(आज प्रस्तुत है गुरुवर स्व प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित – “कविता – श्रमिक…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण स्वप्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे.।)
☆ काव्य धारा # २६३ ☆
☆ श्रमिक… ☆ स्व प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
“कॅलेंडर नेहमी तारीख बदलत राहते, पण एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरच बदलून टाकते. म्हणून संयम ठेवा, प्रत्येकाची वेळ येणार असते.” ही ओळ केवळ प्रेरणादायी वाक्य नाही, तर मानवी जीवनाच्या सामाजिक आणि मानसिक गतीमानतेचे अत्यंत सूचक रूपक आहे. माणसाचे दैनंदिन जीवन हे सवयी, दिनक्रम, आणि पुनरावृत्ती यांमध्ये अडकलेले असते. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, परिस्थिती बदलत नाही असे भासते, आणि त्यामुळे निराशा किंवा हताशा निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण इतिहास आणि समाजजीवन आपल्याला सतत दाखवत असते की, या सतत चालणाऱ्या “तारीख बदलण्याच्या” प्रक्रियेतच एखादा क्षण असा येतो, जो संपूर्ण प्रवाह बदलून टाकतो. हा बदल वैयक्तिक स्तरावरही असू शकतो—जसे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य एका निर्णयामुळे पूर्णपणे बदलते किंवा सामाजिक स्तरावरही, जिथे एखादी घटना संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवते. येथे मला मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनातील एका विविक्षित घटनेची आठवण होते. अजून ते महात्मा व्हायचे होते तेव्हाची गोष्ट आहे ही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना एका खटल्यासाठी प्रिटोरियाला जात असताना डरबन रेल्वे स्टेशनवर एका गोऱ्या माणसाने गांधींकडे पहिल्या वर्गाचे तिकीट असूनही तो काळा माणूस आहे म्हणून त्यांच्या सामानासकट त्यांना प्लॅटफॉर्मवर धक्के मारून फेकले होते. तो क्षण गांधीजींच्या जीवनातला वळणबिंदू होता. कारण त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रहाचे हत्यार उपसून स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. हा क्षण म्हणजेच गांधीजींचा महात्मा होण्याचा क्षण होता. त्यांच्या जीवनात ती तारीख अशी होती की जिने कॅलेंडरच बदलून टाकले.
दुसरी गोष्ट अशी की, माणसाला जर यश मिळवायचे असेल तर त्याने संयम ठेवायची आवश्यकता असते. पण मानवी मन हे तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवते. मेहनत केल्यावर लगेच यश मिळावे, संघर्ष केल्यावर लगेच बदल दिसावा, अशी अपेक्षा असते. पण वास्तवात बदल हा संथ प्रक्रियेतून घडत असतो. ही संथता अनेकदा माणसाला खचवते, त्याचा आत्मविश्वास कमी करते. अशा वेळी “तुझीही वेळ येईल” हा आशावाद मनाला उभारी देतो. मात्र, या आशावादाची एक मर्यादाही आहे. केवळ वेळ येईल म्हणून निष्क्रिय राहणे, किंवा सर्व काही नशिबावर सोडणे, ही मानसिकता घातक ठरू शकते. तेव्हा संयम म्हणजे केवळ थांबणे नव्हे, तर सतत प्रयत्न करत राहण्याची तयारी आणि अपयशाला सामोरे जाण्याची ताकद होय.
समाजातील असमानतेमुळे अनेक लोक आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक कारणांमुळे मागे पडलेले असतात. त्यांच्यासाठी “एक दिवस येईल” ही कल्पना आशेचा किरण ठरते. पण दुसरीकडे, हीच कल्पना सत्ताधाऱ्यांकडून किंवा प्रभावशाली गटांकडून लोकांना शांत ठेवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. “तुमची वेळ येईल” असे सांगून वर्तमानातील अन्याय, विषमता किंवा शोषण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे या वाक्याकडे अंध आशावाद म्हणून न पाहता, त्यामागील वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी, हे वाक्य जीवनातील परिवर्तनाच्या शक्यतेवर विश्वास ठेवायला शिकवते, पण त्याचबरोबर तो बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीची जाणीवही करून देते.
थोडक्यात काय तर, कॅलेंडर बदलणारी तारीख आपोआप येत नाही; ती घडवावी लागते. म्हणूनच संयम आणि प्रयत्न यांचा समतोल साधणे हीच या विचाराची खरी किल्ली आहे.
