता, आता घराचे मुख्य कुलूप बदलावे लागणार… ” हा विचार माझ्या मनामध्ये येण्याच्याही आधी मला स्वतःची प्रचंड लाज वाटली. तसेच उलट्या पावली बाहेर पडून, ज्या दोन-तीन ठिकाणी मी गेलो होतो तिथे जाऊन शोधाशोध करावी, कुठेतरी ती किल्ली पडलेली नक्की सापडेल, असा माझा विचार होता. पण आता आम्हा दोघात मिळून एकच किल्ली असल्याने, स्वाती कॉलेजात गेल्याशिवाय मला घर बंद करून बाहेर पडता येणार नव्हते.

अखेर मी बाहेर पडलो आणि सगळीकडे पुन्हा जाऊन आलो. दुपारची वेळ झालेली होती. आज बुधवार असल्याने सदर्न कमांड हॉस्पिटलचा ‘हाफ डे’ होता. त्यामुळे तिथे शुकशुकाट झालेला होता. तिथल्या कारपार्कमध्ये शोधाशोध केली. दुकानापर्यंत आलो तर, दुपारी झोपण्याच्या ‘पुणेकर धर्मा’ला जागणाऱ्या दुकानदाराने दुकान बंद केलेले होते. त्या दुकानासमोर थोडी शोधाशोध केली. अखेर हात हलवत घरी आलो. घरात शिरत असतानाच ‘पांडू हवालदार’ सिनेमातलं गाणं आठवलं होतं आणि हा लेखही मनात तयार झाला होता.

तेवढ्यात मला किल्ली हरवण्याशी संबंधित असलेला दुसरा एका प्रसंग आठवला. बऱ्याच वर्षांपूर्वी, मुलं लहान असताना, आम्ही दोघे मुलांना घेऊन कुठंतरी लांब ड्राइव्हसाठी गेलो होतो. हवा आल्हाददायक होती. एका डोंगरावर गाडी नेली आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक मोठं, निर्मनुष्य पठार दिसलं. त्या सबंध पठारावरच काय, पण आसपासदेखील एकही मनुष्यप्राणी नव्हता. शहरातल्या माणसांना अशा जागेची भुरळ न पडली तरच नवल!

रस्ता सोडला आणि सरळ त्या पठारावर मी गाडी नेली. खाली उतरून जरा हिंडावं, फोटो काढावे, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. चौघंही खाली उतरलो. काही पावलंच पुढे गेलो असू, तेवढ्यात गाडी लॉक झाल्याचा ‘पिक’ असा आवाज मागून आला. काय घडलं होतं याचा मला त्या क्षणी अंदाज आला. मी गाडीची किल्ली इग्निशन स्विचमध्ये ठेवूनच खाली उतरलो होतो आणि किल्ली ‘ऑन’ केलेल्या अवस्थेत होती. गाडीचे एक ‘फीचर असे होते की जर काही क्षण ‘ऑन’ अवस्थेत किल्ली राहिली तर गाडीचे दरवाजे आपोआप ‘लॉक’ होतात. या ‘फीचर’चा अनुभव मी गाडीमध्ये बसलेलो असताना अनेकदा घेतला होता. पण त्या क्षणी मला त्याचा विसर पडला होता.

आता परिस्थिती अशी होती की त्या निर्मनुष्य पठारावर आम्ही चौघे आमच्या गाडीच्या बाहेर होतो, किल्ली गाडीच्या आत होती, गाडीच्या खिडक्या बंद होत्या, आणि गाडी लॉक झालेली होती. किल्लीच्या बाबतीतला असा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला होता. त्यामुळे त्यावर खात्रीशीर उपाय मला चटकन सुचेना. गाड्या चोरणारे लोक पट्टी किंवा काहीतरी वापरून, बाहेरून गाडीची खिडकी उघडू शकतात इतपत माहीत होते. पण अर्थातच, तसले काही करण्याचा मला पूर्वानुभव नव्हता. काहीतरी खटपट करू लागलो. अशा वेळी भुकेजलेली स्वाती आणि मुले मला उद्देशून जे काही बोलत होती ते ऐकून माझे मनोबल आणखीच खचत चालले होते.

