एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”
आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अवकाशाची सीमा या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
☆ अवकाशाची सीमा ☆
☆
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु
*
ती : हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सुरसमाधि गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
*
तो : खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २
*
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ती: ज्ञानाची विज्ञानाची
दोघे :वर्षा तुजवर आशीशाची
तव तेजाचा मार्ग दीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३
☆
– डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)
हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.
हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.
तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला
खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु
या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल. ” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.
“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. नभिचे नक्षत्र आणावे यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.
कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,
ती: हो वीणा सरस्वतीची
हो पद्मिनी पदन्यासाची
सूर समाधी गंधर्वाची
प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१
जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.
जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.
आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..
तो: खेळाडू मैदानाची
मासोळी जलतरणाची
पाकोळी अवकाशाची
यश राहू दे सदा तुझ्या साथीला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२
आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे, ” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे. इतकी गती, इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.
मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”
या ओळींमध्ये पाकोळी अवकाशाची ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. पाकोळी हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.
“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे. ”
पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे
तो: तव प्रज्ञा विनायकाची
ज्ञानाची विज्ञानाची
दोघे: वर्षाव आशीशाची
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३
पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, तव प्रज्ञा विनायकाची
“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे. ”
या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,
ज्ञानाची विज्ञानाची ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे. ”
या इथे कवीने वापरलेल्या विज्ञानाची हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की, ” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे! ”
मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,
वर्षाव तुजवर आशीशाचा
तव तेजाचा मार्गदीप जगताला
खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..
आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ”
अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.
॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत. कसलाही दबाव तिच्यावर नाही. एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.
डॉ. निशिकांत श्रोत्री एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं स्त्रीवादीपण प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या अवकाशाची सीमा या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.
अवकाशाची सीमा या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.
बघता बघता आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले. पिसाट वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.
रानात मोर आपले पिसारे फुलवून, माना उंचावून, म्याँव, म्याँव करीत आनंदाने केकारव करू लागले. क्षणातच पावसाच्या टपो-या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. बहुप्रतिक्षित वर्षाऋतुचे हवेहवेसे वाटणारे विभ्रम सुरू झाले! पाऊस आला, पाऊस आला!!
हा भावनाविष्कार
साकार करी मल्हार।।
टीप :- आई मुलाला लाडाने जसे “बबड्या, छबड्या” म्हणते तसे मल्हार या लोकप्रीय रागाला काहीजण “महुडे” या लाडक्या नावाने संबोधितात. (ही माहिती कवी कै. वसंत बापट यांच्याकडून मी ऐकली होती.)
शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्त बद्ध काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना त्यांच्या गंगा माहेराची या काव्यरचनेसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सौ. तानवडे यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
शुभंकरोति साहित्य परिवार आयोजित भव्य वृत्तबद्ध काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त‘
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७७ — –
करी काम नि:काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।
अर्थ : या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.
विवेचन :परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.
त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, ” कुठे आहे तुझा ईश्वर? ” तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.
पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.
त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला. ” अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद ::
१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी ‘मागण्यासाठी’ (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या ‘स्वरूपासाठी’ (निष्काम) त्याची आराधना करतोय?
२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?
३. माझ्या मनातील ‘आपले-परके’, ‘चांगले-वाईट’ हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा ‘वृत्तीविश्वास’ दृढ झाला आहे का?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे “हे विश्वचि माझे घर” ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा ‘छेद’ (त्याग) करायला तयार आहे का?
– – – –
श्लोक क्र. ७८ – –
अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ।
महाराज तो स्वामी कैवल्यदाता ।
वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।।
अर्थ :ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला (पामराला) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.
विवेचन :आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. गरीब माणूस आपल्या कर्तृत्वाने स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. पामर हा त्या दृष्टीने महामूर्ख म्हणावा लागेल. कारण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा नाही, अशा माणसांना समर्थ पामर म्हणतात. मग तो ऐहिक दृष्ट्या भलेही श्रीमंत असेल, पण पारमार्थिक दृष्ट्या अभागी आणि हीन दीन.