त्याच्या प्रश्नाने ती गडबडली कारण नेमकं तिचं ‘स्वप्न काय’ त्याने विचारताच ती म्हणाली, “नवऱ्यासोबत टू व्हीलरवर बसून वेगात हुरर करत हिंडायचं… “
तिचं स्वप्न ऐकताच त्याचा हा प्रश्न… ती मग हळूच म्हणाली, “थोडी थोडी जमते.. “
तो म्हणाला, “हरकत नाही, आपल्याकडे प्रॅक्टीसला टू व्हीलर नाही, सायकल आहे म्हणून विचारलं… “
ती थोडी हिरमुसली, पण तो मात्र खळखळ हसला होता, कारण स्वतःला सायकल येत नाही पण त्याच्या मागे बसून हुरर करत हुंदडायचं स्वप्न ती बघत होती.
‘सायकल’ ऐकून बहुतेक ‘नकार’ हे समजून त्याचं रुटीन सुरू होतं. सायकलवर टांग मारून तो निघणार तेवढ्यात जोशी आजी गॅलरीतून ओरडल्या, “बंड्या होकार आलाय… उद्या येत आहेत ते तारीख काढायला… “
मन हवेत तरंगलं आणि सायकल सुध्दा हवेत चालली त्यादिवशी. पुढे सगळं स्वप्नासारखं घडत गेलं. कोणी नसलं तरी चाळीतल्या सगळ्यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. जोशी आजी पुढाकाराला होत्याच, भाले मामा झाले, कोणी काका, कोणी करवल्या, असं करत गरिबीतलं कार्यही माणसांच्या प्रेमामुळे श्रीमंत झालं. बंड्याचे दोनाचे चार हात झाले तेंव्हा आजी म्हणल्याच, “नशिबात असलं की घडतच नाही, तर चांगले बंगल्यावाले पोरं बिनलग्नाचे बसलेत. बंड्याने नशीब काढलं. गुणी पोरगीं मिळाली… “
सगळं नवं स्वीकारत ती बंड्याशी नातं जपत होती. बंड्याही तसाच, परिस्थितीने गरीब असला तरी मनाने श्रीमंत असलेला… रोज गजरा चूकत नव्हता… ती ही सगळं स्वीकारणारी, फक्त एक खंत, टू व्हीलर डोळ्यासमोरुन जात नव्हती…
एकदा उगाच काहीतरी बिनसलं आणि तिने स्वप्न छेडलंच. “मी म्हणालेच होते बाबाला, तो सायकलवाला आहे… गाडी घोडी नाही त्याच्याकडे… “
तिच्या या वाक्याने तो हिरमुसला, डबा उचलून गपचूप निघून गेला. उगाच बोललो असं वाटून ती रडवेली झाली. जोशी आजीकडे जाऊन मुसमुसुन रडली. आजीला सगळं सांगितलं.
आजीने पाठीवर हात फिरवत जवळ घेतलं आणि म्हणाली, “बंड्याला कोणी नाही, ह्या चाळीचा जिना झाडून मिळालेल्या भाकरीवर मोठा झाला. माझ्या शिकवण्यांमध्ये येऊन बसायचा म्हणून त्याला शाळेत टाकलं. जिन्याखाली राहायचा. शिकला, ही छोटी नोकरी मिळाली, ही खोली भाड्याने घेतली, पै पै जमवून ही सायकल घेतली. आयुष्यात तू आलीस, आता आणखी दिवस बदलतील बिचाऱ्याचे… पण तू एक लक्षात ठेव, त्याचं आणि तुझं, दोघांच्या चेहऱ्यावरचं हास्य ज्या दिवसापासून ह्या वस्तूंसाठी हरवायला लागेल त्या दिवसापासून संसार फक्त एक कर्तव्य राहील, त्यातलं हास्य लोप पावेल… वस्तू येत राहतील, पण त्यासाठी लागणारा वेळ तुला सहन करावा लागेल, तरच खरी गंमत,.. “
तिलाही पटलं… ती घरी पळाली. त्याची येण्याची वेळ झालीच होती. आवरून जिन्यापाशी थांबली. तो दिसताच म्हणाली, “गाडीवर मागे नाही, तर सायकलवर समोर बसायचं आहे मला… तुला येते का तशी डबलसीट चालवता..? “
तो हसला. ती सायकलच्या दांडीवर बसली… त्याने गजरा तिच्या केसात माळला. सुगंधी वाऱ्यात.. एकदम जोरात… खळखळ हास्याच्या तालावर सायकल वेगात निघाली.