अचानक आमच्यापैकी कोणालातरी दूरवरच्या रस्त्यावरून जाणारी, एक ‘लालपरी’ बस दिसली. स्वाती व मुलांनी आरडा ओरडा करून ती बस थांबवली. बसचा ड्रायव्हर व कुणा प्रवाशाने काहीतरी करून गाडीची खिडकी उघडण्यात यश मिळवले आणि आमची त्या संकटातून सुटका झाली. आजवर किल्ली हरवण्याचे सर्वच प्रसंग शोकांत असल्याचा अनुभव आलेला होता. त्या मानाने, गाडीच्या किल्लीचा हा प्रसंग फार महागात पडला नव्हता म्हणून जरा हायसे वाटले.

आज किल्ली हरवल्याच्या शोकांत प्रसंगाची गोष्ट लिहायला मी जड अंतःकरणाने बसलो होतो. स्वाती कॉलेजातून आल्यावर तिला ही गोष्ट वाचून दाखवावी, म्हणजे दुःख जरा हलके होईल असा विचार केला होता. संध्याकाळी, “शोधा म्हणजे सापडेल” असे ओरडतच स्वाती घरात शिरली, तेंव्हा मात्र मी जरा खटटू झालो. माझे दुःख हलके करण्याऐवजी तिने माझ्या जखमेवर मीठ चोळावे याचे मला वाईट वाटले. पण पाहतो तो काय? माझी किल्ली माझ्या डोळ्यासमोर नाचवतच ती ओरडत होती!

कॉलेजातून परत येऊन गाडी कारपार्कमध्ये लावल्यानंतर, तिने बारकाईने कारपार्क धुंडाळले होते. तिला ती किल्ली आमच्या कारपार्कमध्येच सापडली होती असे तिने सांगितले. ते ऐकून माझी अवस्था मात्र ‘काखेत कळसा… ‘ अशी झाली होती.

परंतु, किल्ली हरवण्याच्या काही कथा सुखांतदेखील असू शकतात हा अनुभव आज मला आला, हेही नसे थोडके!

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Kaizen…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Kaizen… ☆ संध्या बेडेकर ☆

Kaizen हे जापनीज तत्व आहे.

Place for Everything. Everything in place.  

आम्ही तिघी बहिणी. अगदी सख्या, म्हणजे आमचे आई वडील सेमच.

परंतु स्वभाव सवयी, आवड निवड बघून कोणाला खरं वाटणार नाही. एकाच हाताची पाची बोटं एक सारखी नसतात, असं म्हणतात ना, अगदी खरय. आई वडीलांच्या सवयी मुलांमध्ये उतरतात. तेही खरंय. कधी कधी दोन्ही घरच्या आजी आजोबांचाही मधून मधून उद्धार होत असतोच. शेवटी स्वतः चे काही गुण असतातच की.

व्यवस्थित पणा आळशीपणा. वगैरे वगैरे.

आमची ताई म्हणजे जपानी सूत्र म्हणजे 

KAIZEN  पाळणारी 

Place for everything. Everything in Place

सतत चांगल्यासाठी घरातील सर्वांबरोबर विचार विनिमय करून बदल करणारी.

 हे पाळणारी.

तिचं घर म्हणजे खूप विचारपूर्वक डिझाईन केलेले. अगदी पूर्ण आयुष्याचा विचार करून.

मुलं झाल्यावर, ती मोठी झाल्यावर, आपण म्हातारे झाल्यावर वगैरे वगैरे सर्व गोष्टी लक्षात ठेवून छान घर बांधलं. सवयींमध्ये एवढा व्यवस्थीत पणा आहे. त्यामुळे विचारांतही स्पष्टता, बोलणही स्पष्ट. कुठेही कनफ्युजन नाहीच. घर फक्त बांधलंच नाही तर ते ठेवलही व्यवस्थित. मुलं शिस्तीत वाढली, त्यामुळे तो व्यवस्थित पणा पूढे ही चालू राहिला. आजही आहेच.

तिच्या घरी तुम्ही काहीही मागा म्हणजे सुई दोरा, रबर बॅंड, एखादी इंद्रधनुष्यग, लिहायला कागद पेन, मॅचिंग कानातले म्हणजे काहीही. ती म्हणेल 

अग! माझ्या आलमरीत सेकंड ड्राॅववर मध्ये उजव्या बाजूला एका झिपलाॅक बॅग मध्ये बघ. तेथेच मिळेल तुला. एवढा आत्मविश्वास असतो ताईंच्या बोलण्यात.

घरातील प्रत्येक सामानाची जागा पक्की

Place for everything. ते सामान पण तेथेच असणार. Everything in place आठवतंही सर्व, कारण वर्षानुवर्षे त्या वस्तूची तीच जागा आहे.