असा माणूस आर्थिक दृष्ट्या भलेही सधन असेल पण प्रपंचात येणाऱ्या संकटांनी तो खचून जातो. प्रपंचातील संकटांचे तडाखे भल्याभल्यांना सोसवत नाहीत. छोट्यामोठ्या गोष्टींनीही अशी माणसे विचलित होतात. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर अशा माणसांना संसार आणि त्यातील अडचणी बाधक ठरतात. पण ज्यांची रामावर श्रद्धा आहे, अशा माणसांना प्रपंचातील संकटे विचलित करीत नाहीत. त्यांना संकटे येत नाहीत असे नाही. पण भगवंतावर सर्व भार टाकल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही.
या श्लोकात भगवंताच्या गुणांचे वर्णन करताना समर्थ तीन विशेषणे वापरतात. तो ‘महा ‘राज आहे, स्वामी आहे आणि कैवल्यदाता आहे. महाराज म्हणजे महान राजा. राजांचा राजा. रामराज्य होऊन आज हजारो वर्षे लोटली तरी रामराज्याची कल्पना आजही लोकांना भावते. रामराज्य म्हणजे आदर्श राज्य होते. राम हा आदर्श राजा. दुसरी गोष्ट म्हणजे तो या चराचराचा स्वामी आहे. इंग्रजी शब्द वापरायचा तर तो ‘ सुप्रीम पॉवर ‘ आहे. या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता तोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो कैवल्यदाता आहे. कैवल्यदाता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा. ज्याने ज्याने रामनाम घेतला, तो तरून गेला. मग तो वाल्या कोळी असेल, भक्त प्रल्हाद असेल, रामनाम घेणारी शबरी असेल किंवा अहिल्या असेल. हनुमंत आणि बिभीषण हे रामाचे भक्त तर चिरंजीव झाले.
थोडक्यात सांगायचे झाले तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष हा इच्छिलेले देणारा असतो. त्याच्या सावलीत बसून आपण काय मागायचे हे आपल्यावर आहे. तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारा आहे. कैवल्य प्रदान करणारा आहे. असा हा भगवंत आपल्या पाठीशी असताना आपण देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहत असतो. माझे कसे होईल, माझ्या मुलाबाळांचे, नातवंडांचे कसे होईल अशी चिंता आपण करीत बसतो. तर कोणाला या जगाचे कसे होईल अशा प्रकारची चिंता. अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी सामान्य माणूस गोंधळून जातो.
समर्थ म्हणतात, ‘ मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ‘ प्रारब्धानुसार जे घडायचे असते, ते घडणारच असते. आपण मात्र व्यर्थ चिंता करीत बसतो. त्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व भार त्याच्यावर सोपवावा. याचा अर्थ मात्र असा नाही की आपल्या वाट्याला आलेले कर्म न करता स्वस्थ बसायचे. अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठीच तर भगवंताने गीता सांगितली ना! तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वाट्याला आलेले निहित कर्म उत्तम प्रकारे करावे. तोच पुरुषार्थ आहे. इतर गोष्टी परमेश्वरावर सोपवाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, “घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. “मग देहाच्या आणि प्रपंच्याच्या चिंता आपल्याला सतावणार नाहीत.
स्वसंवाद ::
१. “माझे कसे होईल? माझ्या कुटुंबियांचे कसे होईल? ” या विचारसरणीत अडकून मी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे प्रपंचाची ‘वृथा’ (व्यर्थ) चिंता करत बसलो आहे का?
२. संकटाच्या काळात मी एका ‘पामरा’सारखा विचलित होऊन खचून जातो, की भगवंतावर संपूर्ण भार टाकून खंबीरपणे परिस्थितीचा सामना करतो?
३. कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आल्यावर मी त्याच्याकडे केवळ तात्पुरती ऐहिक सुखे मागत आहे, की चिरंतन शांती आणि मोक्षाची आस धरतो आहे?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “देव सुखाचा सागर” आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे का? मी माझे निहित कर्म करून उरलेला भार त्याच्यावर सोपवायला शिकलो आहे का?