५ वी ते ११ वी म्हणजे मॅट्रिक पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण झाले. शाळेची फी माझ्या आठवणी प्रमाणे 13 आणे होती. शाळा घरापासून बऱ्यापैकी लांब होती. शाळेत चालत जायचे आणि चालत परत यायचे. सायकल, रिक्षा हे आटोक्या बाहेरचे होते. व्हॅन हा प्रकार अस्तित्वातच नव्हता.
शाळेत जाण्याकरता दोन हाफ पॅन्ट आणि दोन बुशशर्ट, आणि इतर वापरण्याकरता एक जास्तीची हाफ पॅन्ट आणि शर्ट एवढेच कपडे असायचे.
बूट मोजे हा प्रकार आमच्या ऑटोक्या मधला नव्हता. साधी चप्पल असायची.
पण यामध्येच आम्ही मस्त असायचो आणि एन्जॉय करायचो. घराच्या आसपास राहणारे मित्र पण असेच मस्त एन्जॉय करायचे.
घरी कोणी पाहुणे आले तर जाताना ते खाऊ करता म्हणून चार आणे (आत्ताचे 25 पैसे) द्यायचे.
ते मी जपून ठेवायचो. आणि भाऊबीजे करता त्याच पैशांमधून मामे बहिणी करता छोटं खेळणं घेऊन यायचो.
तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. आपापसांमध्ये संवाद असायचे, विनोद असायचे, फिरक्या घेणे असायचे. आणि त्यामध्ये एक वेगळीच मजा असायची आनंद असायचा.
अशा खूप मजेशीर आठवणी आहेत. खरा आनंद घरच्या सगळ्यांशी छान संवाद, योग्य शिस्त, घरचे जेवण, महिन्यात एखादा घरी केलेला गोड पदार्थ यातच असतो.
असं वाटतं अधून मधून त्या भूतकाळातून एक मस्त फेरफटका मारून यावा आणि तो आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा.
नात्यांची वीण ही रेशमाच्या धाग्यासारखी असते, जितकी मऊ आणि सुंदर, तितकीच नाजूक.
… आयुष्य जगत असताना अनेक माणसे भेटतात, काही मनात कायमचे घर करतात, तर काही जीवाभावाचे सोबती बनतात. पण कधी कधी काळाच्या ओघात किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात हीच हवीहवीशी वाटणारी नाती अचानक दुरावतात. एखादा छोटासा गैरसमज, बोलता बोलता तोंडातून गेलेला एखादा चुकीचा शब्द किंवा केवळ एका क्षणाचा राग, वर्षानुवर्षांच्या प्रेमावर मिठाचा खडा टाकतो आणि सुरू होतो एक न संपणारा अबोला. खरे तर अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची ओढ असते. जुन्या आठवणी आठवून मन भरून येतं, साध्या साध्या गोष्टींतून एकमेकांची उणीव भासते, पण संवाद मात्र खुंटलेला असतो. या दुराव्याचं सर्वात मोठं कारण असतं ‘अहंकार ‘म्हणजेच इगो. मी का वाकू? मी का आधी बोलू? मी वयाने मोठा आहे तर त्यानेच आधी यायला हवं, किंवा मी लहान असूनही मला सन्मान मिळाला नाही, अशा विचारांचे काहूर मनात माजलेले असते.
मोठेपण आणि लहानपण या तराजूत जेव्हा आपण नात्याला तोलतो, तेव्हा नात्याचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं. आपण हे विसरतो की, नाते टिकवण्यासाठी कोणाचे तरी वयाने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठे असणे जास्त महत्त्वाचे असते.
कोणतेही नाते पुन्हा पूर्ववत करायचे असेल, तर अहंकाराची भिंत पाडावीच लागते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा विचार केला की इगोची किंमत शून्य होऊन जाते. चूक कोणाचीही असो, पण जर ते नाते आपल्यासाठी अनमोल असेल, तर पुढाकार घेण्यात कसलीच लाज वाटायला नको. कधी कधी ‘सॉरी’ म्हणण्याने आपण लहान होत नाही, उलट ज्याला आपल्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीची साथ जास्त महत्त्वाची वाटते, तोच खरा मोठा असतो.