ताई फक्त वस्तूंचेच व्यवस्थापन छान करते अस नाही, हा विचारपूर्वक व्यवस्थित पणा तिच्या प्रत्येक क्षेत्रात दिसतो. कारण विचारांचे व्यवस्थापन परफेक्ट आहे. चांगला बदल करायला ती नेहमीच तयार असते.

त्याउलट आमची दीदी. मस्त मौला. कोणतीही गोष्ट विचारा. अग! आहे घरात, पण शोधावी लागेल. शोधली तर नक्की मिळेल.

म्हणजे अगदी सुई दोरा ते पासपोर्ट, medical report ते साखरेचा डबा. म्हणजे डबा असतो ओटयावरच पण ओट्यावर इतर वस्तूंमध्ये शोधावा लागतो एवढंच. सर्व गोष्टी शोधल्यावर च मिळतात. पासपोर्ट कुठे मिळेल सांगता येत नाही. कधी कधी शोधण्याचे कष्टही वाया जातात. Anyways पण ती आनंदी असते. मजेत जगते.

माझं आपलं अधल मधलं काम. सोनं चांदी दागिने पासपोर्ट, अगदी जागेवर. बाकी वस्तू बऱ्यापैकी जागेवर. परंतु ताई सारख माझ्या आलमरीत सेकंड ड्रावर मध्ये••• वगैरे म्हणजे एवढ्या डिटेल्स मध्ये सांगायची काही हिम्मत नाही माझी.. कधी मिळतात वस्तू, कधी नाही. वस्तू त्याच जागेवर ठेवल्या जात नाहीत म्हणून गडबड होते. एखाद्या वेळेस खूप व्यवस्थित आवरून ठेवलं तर स्वतः बद्दल छान वाटत. परंतु महिन्याभरात जैसे थे. खूप सांभाळून ठेवलेली वस्तू तर हमखास वेळेवर मिळत नाहीच. वेळेवर विकत घ्यावी लागते. उगीचच पैसे खर्च होतात. वाईट वाटत.

तसे आमच्या तिघींचे संसार मजेत चालू आहेत.

जो है, जैसा है, उसमें हम सब खुश हैं

ताईला भेटल्यावर प्रत्येक वेळी तिच कौतुक वाटतं. एखाद्या बाईने किती व्यवस्थित असावं?? कधीच पेटीकोट शोधावा लागत नाही. मॅचिंग नेहमी कसं काय जमतं बुआ? आश्चर्यच वाटतं. नेमकी तीच डबी कशी काय मिळते? काही शोधाशोध नाही, डब्यांची हुसकाहुसकी नाही. साडयांचा ढीग तसाच व्यवस्थीत.

तेच दीदीचे म्हणजे कुठे जायचे म्हंटले तर पसरलेल्या घरात अजून थोडा पसारा वाढतो.

माझं आपलं वेगळंच प्रकरण. ठीक ठाक. खूप व्यवस्थित तर नाहीच पण जेमतेमच. हुसकाहुसकी शोधाशोध असतेच. शेवटी दुसरच काही तरी ठरत. त्यामुळे गोंधळ असतोच.

माझ्या आणि दीदींच्या मुलांचं कौतुक म्हणजे घरी चहा पिऊन झाल्यावर तो कप तेथेच असतो, वाळतो. पण ताईकडे मात्र ही मुलं कप लगेच बेसिन मध्ये ठेवतात.

प्रत्येक वेळी मी ठरवते. स्वतः मध्ये बदल करायचा, हळूहळू मुलांनाही सवय लावायची. व्यवस्थित पणा म्हणजे वेळेवर काम करणे. वेळ वाचतो. चिडचिड कमी होते. यात फायदाच जास्त आहे. तसा उशीरच झाला आहे पण काही हरकत नाही 

देर आए दुरुस्त आए।  

सुबह का भूला अगर घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते।

थोडा फरक नक्कीच पडेल. मुलांना पूढच्या आयुष्यात त्याचा फायदाही होईल.

आज सहा महिन्यांनंतर ताई घरी आली. माझ्यातला बदल बघून हसून शाब्बास म्हणाली.

 म्हणाली, 

Yes,

Kai म्हणजे बदल 

आणि Zen म्हणजे चांगला.

सतत चांगले बदल घडवत रहाणे.. मग प्रगती निश्चितच होणार. वेळ नक्कीच वाचणार. मग 

ते आपले घर असो, एखादी संस्था असो नाहीतर स्वतः चे व्यक्तिमत्त्व असो. प्रगती नक्की होणार.

फक्त बदल करायची मानसिक इच्छा, तयारी, आणि सातत्य पाहिजे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ मराठी भावानुवाद – डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रवींद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजली मधील १०३ कवितांचा भावानुवाद आम्ही बहिणींनी, मंजिरी येडूरकर व शोभना आगाशे, मिळून केला. हे कोविड काळातील अपत्य!

घरातल्या सगळ्यांनी त्या कवितांचं खूप कौतुक केलं आणि यांचं पुस्तक छापायचं हे ठरवून टाकलं. शेवटी ‘गीतांजली जशी भावली तशी’ हे पुस्तक प्रकाशित झालं, वर्षभरात चार संस्थांनी त्याचा गौरवही केला. हे सगळं आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच व अनपेक्षीत घडल्यामुळं भारी वाटत होतं.

पण खरं भारी वाटलं ते कवितांचा अनुवाद करतांना! मूळ इंग्रजी कविता, गद्य स्वरूपाच्या आहेत. जुन्या स्टाईलचं अवघड इंग्रजी आहे. आम्ही सुरवातीलाच ठरवलं होतं की आपण दुसऱ्या कुणाचाही अनुवाद आधी वाचायचा नाही; कारण कोणताही पूर्वग्रह घेऊन केलेला अनुवाद ‘आपला’ वाटणार नाही. मग त्यातल्या बऱ्या वाईटाची जबाबदारी आपण कशी घेणार! आपल्या कविता शक्यतो गेय होतील, असा प्रयत्न करायचा. मन अगदी स्वच्छ ठेऊन, आपल्याला काय वाटतंय ते लिहायचं. अर्थात याचं पुढे जाऊन पुस्तक होईल हे ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. जवळजवळ महिनाभर आम्ही चर्चा करून प्रत्येक कवितेचा कीस पाडलाय.

एक मुख्य अडचण वाटली, ती म्हणजे, या कविता आध्यात्मिक विषयावर आहेत, असं वाचलं होतं. पण आमच्या लक्षात आलं की, अगदी अध्यात्मिक नाही पण प्रत्येक कविता एक विचार व्यक्त करते. मात्र तो विचार व्यक्त करण्यासाठी रविंद्रनाथ जी रूपकं वापरतात, ती समजायला जरा अवघड, त्यातून इंग्रजीमध्ये, त्यामुळे काही काही कवितांवरील चर्चा दिवस दिवस चालायची. पण शेवटी एकतर एकमत व्हायचं किंवा दोघींपैकी एकीवर पूर्ण जबाबदारी टाकली जायची.

त्यांच्या बऱ्याच कविता गोष्टीसारख्या आहेत. ३१ व्या कवितेत कवीला खूप श्रीमंत व्हायचं असतं. जगावर सत्ता मिळवायची, म्हणजे अनभिषिक्त सम्राट व्हायचं असतं. त्यासाठी तो सगळ्या जगाला कैदी बनवणार असतो. त्यासाठी तो रात्रभर बसून जड साखळदंड बनवतो. सकाळी उठून पाहतो तर त्या साखळदंडांनी तो स्वतःच जखडला गेलेला असतो. यातून आपण सुविचार सांगू शकतो, दुसऱ्याचं वाईट चिंतून किंवा मोहात लिप्त राहून आपलं भलं होत नाही.

६४ व्या कवितेत नदीच्या उतरणीवरून संध्याकाळी एक स्त्री दिवा घेऊन निघालेली असते. कवी तिला तो दिवा आपल्याला देण्याची विनंती करतो कारण त्याच्या घरात अंधार असतो. ती म्हणते हा नदीच्या प्रवाहात सोडण्यासाठी नेते आहे. पुन्हा ती अशीच दिवा घेऊन येते. पुन्हा कवी तिला दिवा मागतो. ती म्हणते नभाला अर्पण करणार आहे. पुन्हा रात्री येते. ती म्हणते दिव्यांची आरास करायची आहे. कवीला सर्व दिवे तिनं व्यर्थ घालवले असं वाटतं. वर वर पाहता यात दडलेला अर्थ लक्षात येत नाही पण विचार केल्यावर समजतं की कवीला इथे सांगायचं आहे की, आपल्या अज्ञानाचा अंधार दुसऱ्यांच्या आयत्या दिव्यांनी नष्ट होत नाही. त्यासाठी आपणच प्रयत्नपूर्वक ज्ञानाचा दीप चेतवून हा अंधार दूर करावा लागतो. किंवा जे ज्ञानी लोक असतात ते पूर्ण आसमंत उजळून टाकण्याची इच्छा बाळगतात.