अबोला हा नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे, तो केवळ अंतर वाढवतो. त्याऐवजी समोरासमोर बसून, मनमोकळेपणाने बोलल्यास मोठमोठे डोंगरही विरघळून जातात. नाती ही जपून ठेवायच्या वस्तू नसून ती जगण्याची अनुभूती आहे.
– – आयुष्याचा प्रवास तसा छोटा आहे, त्यात रुसवे-फुगवे आणि अहंकार घेऊन चालण्यापेक्षा प्रेमाची शिदोरी सोबत असलेली केव्हाही चांगली. जर तुम्हाला वाटत असेल की एखादं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग उशीर करू नका. ‘मोठा ‘ किंवा ‘छोटा ‘हा विचार बाजूला ठेवा आणि मनाच्या मोठेपणाने संवादाचा हात पुढे करा. कारण गेलेली वेळ आणि तुटलेली माणसं पुन्हा मिळवणं कठीण असतं. एखाद्याला गमावून पश्चात्ताप करण्यापेक्षा, स्वतःचा इगो बाजूला सारून त्या नात्याला पुन्हा एकदा फुलायला मदत करणं, हेच खऱ्या समृद्ध आयुष्याचं लक्षण आहे.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २३ – – –
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाऊगे बोलता सुख नाही ।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।
अर्थ : हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.
विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.
समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.
बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.
परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.
अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.
आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल.
नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.
समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.
स्वसंवाद ::
वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?
माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?
आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?
– – – –
श्लोक क्र. २४ – –
रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|
अर्थ:हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड (वोसणावे) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.
विवेचन: समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.
भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.
शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात.
पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता… भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल.
सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.
समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.
म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.
स्वसंवाद ::
माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?
भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का?
माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?
केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील विविध भाषेत गाणी गाऊन अवघ्या भारतीयाच्या मनावर राज्य करणारे दोन गायक म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले! स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले.
मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी वाईट अपमान सहन करावे लागले.
त्यातला एक जीवघेणा प्रसंग आज सांगतो.
*
झालं असं की, एका सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्यासाठी किशोरदा आणि आशा ताईंना बोलावलेलं होतं. गाण्याच्या साउंड रेकॉर्डिगसाठी त्याकाळातले अत्यंत फेमस आणि टॉपचे समजले जाणारे रॉबिन चॅटर्जी होते. आणि हा तो काळ होता जेव्हा किशोरदा आणि आशाताई स्ट्रगल करत होत्या.
त्यात समोर रॉबिन याना पाहून हे दोघेही थोड्या दडपणाखाली आले.
मात्र हिंमत करून दोघांनी माईकसमोर येऊन गायला सुरु केलं.
मुखड्याच्या दोन ओळी गाऊन होत आहेत नाहीत तोवर रॉबिनजी यांनी “स्टॉप” स्टॉप म्हणत रेकॉर्डिंग थांबवलं.
आणि सिनेमाच्या दिग्दर्शक / निर्मात्यांना म्हणाले,
“ये कौन लोग लेके आये गाने के लिये? इन्हे तो कुछ भी नही आता… आवाज अच्छी नही है… गाने की आवाज है कहा इनकी? जाओ जाकर गीता को बुलाओ”
*
वरच्या पट्टीतले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले. आशाताई अन किशोरदावर काय आभाळ कोसळले असेल… कल्पना करवत नाही.
*
शांतपणे ते दोघे तिथून बाहेर पडले. डोळ्यात गच्च गहिवर आणि हृदयात मात्र अपमानच आगडोंब उसळलेला!
तिथून जवळच महालक्ष्मी स्टेशन होते. तिथं जाऊन रिकाम्या बाकड्यावर ते दोघे बसले.
दोघेही सुन्न… थोड्या वेळाने किशोरदा म्हणाले, “भूक लगी है, कुछ देखता हू”
आणि असं म्हणून ते भल्या मध्यरात्री त्या स्टेशनवर असलेल्या एका स्टॉल वर गेले तिथं बटाटेवडे होते तेही शिळे… तेच घेऊन किशोरदा आले. आणि या दोघांनी शांतपणे ते वडे खाताना किशोरदा म्हणाले, “आशा… हमको निकाल दिया”
त्यावर नेहमीच पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या आशाताई म्हणाल्या, “नही… दादा… आप की जो आवाज है उसे कोई रोक नही सकता, “
आणि मग शिळा वडा खाऊन… पाणी पिऊन दोघांनी घरची वाट धरली.