आणखी एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. ५८ व्या कवितेत आनंद कुठं कुठं राहतो याचं वर्णन आहे. त्यातील एक वाक्य असं आहे, the ‘joy that sits still with its tears on the open red Lotus of pain’ याचा अर्थ काय असेल याचा विचार करताना मनात आलं उमलताना कमळाला त्रास होत असेल का, त्याच्या अश्रूच्या थेंबात आनंद राहत असेल का? की तो थेंब ओघळू नये, अश्रू आहेत हे कळू नये म्हणून राहतो, का त्या चमकणाऱ्या थेंबाकडे पाहताना आपण खूप आनंद मिळवावा म्हणून तिथे आनंद राहतो. किंवा आणखी काय काय चर्चा करत होतो, शेवटी लक्षात आलं की कवीला म्हणायचं आहे की सुखदुःख, हसू-आसू हे एकत्रच असतात, एका पाठोपाठच येतात.

ह्या निर्मितीच्या काळात होणाऱ्या आमच्या बौद्धिक चर्चा, त्यासाठी केलं जाणारं वाचन सगळं फार भारी वाटायचं. कारण शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यापासून बुद्धीला खाद्य मिळणे बंद झालं होतं. एकूण सगळं खूप कष्टाचं, पण खूप आनंददायी होतं.

त्यानंतर सांगलीतल्या साहित्यिक मैत्रिणींच्यामुळे ई अभिव्यक्तीची माहिती कळली. सुश्री उज्ज्वला केळकर, श्री सुहास पंडित, सुश्री मंजुषा मुळे व अन्य सर्व सुहृदांच्या प्रोत्साहनामुळे इतरही काहीबाही लिहायला लागलो व साहित्य, साहित्यिक यांच्या संगतीमुळं आमचा बौद्धिक विकास होऊ लागला.

१० डिसेंबर २०२५ पासून आमच्या गीतांजलीतील कविता, मूळ इंग्रजी कवितांसह ई अभिव्यक्तीवर प्रकाशित व्हायला सुरवात झाली. आजच्या या ३५ व्या भागाबरोबर ही मालिका संपन्न होत आहे. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल ई-अभिव्यक्ती साहित्य-मंचाच्या संपादक मंडळाचे मनापासून आभार.

शोभना आगाशे 

मंजिरी येडूरकर 

—–

☆ गीत : १०२ ☆

I BOASTED among men that I had known you. They see your pictures in all works of mine. They come and ask me, “Who is he? ” I know not how to answer them. I say, “Indeed, I cannot tell. ” They blame me and they go away in scorn. And you sit there smiling.

I put my tales of you into lasting songs. The secret gushes out from my heart. They come and ask me, “Tell me all your meanings. ” I know not how to answer them. I say, “Ah, who knows what they mean! ” They smile and go away in utter scorn. And you sit there smiling.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०२ ☆

अभिमानाने मी सांगितले

तुझ्या ओळखीची खूण म्हणोनि

मोरपीस मी तुझे दाविले॥

*
तू दिससी मम गीतांमधुनी

जागोजागी त्यां जाणविसी

तसेच सार्‍या कलाकृतीतुनी॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

कोण तो‘, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी, तो मज हसतो॥

*

तुझ्या कथांची गीते लिहिता

उचंबळुनि ये गुपित हृदीचे 

गूढ ते मम शब्दात उमटता॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

अर्थ गीतांचा, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी तो मज हसतो॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : १०३ ☆

IN one salutation to thee, my God, let all my senses spread out and touch this world at thy feet.

Like a rain-cloud of July hung low with its burden of unshed showers let all my mind bend down at thy door in one salutation to thee.

Let all my songs gather together their diverse strains into a single current and flow to a 

sea of silence in one salutation to thee.

Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०३ ☆

तुझ्याच चरणी जग हे सारे 

तुझ्या दर्शने भगवंता रे

शांत होतसे तनमन सारे

उद्धरुनि मज स्वीकारी रे॥

*

ओथंबुनी घन येत धरेवर

लीन तसा मी तव चरणांवर

आस घेऊनि आलो इथवर

पडो कृपा कटाक्ष मजवर॥

*

पक्षी जाती दिगंतरासी

फिरुनी येती घरट्यापाशी 

थकलेला रे मी प्रवासी

निजधामासी मजला नेसी॥

*

माझी गीते वेडीवाकुडी

आली ओंजळी दीनबापुडी

अर्पण करितो, अता ही कुडी

सारुप्य घडो, येता जगबुडी॥

(लेखमाला समाप्त)

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली, दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नायक ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆

श्री राजेश्वर बी. पारखे

अल्प परिचय

व्यवसाय : राहता तालुक्यात शेती, बॉश पंप, इंजेक्टर दुरुस्ती.

? इंद्रधनुष्य ?

☆ नायक ☆ श्री राजेश्वर बी. पारखे 

भल्या पहाटे माझ्या मुलीला डॉ. प्राप्तीला व माझ्या आईला शिर्डी ला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगाव ला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूर ला निघालो,

पहाटेची वेळ होती पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते,

आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटर च्या आसपास एस. टी. प्रवास झालेला होता,

प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता,

आपली 2006 सालची मारुती व्हॅन घेऊन राहत्याच्या चौफुलीत गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका 19 ते 20 वर्षाचा तरुणाने मला हात केला त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला,

रस्ता पूर्ण मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता,

उंचा पुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवर सॅक पाठीमागे लटकवलेली, कानात अगदी साध्या पद्धतीचे हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली,

त्याने एक स्मित हास्य दिले,

माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले,

विनम्र पणे तो थँक्यू म्हणायला विसरला नाही…

श्रीरामपूर च्या दिशेने प्रवास सुरु झाला, मस्त सकाळच्या वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्या कडे बघितले,

तसा तो हळुवार हसला,

मी त्याला विचारले कुठे जायचे आहे तो म्हणाला”बाभळेश्वर”,

मी म्हटलं तिथेच की अजून कुठे,

तो म्हणाला “मला ममदापूर ला जायचे आहे”

मी म्हटलं अरे वा!    रस्त्यातच आहे “सोडतो मी तुला”

पुढे अजून विचारले “तिथं कुठं राहतो”,

तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला”

मी म्हटलं कुठून… उत्तर आले “वाकडी तुन”

मी त्याला म्हटलं मग आपण अस्तगाव मधून जाऊ तिथे वाकडी चौफुली तच तुला सोडतो,

त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला,

गाडी ने मस्त वेग घेतला होता,

मी मध्येच विचारले तू कुठून आलास, तो म्हणाला “लातूर” हुन…

असे म्हणताच तिथून का बरे?

तो म्हणाला ते “माझा सत्कार होता लातूरला”

मोटेगावकर सरांनी सत्कार केला,

माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या,

आणि पुन्हां उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले कसला सत्कार?

तो म्हणाला ते “नीट परीक्षेत मला 592 मार्क्स पडले म्हणून”!

मला तर आश्चर्याचा धक्का च बसला…

भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या “नीट” च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन या बहादराने तर कमाल च केली होती,

मी अक्षरशः कंट्रोल करून गाडी साईडला थांबवली,

आणि पुन्हां त्याला विचारले, किती मार्क्स? तो उत्तरला 592 मार्क्स,

मी आश्चर्यकारक रित्या सुखद धक्का पोहचल्यागतच त्याला मनोभावे हस्तांदोलन केले,

त्याचे अभिनंदन केलें,

मनात म्हटलं अरे! हा तर टॉप च्या गव्हमेंट कॉलेज ला डॉक्टर डिग्री घेणारा विद्यार्थी आहे…

माझ्या व्हॅन मध्ये पहिलांदाच एव्हढे मोठे “नीट” मध्ये मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता,

आता त्याची विचारपूस करायला सुरुवात केली त्याने त्याचे नाव “विनायक विठ्ठलराव एलम” असे सांगितले,

वडील विहिर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे सांगितले,

मोठी बहीण “पूजा” तिलाही दहावी ला 97. 70% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीनेही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण “स्वप्नाली” इंजिनिअरिंग ची डिग्री करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले,

तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो…

एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते…

मी विचारले तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती?

तो म्हणाला पाचवी आई दुसरी झालेली,

हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन शिकवले असे तो भावुक होऊन सांगू लागला…

त्याचे डोळे हे सांगताना पाणावलेले मला जाणवले,

मी म्हंटले तुमच्या वडिलांची ही आता माझी भेट होईल खूप समाधान व आनंद वाटेल मला!