*
यानंतर चार वर्षानंतर या दोघांचे अनेक सिनेमे (गाणी) हिट झाली. दोघांचेही नाव झाले. किशोरदा तर गायक प्लस हिरो असे डबल फेमस झाले.
आणि एका सिनेमाच्या गाण्यासाठी पुन्हा हीच जोडी “त्याच” स्टुडिओत एकत्र आली आणि योगायोग पहा… त्याचेही साउंड रेकॉर्डिस्ट तेच रॉबिनदा होते ज्यांनी याना रिजेक्ट केलं होत.
त्यांना तिथे पाहताच किशोरदा आशाताईंना म्हणाले “आशा… वो देखो व्हिलन बैठा है… वो अगर इधर रेकॉर्डिस्ट है तो मै गाना नही गाऊंगा… “
त्यावर आशाताई दादाला म्हणाल्या, “दादा, ऐसे नही करते… आज हमारा नाम है तो क्या हुआ? किसी के पेट पे पैर नही देते.
किशोरदा म्हणाले, तुम्हे याद है… उसने हमारे साथ क्या किया था?
*आशाताई म्हणाल्या, “याद है… लेकिन अपना वख्त खराब था… आज अपना है तो गुरुर किस बात का? “*
*
आणि अशा रीतीने ते गाणे रेकॉर्ड झाले.
गोष्ट इथं संपलीय!
डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस मोठा का होतो? तर जमलं तर त्याच्या तळपायाकडे पहा… किती भेगाळले असतात अशा लोकांचे पाय… अपमान, उपासमार, अवहेलना… हे सगळे काटे पायात रुतलेले असतात आणि तरी हि मंडळी शांतपणे ते काटे बाजूला ठेवून पुढे चालत असतात. त्या काट्याला भांडत बसत नाहीत की त्याची जिरवण्यासाठी काही करत नाहीत. ते काम नियतीवर सोडावे आपण असं मला वाटत. कारण कर्मा काय अन नियती काय… ज्याचे त्याचे हिशोब चुकते करत असते त्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा? आपण आपल्या कामात राहून आपल्या कामातूनच जगाला उत्तर द्यावे… हेच जास्त बेस्ट! तसे तुम्हालाही जमावे… (कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे “रॉबिन चॅटर्जी” आलेले असतात.) त्यांना वळसा मारून पुढं जावं! येणारा काळ त्यांना बरोबर उत्तर देतो… रिलॅक्स मंडळी!
☆ प्रस्थान… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
☆
माझ्या घरासमोर एका बंगल्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. सिमेंट, लाकडं, विटा येऊन पडत होत्या. एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात दोन महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक हडकुळे ३ वर्षाचे पोर ओढल्यागत चालत होते. आल्या आल्या बाईने बंगल्याच्या आवारात दोन लाकडी खांबांना जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. शेजारी बंगल्याचे बांधकाम वेगाने सुरू झाले. ती दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.
जाता येता मी त्या परिवाराशी बोलत असे. कधी चॉकलेट-बिस्किटे, नाश्ता देत असे. सिमेंट रेती विटांचे काम सुरू होते. बघता-बघता बंगला उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही ऊन्हातान्हात दगड-वाळूत खेळू लागले. पुढे पावसाळा सुरू झाला, तशी तिची रवानगी बंगल्यातल्या अर्धवट बांधलेल्या खोलीत झाली. मी तिला, तिच्या नव-याला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा कंत्राटदार दोन-चार दिवसांत कधीतरी यायचा. मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी उगवायचा. एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे. सगळ्यांची अस्सल मातीशी बांधिलकी. मुलं दगडामातीत ऊन- थंडी- पाऊस झेलत खेळायची. पण कधी आजारी पडली नाहीत.
आमच्या बोलण्यात माणूस गप्प असायचा. ती मात्र मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची. हळुहळू बंगला पूर्ण झाला. मग प्लास्टर. लवकरच बंगल्याला आतबाहेर सुंदर रंग दिला गेला. बंगला छान सजू लागला.