तो गाळातच हसला,

तो म्हणाला माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघांही भावंडाना शिकविले,

त्यांच्या कष्टाचे चीज झाले,

तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली, मी गाडी थांबवली,

त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होती,

मी व भावी डॉक्टर खाली उतरलो,

तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले, उंचे पुरे, रापलेला चेहरा,

अक्षरशः कामाचे मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो,

मी अदबीने हस्तांदोलना साठी हाथ पुढे केला…

त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला,

एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो…

त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले,

मी म्हंटलो “विठ्ठलराव मानलं राव तुम्हांला पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं”,

त्यांचं उत्तर आलं “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा…

हे वाक्य म्हणताना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते…

“मी तुम्हाला पण ओळखतो मी अन सचिन मोमले लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्या कडे घेऊनआलो होतो… “

बऱ्याच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले ‘यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…

मी म्हणालो आता जग तुम्हांला ओळखील…

मनाला खूप समाधान वाटले,

एक फोटो होऊन जाऊ द्या “डॉक्टर” त्या मुलाला म्हणताच; तो लाजला,

आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने आवर्जून सांगितली,

या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा “विनायक” आता आमच्या पंचक्रोशीत नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यात मधील शिक्षणातला “नायक”झाला होता…

मोटारसायकल लिलया फिरवत विठ्ठलराव यांनी विनायक ला पाठीमागे बसवून टाटा करीत आपल्या घरी निघाले, काळ्या मातीत राब राब राबून एक “नायक” या बापानी या समाजाला दिला होता कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टीनिर्म्यात्याला ती मान्य होती…

ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…

अनुभवातील शब्द…

© श्री राजेश्वर पारखे

जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर

 9822258403

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

चुकले ते एकाच ठिकाणी… शरणागती ही कृती नाही, ती अवस्था आहे. पाया पडणे ही शरणागतीची सुरुवात असेल, पण ती शरणागती नाही. शरणागती म्हणजे माझे मला कळत नाही, माझ्या मनाचा मला भरवसा नाही, माझ्या बुद्धीची मर्यादा मला माहीत आहे आणि म्हणून मी आता तुमच्यावर सोडतो. हे ओठांवरी येणे सोपे पण मनाने म्हणणे हेच खरे कठीण आहे. कारण आपला अहंकार हे म्हणणे देत नाही. तो म्हणतो अरे, आपण काय कमी आहोत? आपण स्वतः करू.

दत्त महाराजांच्या परंपरेत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते सद्गुरू हे आपल्याला नको त्या गोष्टी देत नाहीत, पण हव्या त्या गोष्टी आपल्याला तयार केल्याशिवाय देत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे असे की आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शरण जातो, तेव्हा सद्गुरू आधी आपल्या आतील अनावश्यक प्रश्न गोष्टी साफ करायला सुरुवात करतात. आणि हे साफ करणे सुखाचे नसते. जुन्या सवयी जातात, जुने आधार सुटतात, जे माझे वाटत होते ते एकेक करून निघून जाते. हे सुरू झाले की माणूस घाबरतो अरे, हे काय होतेय? मी शरण गेलो तर आणखी त्रास?

पण हाच तो क्षण असतो जेव्हा सद्गुरू खरे काम करत असतात. कुंभाराने मडके बनवताना आधी माती मऊ करावी लागते, चांगली तुडवावी लागते, मग आकार द्यावा लागतो, मग भट्टीत टाकावे लागते तेव्हा कुठे ते मडके पाणी धरायला तयार होते. आपले आयुष्यही असेच असते. सद्गुरूच्या हाती स्वतःला सोपवणे म्हणजे त्या मातीसारखे होणे जी स्वतःचा आकार विसरते आणि कुंभाराच्या हातात स्वतःला झोकून देते.

शरणागतीनंतर जे होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट नक्की होते. भीती कमी होते. जी माणसे, जी परिस्थिती आधी असह्य वाटायची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलते. हे का झाले माझ्यासोबत? हा प्रश्न हळूहळू यातून मला काय शिकायचे आहे? असा होतो. हा बदल लहान वाटतो, पण हाच सर्वात मोठा बदल आहे. कारण प्रश्न बदलला की उत्तर बदलते, उत्तर बदलले की जगणे बदलते.