एक दिवस मी सहज खिडकीबाहेर पाहत होतो. त्या घरासमोर ट्रक आला. त्यात कुदळ, फावडे, टोपल्या असे सामान होते. ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या मुलाला ट्रकमध्ये उभे केले, तीही नव-यासह ट्रकमध्ये चढली. ट्रक निघाला! जेव्हा तो ट्रक आमच्या घराजवळून जाऊ लागला तेव्हा मी धावतच जाऊन तो थांबवला. तिच्या डोळ्यात पाणी होते. ट्रकच्या आवाजात ऐकू येणार नाही, असं वाटून ती ओरडून म्हणाली, ‘दादा, आमचा मुक्काम संपला. येते जी मी! ‘ मला तो धक्का होता. मी ओरडूनच विचारले, ‘का हो, असे अचानक चाललात? ‘ तिचे हसून उत्तर आले, ‘मालकाचा निरोप आलाय. नव्या साईटीवर काम सुरू होणार आहे. आता तिथे बघायला नको का? ‘ तिने मायेने हात हलवला. आणि ट्रक दिसेनासा झाला.
मी सुन्न होऊन बघतच राहिलो…
एखाद्या सुगरण पक्षिणीने गवताची एकेक काडी गोळा करून खोपा विणावा, तसे तिने जीव ओतून घर बनविले. तिला कधी आपलेही घर असावे असे वाटत नसेल का? कसे यांचे जीवन? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमले उभारायचे. ऊन्हा-तान्हात पोरं वाढवायची. घर पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे! जवळजवळ वर्षभर ती बाई ज्या घरात राहिली, तिचा संसार फुलला, जे घर तिने इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ती चालली होती. कसला मोह नाही, लोभ नाही, तक्रार नाही. आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला.
मनात विचार आला…
जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का?
तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का?
जे मिळविले, निगुतीने सजविले, ते तसेच सोडून जावे लागणार नाही का?
त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही दुसऱ्या साईटवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते? अगदी एक क्षण, एक श्वासतरी जास्त मिळतो का कुणाला?
सर्वांना जावेच लागते की! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का?
एकदा अवश्य विचार करून पहावा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सैतान… लेखक : श्री नारायण धारप ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक : सैतान
लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
नारायण धारप म्हणजे भयकथांचे अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं जायचं ते का याचं उत्तर मला नारायण धारपांची पुस्तकं वाचल्यावर मिळालं. खरंतर भयकथा हा मी आवर्जून वाचण्याचा साहित्यप्रकार नाही. पण वाचनामध्ये नावीन्यपणा आणण्यासाठी किंवा वाचनाची गोडी टिकवण्यासाठी म्हणून हा साहित्यप्रकार वाचायला मी सुरुवात केली. असं असलं तरी नारायण धारपांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी मात्र अनेक वर्षांपासून माझं लक्ष वेधून घेतलं होतं. बऱ्याचदा मुखपृष्ठ बघूनच आपल्याला आतला मजकूर फारसा भावणार नाही असं वाटून मी ती पुस्तकं वाचण्याचं आवर्जून टाळलं होतं.
आता वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की मुखपृष्ठं भयानक असली तरी आतला मजकूर मात्र केवळ भय भावनाच सांगत नाही. धारपांच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात जाणवणारी गोष्ट म्हणजे मती गुंग होणे. भयकथांचं महत्त्व केव्हा वाढतं तर तुम्हाला त्या भयामागचं कारणच समजत नाही तेव्हा. पण इथे कारण समजलं असलं तरी त्याचा जो भयावह परीणाम होतो किंवा त्या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो त्याने जास्त भय वाटत राहते.
‘सैतान’ या मी वाचलेल्या कादंबरीबाबत बोलायचं झालं तर कथानक साधं घेतलं आहे. पुण्याजवळच्या एका गावात तीनवाडीमध्ये एका खडकाळ डोंगराळ निर्मनुष्य वस्तीवर विमान कोसळतं. आणि सबंध विमान पेट घेऊन त्यातील एकही व्यक्ती जिवंत राहत नाही. सर्वच्या सर्व मृत पावतात. आणि या दुर्घटनेच्या प्रसंगानंतर त्या तीनवडी गावावर जे संकट बेततं त्याची ही कथा. कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना ध्यानीमनी नसलेला मृत्यू स्वीकारणं हे शरीराला जरी अपरिहार्य असलं तरी मानवी वासना भावना यांना ते सहज शक्य होत नाही. आणि या मृतात्म्यांच्या आक्रोशातून स्वतःला जिवंत ठेवण्याच्या धडपडीतून निर्माण झालेल्या वासनांतून पुढे घडणाऱ्या गोष्टी म्हणजे हे कथानक.
प्रसंगांचं तपशीलवार वर्णन आणि अचूक शब्द योजना हे नारायण धारपांच वैशिष्ट्य यातून दिसून येतं. म्हणजे रहस्य कथा असो किंवा भयकथा असो शब्दयोजना प्रचंड महत्त्वाची असते. आणि तिच वाचकाच्या मनावर पकड घालू शकते. अनेकदा प्रसंग खूप रहस्यमय नसतील तरी चालेल पण त्यांची मांडणी आणि त्यातले शब्द हेच वाचकाच्या मनावरती प्रभाव टाकतात आणि यामध्ये धारपांचा हातखंडा जाणवतोच.
आणखीन एक त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे एक सलग कथानक घेऊन सरळसोटपणे लेखन ते करत नाहीत. त्यांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकथानकं असतात. आणि त्या उपकथानकांचा एकमेकांशी संबंध असतो तो वाचकाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे धारपांच पुस्तक वाचताना वाचक म्हणून लागलेली आपली तंद्री फार महत्त्वाची असते. नाहीतर आपल्याला उपकथानकातला मूळ कथेशी असलेला धागा पटकन समजू शकत नाही. कारण प्रत्येक उपकथनकात एखाद्या घटनेचा धागा जरी समान असला तरी पात्रांची नावे, परिस्थिती, वर्णन त्यांची कामं ही पूर्णपणे वेगळी असतात. एक विमान कोसळून पडणं या एका घटनेचा संबंध पुजारी, पादरीबुवा, फोटोग्राफर, आर्मी मधले रिटायर्ड ऑफिसर, गावातील गुंड प्रवृत्तीची माणसं आणि ती घटना पाहण्यासाठी जमलेली एक लहान मुलगी या सगळ्यांवर किती वेगवेगळ्या प्रकारे होतो आणि ते त्याला कसे सामोरे जातात त्याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन यात आलं आहे.
काही प्रसंगात ती बाहुली जेव्हा चालत येते तेव्हा तिचं वर्णन, नंतर खसखस हसण्याच्या आवाजाचे वर्णन हे वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यांचं कथानक वाचताना आपली तर्कनिष्ठा बाजूला ठेवावी लागते असं न म्हणता मी तर उलट म्हणेन आपल्या तर्कनिष्ठेला आव्हान देणारं कथानक ते लिहितात. आणि त्यामुळे त्यांचं लेखन परिणाम करतं.
विमान अपघात या एका दुर्दैवी घटनेचे वेगवेगळ्या मनोवृत्तीच्या लोकांवर कसे परिणाम होऊ शकतात हे दाखवणं सोपं नाही. पण ते कसब यात सहज साधलं गेल्यामुळे कथानक जास्त रोचक होत जातं.
सैतानी वृत्तीची शक्ती आणि सामान्य व सज्जन शक्ती या दोघांमधला संघर्ष हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. आणि तोच संघर्ष अनेक मानवी मूल्य जिवंत ठेवतो आणि त्याचबरोबर त्या मूल्यांची होणारी पायमल्लीसुद्धा दाखवतो. हा जो प्रचंड विरोधाभास आपल्या जगण्यामध्ये आहे. तो फार उत्तमरीत्या ते मांडतात आणि त्याने त्या कथानकावरती विश्वास ठेवावासा वाटतो.
माणसांच्या मनोवृत्तीचं अचूक निरीक्षण, भरपूर अभ्यास आणि अनेक तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास, स्थळ काळानुसार माणसाच्या जीवन पद्धतीत होत गेलेले बदल टिपणे अशी कितीतरी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात दिसून येतात. त्यामुळे फक्त भय या नावातच माझ्याप्रमाणे जर कोणी अडकलं असेल तर त्यांनी तो एकांगी दृष्टिकोन न ठेवता एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे पुस्तक जर वाचलं तर त्यांना निश्चितच काहीतरी वेगळं वाचल्याचा अनुभव मिळेल.
परिचय – तृप्ती कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