सद्गुरूला शरण गेल्यावर माणूस परिपूर्ण होतो असे नाही. चुका होतात, अडखळणे होते, मन पुन्हा भरकटते. पण फरक एकच असतो आता एकट्याने भरकटत नाही. सद्गुरू सोबत असतात. अंधारात चालताना दिवा हातात असेल तर वाट चुकत नाही असे नाही पण पडलो तरी उठता येते, कारण काय झाले ते दिसते. सद्गुरू हा असा दिवा आहे जो विझत नाही, जो थकत नाही, जो माघार घेत नाही… अगदी खरं आहे..

संकल्प करायला काय हरकत आहे मी आजपासून सद्गुरूवर विश्वास ठेवतो. माझ्या समजुतीपेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. इतकेच पुरे आहे. बाकी सारे सद्गुरू पाहतात ना…

ll श्री गुरुदेव दत्त ll

ll दत्तरुप ll

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विवेकीयांची संगती” – लेखिका : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विवेकीयांची संगती” – लेखिका : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विवेकीयांची संगती

– “वो सुबह हमी से आयेगी…”

लेखक : अतुल देऊळगावकर

प्रकाशक : रोहन प्रकाशन 

पृष्ठः २४७

मूल्य: ३९५₹ 

एप्रिल १९५०. कंपनीच्या कामासाठी राय यांना पाच महिने लंडनला पाठवायचं ठरलं. राय दाम्पत्य कोलंबोहून जहाजानं लंडनकडे निघालं. राय सोळा दिवसांच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ संबंधी सुचणाऱ्या कल्पना लिहू लागले. त्यासोबत रेखाचित्रं होतीच. रेन्वा, व्हिक्टोरिया डा’ सिका आणि आयझेंस्टाइन यांच्या पावलांवर पाऊल टाकायचं, हे त्यांनी ठरवलंच होतं. वेशभूषा नाही. स्टुडिओ वा सेट नाही. गाणी नाही. प्रत्यक्ष गावात, साध्या माणसांना घेऊन चित्रपट करायचा. कथेतलं वास्तव थेट भिडवण्यासाठी त्यांचे विचार सतत चालू होते. ते लंडनमध्ये सहा महिन्यांत शंभर सिनेमे पाहून परत भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ कागदावर पूर्णपणे उतरला होता. ते परत आले तेव्हा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जाणार होता. त्यात अकिरा कुरोसावा, रोझेलिनी, डी’ सिका यांसारख्यांचे चित्रपट होते. ‘राशोमान’ पाहताच त्याच्या प्रेमात पडलेले राय म्हणतात, ‘ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळेच ‘पाथेर पांचाली’तील अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं की, हे करायलाच पाहिजे. ‘

‘पाथेर पांचाली’ ही हरिहर, त्यांची पत्नी सर्वजया, वृद्ध चुलत बहीण इंदिरा ठाकुरन, मुलं अपू-दुर्गा आणि अनेक छोट्या पात्रांची आहे. पूजापाठ करणाऱ्या दरिद्री हरिहरला दोन वेळचं जेवण मिळवणंसुद्धा कठीण आहे. त्यात या कुटुंबातील व्यवहाराचं चित्रण आहे. माणुसकी, लबाडी, ओलावा आणि निरागस बालपण… सगळं काही त्यात आहे. कादंबरीने कमीत कमी शब्दांत सूक्ष्म तपशील पकडल्यानं कवितेची उंची गाठली होती. राय पटकथा लिहून मोकळे झाले. दरम्यान, विभूतिभूषण वारल्यानं त्यांच्या पत्नी रमाबाईंकडून परवानगी घेतली आणि भांडवल गोळा करायची तयारी सुरू झाली. त्यांनी कल्पना मुव्हीजच्या भट्टाचार्यना गाठलं. त्यांनी शांतपणे कथा ऐकली. रेखाचित्रं पाहिली. दहा दिवसांची मुदत मागितली. चौथ्या दिवशी रमाबाईंचा भाऊ धावत राय यांच्याकडे आला. ‘कल्पना मुव्हीज हक्क मागतेय. प्रसिद्ध दिग्दर्शक देवकी बोस यांना घेऊन ‘पाथेर पांचाली’ करणार, म्हणताहेत. ‘…

डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, मृणाल सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे, जयंत वैद्य आणि इतर अनेक विचारवंतांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध या पुस्तकातून उलगडतो.

विचारांना समृद्ध करणाऱ्या आणि परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात घेऊन जाणारे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासू वाचकासाठी अनमोल ठरते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares